Wednesday, 28 January 2026

पुणे ते कोल्हापूर

मला खूप पूर्वी असे एक स्वप्न पडायचे. एक लांबलचक, मस्त गुळगुळीत रस्ता आहे. माझ्या हातात एक सुंदर कार आहे आणि मी सुसाट दीडशेच्या वेगाने जात आहे. वाटेत खड्डे नाहीत, अडथळे नाहीत, सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर नाहीत… आणि माझ्यासोबत फक्त वेग!

कालांतराने समजून चुकले की हे फक्त स्वप्नातच घडू शकते. या जन्मात असे काही घडणे शक्य नाही.

अनुभवाने आलेले शहाणपण म्हणा अथवा माझे वय म्हणा, मी आता ड्रायव्हिंगचा कंटाळाच करतो. तसं मला ड्रायव्हिंग आवडत नाही असं काही नाही; पण पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे मी ते शक्यतो टाळतो. लक्ष्मी रोड, टिळक रोड किंवा पेठेत जावेच लागले तर टॅक्सीचा पर्याय मला अधिक सोयीचा वाटतो. उगाच ट्रॅफिकमध्ये चिडचिड नको, पार्किंग कुठे करू हा प्रश्न नको, आणि गाडीला कोणीतरी घासून गेला तर होणारा मनःस्ताप तर मुळीच नको.


तरीपण कधीतरी गाडी चालवावीच लागते. रोज ऑफिसला जाताना किंवा कधी परगावी जाताना गाडीचा वापर आवर्जून करावा लागतो. हातात गाडी असली की सोईची वाटते. मुंबई, कोल्हापूर अशा अनेक फेऱ्या झाल्यात. कधी भटकंतीसाठीही फिरणं झालंय. या सर्व प्रवासांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असा प्रवास म्हणजे पुणे ते कोल्हापूर.

प्रयत्न आणि ध्येय यामध्ये अंतर असतं असं म्हणतात… पण हे अंतर दिवसेंदिवस वाढत जातं, हे माहीत नव्हतं. पाच–सहा वर्षांपूर्वी पुणे ते कोल्हापूर फक्त चार ते साडेचार तासांत पार पडायचे. तेच अंतर आता सात ते आठ तास घेतं. कदाचित पृथ्वीच खेचली जात असावी असं वाटतंय. पूर्वी कोल्हापूरहून सकाळी निघालो तर दुपारच्या जेवणाला घरी पोहोचायचो. आता बायकोला सांगावं लागतं “रात्रीच्या जेवणाची वाट पाहू नकोस.” जगभर दोन ठिकाणांमधील अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं; पण पुणे–कोल्हापूर हे अंतर संयम आणि BP मध्ये मोजतात, असं मला वाटतं.

प्रत्येक कोल्हापूर प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. इच्छित स्थळी पोहोचल्यावर युद्ध जिंकून आल्याची अनुभूती येते. प्रवासातील खड्डे, हादरे आणि चिघळलेले ट्रॅफिक यातून जीवनाचं सार सापडल्याचा भास होतो. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने तेच खड्डे आपल्याला जवळचे वाटू लागतात. मार्गात येणारा प्रत्येक खड्डा एखाद्या जुन्या ऋणानुबंधासारखा खुणावल्यासारखा वाटतो.

मी असे ऐकले आहे की कोणीतरी गुगलला खास सूचना देऊन नकाशामध्ये खड्डेही दाखवा असा सल्ला दिला आहे. गुगल यावर संशोधन करत आहे अशी बातमी आहे. रस्त्यातील प्रत्येक डायव्हर्जन तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असल्यासारखा वाटू लागते. एखादा किलोमीटर डायव्हर्जनशिवाय पार केला तर रस्ता चुकल्याची शंका येते. मुख्य रस्त्याच्या लांबीपेक्षा डायव्हर्जनची लांबी जास्त असते; मात्र रुंदी एक चतुर्थांश असावी लागते. तीन पदरी रस्त्याचं महत्त्व समजण्यासाठी अरुंद डायव्हर्जनची आवश्यकता मानवजातीला आहे, असं मला वाटतं. जागोजागी अशी पाटी दिसते “आगे अस्थायी मोड है।” आता या अस्थायी चा अर्थ किमान दहा पंधरा वर्षे असू शकतो.

या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं वर्णन करावं तेवढं कमीच. असं वाटतं की अख्खं पुणे नेमकं आजच कोल्हापूरच्या देवदर्शनाला निघालं आहे. सर्रास लेन बदलणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, या कला अवगत असल्या शिवाय तुम्हाला कोल्हापुरात प्रवेश नाही, अशी मला दाट शंका आहे. रस्त्याच्या मध्यभागातून संथ गतीने जाणारे भलेमोठे ट्रक तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. तुम्ही कितीही हॉर्न वाजवला तरी तो आवाज त्या ड्रायव्हरच्या कानापर्यंत पोहोचत नाही. या प्रवासात ओव्हरटेक करता येणं ही सुवर्णसंधी असते; त्यासाठी मागच्या जन्मीचे पुण्यसंचय लागते. चुकून एखाद्या वेळी मी संथ जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करायला लागलोच, तर तो अचानक वेग वाढवतो आणि मला माझी जागा दाखवून देतो. “अपनी औकात में रहो।” असं काहीतरी तो ओरडून सांगतोय असा भास होतो. समोरचा ट्रक, मागचा बसवाला आणि बाजूचा कारवाला — या सगळ्यांचं एकच ध्येय असतं: माझ्या गाडीला पुढे जाण्याचे कष्ट होऊ नयेत. संथ आणि आरामात माझा प्रवास व्हावा.

खरी परीक्षा असते ती टोल प्लाझावर. हे लोक टोल का घेतात यावर पुणे विद्यापीठात संशोधन चालू आहे, असं ऐकीवात आहे. तरीपण मी एक जागरूक नागरिक या नात्याने स्लो रस्त्यावर फास्टटॅगद्वारे टोल भरतो. टोल प्लाझा जवळ आला की किमान दहा गेट दिसतात आणि प्रत्येक गेटवर भल्या मोठ्या रांगा. त्यातली जी रांग छोटी वाटते, तिथे गाडी घुसवली की हमखास शेजारच्या उजव्या-डाव्या रांगा पटापट पुढे सरकतात आणि आपली रांग तशीच राहते. कोणाच्या तरी फास्टटॅगला प्रॉब्लेम असतो आणि तो बिचारा अडकलेला असतो. त्याच्या मागे उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या हॉर्न वाजवून काय सांगत असतात, हे मला आजतागायत कळलेलं नाही. अशा वेळी मागे हटणं शक्य नसतं, कारण माझ्या मागेही अजून चार गाड्या उभ्या असतात आणि त्या देखील हॉर्न वाजवून आपापल्या गाड्या जिवंत ठेवत असतात. टोल भरताना मी स्वतःच्या मनाला समजावतो, हे पैसे वर्तमानकाळातील रस्त्यांसाठी नसून उज्ज्वल भविष्यातील सुंदर भारतातील रस्त्यांसाठी केलेले अल्प प्रयत्न आहेत. पुढच्या पिढ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता तो नक्की कोणाच्या पिढीला, या वादात मी पडत नाही.

पूर्वी या प्रवासात लोक फक्त एक चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचे. आता तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण असा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने वाटेतील सर्व उद्योगधंद्यांना चांगला हातभार लागतो, इतकाच उद्देश असावा.

भले तुमच्या असंख्य तक्रारी असतील; पण पुढच्या खेपेस कोल्हापूर फेरी करायचीच झाली, तर तुमच्याकडे काही पर्यायी रस्ता आहे का? … नाही ना? मग मुक्तपणे कौतुकच केलेलं बरं!

एकवेळ तुम्हाला तक्रार करणं जमेल, पण रस्ता बदलणं अजून कोणाला जमलेलं नाही.

Tuesday, 18 November 2025

उंदरावरचे शहाणे

उंदीर हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याची घृणा केली जाते आणि पूजा सुद्धा. गणपती बाप्पांनी उंदराला वाहन करून भलतेच धाडस दाखवलं आहे. ते त्यांच्या आईला भेटायला गेल्यावर बिचारी माऊली त्याला रागवून सांगत असणार, “अरे बाळा! तुला दुसरा प्राणी नाही का मिळाला? त्याला मुळीच घरात घेऊन यायचं नाही. कालच नवीन साडी आणलेली कपाटात ठेवलीय. दादाकडं बघ, त्यानं मोर पाळलाय. तुझ्या वडिलांनी बैल पाळलाय. आणि तू उंदीर! काय ही दरीद्री लक्षणं! अरे, वाघ, सिंह, गेंडा, घोडा पाळ... हे कसलं खुळ डोक्यात घेतलंयस?” असो! बाप्पाला त्याची आई रागवत असेल का नाही, हे माहीत नाही. पण उंदीर मात्र घरोघरी डोकेदुखीचा विषय आहे. एकवेळ कितीही घृणा वाटली तरी पाल कधी डोकेदुखी होऊ शकत नाही... पण उंदराचं अस्तित्व हे घरात भूत शिरल्या प्रमाणे वाटू शकतं.

गावाकडील घरांमध्ये पाळीव प्राण्यांच्या बरोबरीने उंदरांचा संचार हमखास आढळतो. तिथे राहणाऱ्या लोकाना उंदराच्या दर्शनाने मुळीच कुतूहल अथवा भीती वाटत नाही. छताच्या तुळईवर, अडगळी मधे, कपाटामध्ये, धान्याच्या साठवणी जवळ हे उंदीर हक्काने संचार करीत असतात. त्यांच्या पाळतीवर मांजरे पण फिरत असतात. मांजराला हुलकावणी देण्यात तिथले उंदीर बरेच तरबेज असतात. तिथली मांजरे सुद्धा ‘कष्टाविण फळ नाही’ या नियमाने ‘पळल्याविण उंदीर नाही’ हे समजून चपळ असतात. गावाकडे उंदरामधे सुद्धा अनेक प्रकार आढळतात. पिटूकल्या उंदरांपासून ते मोठ्ठाले उंदीर.. यामधे पिटूकले उंदीर अतिशय चपळ आणि नाठाळ असतात. भारताच्या सीमेवरील घूसखोरीच्या प्रकारावूनच 'घुस' हे नाव पडले असावे. मातीच्या भिंतींना फोड्यात यांचा दातखंडा. हा प्राणी भीतीदायक आणि धान्य साठवणीचे मोठे नुकसान करण्याची ताकद. चिचुंद्री हा प्राणी लांब तोंडाचा आणि घराच्या काना कोपऱ्यात चुक-चुक असा विचित्र आवाज काढत पळणारा प्राणी. या सर्व प्रजातींचा उद्देश ठरलेला असतो.. खादाडी आणि नासाडी!

पिटूकल्या उंदरांना शहरात फिरण्याचा परवाना मिळालेला असतो. बाकीच्या प्रजाती शहरवासीयांना तशा दुर्मीळच. शहरी भागात मात्र उंदरांची दहशत ही बिबट्यांच्या दहशतीपेक्षा अधिक असते. तसं उंदरांचं दर्शन दुर्मीळ असले तरी बऱ्याचदा ते आपल्या घरी हजेरी लावतात. जर कधी घरच्या मालकीणीची आणि त्या उंदराची नजरा नजर झालीच तर घरात प्रचंड हलकल्लोळ माजतो. अशा प्रसंगात उंदीरही बुचकळ्यात... मी घाबरू का, ही महिला घाबरेल? नक्की कोणी कोणाला भॉकऽऽ केलंय या गोंधळात घरात बरीच पळापळ होते. घरचे यजमान मात्र गोंधळलेल्या अवस्थेतच उंदीर हटाव मोहीम राबवू लागतात. शहरात काही लोक मांजर पाळतात. पण ते लाडावलेले मनीमाऊ किंवा बोकूली उंदीर पाहताक्षणी मालकीणीच्या मागे लपून बसतात. उंदीर हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातून वगळलेला असतो.

खूप वर्षांपूर्वी आम्ही एका छानशा टाऊनशिपमध्ये राहात होतो. मुंगीला सुद्धा आत शिरण्यासाठी सिक्युरिटीची परवानगी घ्यावी लागे. तरीही त्यांची परवानगी न घेता उंदीरांचा टाऊनशिपमध्ये बराच सुळसुळाट झाला. टाऊनशिपमध्ये जर साप आढळला तर एका सर्पमित्राला बोलवण्यात येई. पण आमच्या ओळखीचा कोणी उंदीरमित्र नव्हता. घरातील बऱ्याच कापडी गोष्टींना उंदराने आपल्या मुखस्पर्शाने अपवित्र करून टाकल्या होत्या. त्याचं अस्तित्व जाणवलं पण त्याचं दर्शन होत नव्हतं. घरात एखादा अतृप्त आत्मा वावरत असावा असं बायकोला वाटू लागलं. दिवसभर मी ऑफिस गेलो की ती घरात एकटी राहायला घाबरू लागली. रोज संध्याकाळी घरी आलो की आजचं उंदराचं प्रताप यावर चर्चा घडू लागल्या. रोज सकाळी उठल्यावर त्याच्या 'रात्रीस खेळ चाले' आढावा घेणं असं रूटीन सुरू झालं. असेच पाच-सहा दिवस उलटले. तरीही या बहादूराने आम्हाला त्याचं दर्शन दिलं नव्हतं. अखेरीस तो दिवस उगवला. एका महान संध्याकाळी बायकोला अचानक तो दृष्टीस पडला. 'आजी म्या ब्रह्म पाहीले' या सुरात घरात हाहाकार उडाला. आता मात्र माझ्यावर पडलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. दुकानातून उंदीर मारण्याचे औषध आणलं. गणपती बाप्पाला नमस्कार करून माफी मागितली आणि ते औषध घराच्या काना-कोपऱ्यात पसरून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पासून काहीच हालचाल दिसली नाही. कदाचित उंदराला आमच्या कृष्णकृत्याचा अंदाज आला असेल आणि त्याने पळ काढला असेल असं मी समजूत करून घेतलं. पण दोन दिवसांनी अडगळीच्या खोलीतून घाणेरडा वास येऊ लागला. तिथल्या एका कोपऱ्यात बिचाऱ्याचा धारातीर्थ पडलेला देह मला दिसला. पुन्हा एकदा बाप्पाची माफी मागून मी उंदराला घराबाहेर कचऱ्यात टाकून दिला.

तसे आयुष्यात बरेच उंदीर आले आणि गेले, काही आवर्जून स्मरणात राहीले तर काही दूर पळून गेले. अलीकडेच माझा एका अदृश्य उंदराचा सामना झाला. आमच्या सोसायटी मधे बऱ्याच लोकानी उंदीर पाहिल्याच्या बातम्या पसरवल्या. कोणाच्या बाथरूम मध्ये तर कोणाच्या किचन मध्ये! कोणाच्या कारच्या टपावर तर कोणाच्या बाल्कनीत… अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक उंदीर पाहिले. काही जणानी तर नुकसानीचे किस्से आणि आकडे रंगवून आणि फुगवून सोसायटीच्या ग्रुपवर टाकले. या सर्व कथांमधे तथ्य किती आणि अफवा किती यावर आमच्या घरात चर्चा रंगल्या. आम्ही कथाकाराच्या व्यक्तिमत्वावर कथेची सत्यता निश्चित ठरवली. कोणीतरी यावर अशी बौद्धिक टिप्पणी केली की हे उंदीर मुळचे आपल्या सोसायटीचे नाहीतच… ते जे अमुक त्यांचे सामान घेऊन आले ना, त्यावेळी त्यांच्या सामानातून हे उंदीर आले. बिच्चारे अमुक अजून सोसायटीच्या ग्रुपमधे सामील झाले नव्हते. तर या अशा सर्व रंजक कथा आणि चर्चेचा आम्ही उभयतांनी यथेच्छ आनंद घेत होतो. आणि अचानक तो दिवस उजाडलाच… त्या भल्या सकाळी आमच्या ड्राय बाल्कनीची डासांची जाळी फाटलेली दिसली. ते पाहल्यावर घरात उंदीर शिरल्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले. घरात सर्व काने कोपरे पाहिले पण कुठेच मागमूस लागेना. काहीही कुरतडलेले नव्हते, ना फाटलेले होते, काही सांडलेले नव्हते, ना विस्कटलेले होते. तरीपण त्याच्या येण्याची चाहूल मनात कुरतडत होतीच. कुणीतरी आहे तिथे या मालीकेची शृंखला सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. पण अचानक मला आमच्या बाल्कनीचे जाळीचे दार सुद्धा कुरतडलेले दिसले… आणि भांड्यात जीव पडला. उंदराने ड्राय बाल्कनी मधून शिरून बाल्कनीतून पोबारा केला यावर शिक्कामोर्तब झाले. पण घरात त्याने काहीच नासधूस न करता गेला याची खंत वजा आश्चर्य वाटत राहिले. कदाचित घराचे इंटेरिअर आणि नीटनेटके पणा पाहून तो खुश झाला असावा आणि आम्हाला माफ केले असावे. त्यानंतर जाळीवाल्याला जाळी अशी तकलादू का अशी विचारणा केली असता, त्याचा उलट प्रश्न आला. “तुमच्या घरी उंदीर येतील ते बोलला नाही! मी फक्त डासांसाठी जाळी बसवून दिली होती.” माझ्या कडे यावर उत्तर नव्हते. त्याने पुन्हा एकदा भरीव रक्कम वसूल करून डास व उंदीर दोघां पासून सुरक्षित अशी जाळी बसवून दिली.

त्यानंतर आम्ही पण सोसायटी ग्रुपवर आमची रसभरीत कथा प्रकाशित केली आणि आमच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे नुकसानीचे आकडे सजवून रंगवून इतरांना सांगितले.

Sunday, 29 June 2025

कावळा - एक तुच्छ शोध

कावळा.. तसा तुच्छ असला तरी मुळीच दुर्लक्षित पक्षी नाही. आपण फारसे महत्त्व द्यायचे नाही ठरवले तरी ते दिले जातेच. मोबाइलच्या युगात चिमण्या दुर्मिळ झाल्या असल्या तरी कबुतरं आणि कावळे मात्र आपल्या खिडकीबाहेर ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि जाता जाता पोटं साफ करून जातात. तसा मला या पक्षांवर फारसा राग अथवा प्रेम नसले तरी मी कावळ्यावर एखादा लेख लिहावा असा एक क्षुद्र विचार.



एखाद्या दिवशी निवांत झोपावं, आणि उशीरा उठावं असं ठरवलं तर सहाच्या आधीपासून खिडकी बाहेर कावळा कर्रकश्श्य ओरडायला चालू करतो आणि झोपेचा सत्यानाश होतो. दुपारी थोडं आडवं व्हावं म्हणलं तर हा हमखास बोंबलून वैताग आणतो. याच्या कर्ण कर्कश्श “काव! काव!!” गजराने भयंकर चिडचिड होते. कदाचित याचमुळे चिडण्याला ग्रामीण भाषेत “कावणे” म्हणत असावेत. लोकांना मी पोपट पाळलेलं पाहीलं आहे, चिमण्या पाळलेलं पाहिले आहे, अगदी कबुतरं सुद्धा पाळलेलं पाहीलं आहे. पण कोणी कावळा पाळलेला माझ्यातरी माहितीत नाही.


खरं म्हणजे त्याच्या काळ्या रंगाचा मला मुळीच राग नाही पण का कुणास ठाऊक तो उगाचच बेरकी असल्या सारखा वाटतो. आणि इतरांना त्रास देण्यातच आनंद मानत असावा असा भास होतो. चोचीतून टपकणारी लाळ, काहीतरी लंपास करण्याच्या तयारीत असलेली भिरभिर नजर... यामुळे तो कोणाला आवडावा असा पक्षी मुळीच वाटत नाही. बंर, पळवलेला माल खाऊन टाकेल असेही नाही, हा बावळट, सगळं खाद्य वाटेत सांडत जातो. अरे! जर तुला खायचं नव्हतं तर पळवलंसच का? आमच्या बाल्कनीत अनेकदा पावाचे तुकडे, भजाचा घास, हडूक.. असलं काहीतरी पडलेलं दिसतं. त्या सर्वांचे श्रेय या काक महाराजांनाच जातं. कधी चुकून बाल्कनीत काही खात उभारलो तर हमखास हा कुठूनतरी अचानक येऊन झडप मारतो आणि खाद्य लंपास करतो. अशा अचानक होणाऱ्या आक्रमणाची मलाच भीती वाटते. त्याला मात्र माझी कधीच भीती वाटली नाही. कितीही हटकलं तरी हा जागचा हलत नाही. या वरून एक गोष्ट नक्की… मरणोत्तरांत माझ्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.


लहानपणीच्या चिऊ काऊ च्या कथेतील लाचार कावळ्यांची कधीच किव वाटली नाही; याउलट शेणाचं घर बांधणाऱ्या कावळ्याची फक्त घृणाच वाटली. रांजणात दगडं टाकून पाणी पिणारा चतुर कावळ्याची गोष्ट मला कधीच पटली नाही. हे डोकं कावळ्याचं असूच शकत नाही. कदाचित घारीला कथाकाराने चुकून कावळा समजलं असावं.


याच्या कोकलण्याच्या स्वभावाला अगदी ज्ञानेश्वरांनीही ओळखले होते. पैलतोगे काऊ कोकत आहे.. असे त्यांनी कौतुक केलेले आहे. रामायणात याच चावट कावळ्याने सीतेला त्रास दिला होता म्हणून रामाला त्याचा एक डोळा फोडावा लागला होता. याचा अर्थ कावळ्याच्या व्रात्यपणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदी भाषिक लोकानी “झूठ बोले, कौवा काटे। काले कौवे से डरीयो।” असे बोलून काहीतरी भयंकर गैरसमज समाजात पसरवले आहेत. एकतर सगळे कावळे हे काळेच असतात. “काले कौवे” काय? नीळा, पिवळा कावळा मी तरी पाहिलेला नाही. फारतर ठार काळा किंवा धुरकट काळा अशा दोनच शेड मी पाहिल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे खोटारड्या व्यक्तीला चावायचा या महाभागाला कोणी अधिकार दिला? असो! कदाचित उत्तरेकडील कावळे मराठी कावळ्यांपेक्षा जास्त सुज्ञ असतील.


कावळ्याच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कावळा शिवणे. याचा अर्थ कावळ्याने भाताचा घास खावा हे अपेक्षितच नसतं, त्यानं ते फक्त शिवावे! बिच्चारा कावळा! स्वर्गवासी व्यक्तीला बाकीचे सर्व पशू पक्षी सोडून कावळ्याच्या रूपातच का यावेसे वाटते हे एक नवलच! कोणी पोपट बना, मांजर बना… पण असो! जे धर्मग्रंथात नियम लिहिलेत ते मृत्यू नंतर ही पाळावेच लागतात. तर, चार पाच भाताच्या पिंडांमधून अचूकपणे योग्य ती पिंड निवडण्याची परीक्षा प्रत्येक मनुष्यामागे बिचाऱ्याला द्यावी लागते. अरे हा माणूस सदा सर्वकाळ मला हाकलत असतो आणि आज का एवढा उदार? अशी शंका त्यावेळी कावळ्याच्या मनात नक्कीच येत असणार. एखादा कावळा हुशार असलाच तर म्हणेल की माणसानं काहीतरी सापळा रचलेला दिसतोय. कावळ्याने पिंड शिवावा यासाठी याचना करताना मी पाहिलेले आहे. याचा अर्थ कावळा मराठी समजू शकतो. कदाचित सर्व भारतीय भाषांचे ज्ञान त्यांना अवगत असावे. परदेशी कावळे मात्र भाषेच्या ज्ञानात कुठंतरी मागास असावेत. त्यामुळे तिथं अशी रिस्क कोणी घेत नसावेत.


पुलंनी एकदा परदेशी प्राणीसंग्रहालयात कावळ्याला पाहील्यावर तो “क्रो क्रो” असे ओरडतो का अशी एक सहज शंका व्यक्त केली होती. त्यानंतर मी परदेशात गेल्यावर आवर्जून कावळ्यावर नजर ठेऊन होतो. त्याचा काव काव आवाज ऐकल्यावर मराठी भाषेची महती पटली. मनुष्य कितीही प्रगत झाला तरी त्याच्या दिनचर्येत कावळ्याचे स्थान अबाधित आहे. तसं त्याच्यावर भरपूर काही लिहावं इतकं काही मोठं त्याचं कृतृत्व नाही. तरीपण चार ओळी खरडून त्याला न्याय देण्याचा हा रिकामा प्रयत्न!

Sunday, 1 June 2025

एक घरगुती प्रश्न

तुम्ही घरमालक आहात का? तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे? एक फुकटचा सल्ला.. नको, ताबडतोब घर विका! भाड्याच्या फंदातच पडू नका. उगाच मनस्ताप! स्वानुभवाचे बोल आहेत. तरीपण धाडसी निर्णय घेताय? माझ्या लाख लाख शुभेच्छा!


मनुष्याच्या मुलभूत गरजांपैकी घर ही एक मुलभूत गरज आहे. चार भिंती आणि डोक्यावर छत इतकीच सोपी व्याख्या वाटली तरी प्रत्येकाच्या मनात एखादे छानसे घर दडलेले असतेच. ते छानसे हे कधीच लहानसे नसते, ते महालच असते. कथा कादंबऱ्या मध्ये “माझी झोपडी प्यारी” अशा पोकळ कल्पना उगाचच रंगवलेल्या असतात. अलिशान, दोन-तीन मजली, प्रशस्त अंगण, मोठाली गच्ची, मोठ्या मोठ्या बेडरूम्स, किचन, डायनिंग, हॉल, अशा अनेक खोल्या… कल्पनेतले घर हे कधीच टुमदार किंवा 1RK प्रकारात मोडत नाही. भले, स्वतःची लायकी काहीही असो.


काही कारणांमुळे अशी इच्छा पूर्ण होईलच असे काही नाही. विकत घेणं परवडत नसलं तरी भाड्यानं घेणं आवाक्यात बसू शकतं.. असा एक समज! त्यामुळे एक सोपा उपाय म्हणजे घर भाड्याने घेणे. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी एक जमात आपल्या सेवेत बसलेली असती.. ती म्हणजे घरमालक! किती भाडं देणार, किती कालावधी साठी राहणार आहात हे फारसे महत्वाचे नसते, तुम्हाला जसं हवं तसं घर देण्यासाठी घरमालकानं तत्पर राहणं बंधनकारक असतं. जावई देखील करणार नाहीत इतका हट्ट करण्याची भाडेकरूना मुभा असते. या अशा समजुती मधील बरेच निरागस भाडेकरू मी अगदी जवळून पाहिले आहेत. त्याना मी सेवा पुरवण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.


अगदी ठरवून नाही पण काही कारणाने आणि नशीबाने गेल्या काही वर्षात तीन चार घरांचा घरमालक बनण्याची मला भगवंताने शिक्षा ठोठावली. स्थावर मालमत्तेतून काही पैसे गाठीला सुटावेत इतकीच माफक अपेक्षा ठेवून मी गुंतवणूक केली. वास्तु मध्ये गुंतवलेले पैसे हे कालांतराने वृद्धिंगत होतात आणि शिवाय ते चोरीला जाण्याचे भय सुद्धा नसते, अशी माझी एक बाळबोध समजूत. लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा तो एका सोप्पा उपाय.. हा एक मोह!


असो! नानाविध पंथाचे, धर्माचे, भाषेचे भाडेकरू मी याची देही याची डोळा पाहीले आहेत आणि अनुभवले आहेत. सभ्य असोत वा भांडखोर असोत.. सर्वांची एकच माफक इच्छा असते, कमी भाड्यात राजेशाही थाट मिळावा. भाडेकरूचे नखरे हे घर पहायला येण्यापासून सुरू होतात. सांगितलेल्या वेळेला येतीलच याची खात्री नसते. आलेच तर घर बघताना प्रत्येक खोलीत जाऊन नाके मुरडतात. एकदा तर एका महाभागाने तब्बल पंचवीस सुधारणांची यादीच करून दिली. शिवाय भाडे मात्र कमी करण्याचा हट्ट होताच. एसी बसवून हवेत, किचन ट्रॉली हवेत, नवीन कपाटं हवीत, स्टडी टेबल, ड्रेसिंग टेबल, कपडे वाळवण्याचे रॉडस.. एक ना दोन! इतक्या सगळ्या सोयीच्या घरात त्याला सहा महिनेच रहायचे होते.


प्रत्येक भाडेकरू हा कशा ना कशा प्रकारे समस्या निर्माण करतात. कधी जाणून बुजून तर कधी अजाणतेपणाने आपल्याला एक नवीन अनुभव शिकवून जातात. माझ्या एका फ्लॅटमधे काही विद्यार्थी राहत होते. एक दिवस सकाळी लौकर मला सोसायटीच्या चेअरमन चा फोन आला. त्या विद्यार्थ्याकडे रात्री काही मित्र आले होते आणि ते सर्व लिफ्टमध्ये एकाच वेळी घुसल्यामुळे लिफ्ट नादुरुस्त झाली. त्यानी तर cctv चा व्हिडीओ पाठवून दिला. दहा लोकांच्या लिफ्ट मध्ये तब्बल अठरा लोक घुसले होते. आता मी काय करणार? भाडेकरू ला फोन केल्यावर त्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने दाखवले. मग पुढील दोन तास मी “अपराधी कौन?” मालिकेच्या डिटेक्टिव ची भुमिका बजावली आणि अखेरीस माझ्या भाडेकरून कडून लिफ्ट दुरूस्तीचा खर्च वसूल करण्याचे वचन दिले. एकदा एक तरूण जोडपे रहात होते. मुलगा कुठेतरी नोकरी करीत होता. कदाचित त्याची आर्थिक स्थिती ठिक नसावी. दर महिन्याला वेळच्या वेळेला भाडे देण्याचे कबूल केले असले तरी प्रत्येक महिन्याला मला वाट पाहून आठवण करावी लागे. एका महिन्यात तर मीच आठवण करायचं विसरलो आणि तो पण सोयिस्कर रित्या विसरला. पुढच्या महिन्यात त्यानं दिलेले भाडे नक्की कोणत्या महिन्याचे आहे हे समजायला मला चार दिवस लागले.


प्रत्येक भाडेकरू हा नवीन काहीतरी शिकवून जातो. प्रत्येकाचा हेतू शुद्ध असतो. घरमालकाला शहाणे करून सोडायचे...! एकदा एका भाडेकरूने घर सोडण्याच्या आधी महिनाभर मला विनंती केली, शेवटच्या महिन्याचे भाडे डिपॉझिट मधून वळते करा आणि उर्वरित रक्कम मला आत्ताच देऊन टाका. मी पण विचार केला.. बिचाऱ्याला पैशाची गरज असेल. मी ताबडतोब सर्व रक्कम देऊन टाकली. ठरल्या प्रमाणे शेवटच्या दिवशी घराची किल्ली त्याने दिली. घराची अवस्था पाहून मी घाबरूनच गेलो. सर्व भींतींवर त्याच्या चार वर्षांच्या मुलीने चित्रकला मुक्तपणे साकारली होती. सोफ्याचे कव्हर फाटले होते. दोन पंखे बंद पडले होते. किचन सिंकमधून पाणी गळून ट्रॉलीचे दरवाजे कुजले होते... आणि संपूर्ण घरात कचऱ्याचा डोंगर होता. डोकं सुन्न झालं. मला मुकाट्याने सर्व खर्च करण्याशिवाय पर्याय नव्हता.



कोरोनाच्या काळात अजून एक अनुभव! माझ्या सिंगापूरातल्या फ्लॅटमधे एक भारतीय भाडेकरू रहात होता. बिचारा चांगला होता. फारशा तक्रारी करीत नसे आणि वेळच्यावेळी भाडं पण देत असे. त्याच्या आणि माझ्या दुर्दैवाने आम्ही एका भयंकर परिस्थितीत अडकलो. काही कारणांमुळे तो आणि त्याची बायको भारतात आले होते आणि लॉकडाऊन लागले. मी पण भारतात! त्याला परत जाता येईना. त्यात त्याची नोकरी गेली. तो म्हणाला, “साहेब, लॉकडाऊनमुळे आम्ही अडकलो, कृपया फ्लॅटचं भाडं तरी माफ करा!” आता याची नोकरी जाण्याची मला शिक्षा झाली होती. त्यांचं सामान सिंगापूरमध्ये घरात आणि घराची किल्ली त्याच्याकडं भारतात! तो आणि मी दोघेही चिंताग्रस्त! अखेरीस त्यानं किल्ली कुरीयर करून माझ्या एजंटकडे पाठवली. त्या एजंटनं सर्व सामान बाहेर काढून त्याच्याकडे पाठवले. मला तर तो एजंट अगदी देवासमान वाटला. त्यामुळं मला भरभक्कम प्रसाद चढवावा लागला.


तुमच्या घरात जर विद्यार्थी रहात असतील तर काही वेगळेच अनुभव असतात. मुलं रहात असतील तर शेजारचे तक्रारी करतात. वेळी अवेळी येतात, दंगा करतात. घराचा उकीरडा करून टाकतात. आणि मुली असतील तर शेजारच्या काकूना त्यांचे वागणे खटकते. त्यांचे कपडे, त्यांचे मित्र, उशीरा घरी येणे. जणू काही या माझ्याच मुली असल्या प्रमाणे माझ्या कडे तक्रारी करतात. “या मुली रात्री बेरात्री येतात, आणि त्यांचे कपडे तर बघायलाच नको! तुम्ही जरा भाडेकरू नीट बघून ठेवत जा ना!” सगळ्यात गंमत म्हणजे घर भाड्याने देताना ज्या मुलांच्या अथवा मुलींच्या हातात किल्ली दिलेली असते, ती मुलं किंवा मुली घर सोडताना नसतातच. दुसरंच कोणीतरी किल्ली परत करून जातो. सर्व सोसायटींचा एक अलिखित नियम असतो, विद्यार्थ्यांना घर भाड्याने द्यायचे नाही. हा नियम कधी कधी इतका त्रासदायक ठरू शकतो की तुमचे घर दोन तीन महिने रिकामे राहू शकते. 


भाडेकरूंचे मुड हे शेअर मार्केट पेक्षाही वेगाने बदलतात. एका भाडेकरूने तर डिपॉझिट दिले आणि आठ दिवसात रहायला येतो सांगून गेला. जाताना रितसर ॲग्रीमेंट पण करून गेला. सहा दिवसानंतर फोन करून सांगितले की डिपॉझिट परत द्या तुमचा फ्लॅट नको आहे. मी तर अवाकच झालो. कारण काय तर त्याला दुसरा फ्लॅट मिळाला. डिपॉझिट जप्त करावे किंवा काही पैसे वळते करावे ठरवले तर त्याचे सतत फोन. ऑफिस ची कामं करू का याच्या फोनला उत्तर देत बसू? अखेरीस त्याचे सर्व डिपॉझिट परत करून सुटकेचा निश्वास सोडला. एका हुशार भाडेकरूने तर एक महिना राहिल्यावर सांगितले की घर सोडायचे आहे. कारण काय तर बायकोला पार्किंग मध्ये गाडी पार्क करता येत नाही. “अरे! तिला ड्रायव्हींग स्कूल मधे घाल.” असा खोचक सल्ला देण्याचा मोह मी टाळला.


प्रत्येक नवीन भाडेकरू रहायला येताना जरी सर्व कागदपत्रांची शहानिशा केली असली तरी ती व्यक्ती भविष्यात कशी वागेल हे कोणीच सांगू शकत नाही. आजकाल हे एजंट लोक पोलीस व्हेरीफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत आणि ॲग्रीमेंट चे रजिष्ट्रेशन इतक्या तत्परतेने करतात की आपल्यालाच त्या कागदांवरती शंका येऊ लागते. 


इतके सर्व अनुभव गाठीशी घेऊन मी आजही एक समर्थ घरमालक अशी भूमिका चोखपणे पार पाडीत आहे. येणाऱ्या प्रत्येक भाडेकरू बरोबर नव्याने गोड बोलून व्यवहार करीत आहे. कॅपिटल गेन टॅक्स नामक राक्षस मला फ्लॅट विकू देत नाही आणि आजही मी भाडेकरूंच्या सेवेत रूजू आहे.

Sunday, 27 April 2025

“शीत” युद्ध

खरंच! कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते. काल व्यवस्थित दिसणारी गोष्ट, आज बंद पडू शकते. या तत्वज्ञानाचं कारण म्हणजे आमचा फ्रिज! तसं त्याचं बरं चाललं होतं. गेली पाच वर्षे तो अगदी इमाने इतबारे आमच्या कुटुंबाला थंड ठेवत होता. 


सर्व काही सुरळीत चालू असेल ना तर त्या वस्तू चे अस्तित्वच आपण विसरून जातो. असंच काहीसं आमच्या फ्रिजच्या बाबतीत झालं असावं. बाहेर सूर्य आग ओकत असताना आमचा फ्रिज सरबतं, पेयं, आईस्क्रीम, फळं, भाज्या थंड ठेवत होता. मुलं जाता येता उगाचच दरवाजा उघडून नवीन काही पदार्थ दिसतोय का ते पहात होती. कितीही दरवाजा आदळला तरी आमचा फ्रिज मात्र वटवृक्षा प्रमाणे शांतपणे सर्वाना थंडावा देत होता.


आणि तो एक दिवस उगवला. शनिवारचा दिवस होता. पुढील दोन दिवस फक्त लोळून काढायचे असा मी विचार करत होतो. पण नियतीच्या मनात काही तरी तिसरेच होते. सकाळी उठल्यावर आमच्या लक्षात आले की फ्रिज थंड करायला विसरलाय. पाण्या पासून ते भाज्यां पर्यंत, सरबता पासून ते फळां पर्यंत सर्वच पदार्थानी शीत कटिबंधा कडून उष्ण कटिबंधाकडे प्रवास सुरू केला होता. आईस्क्रीम चे मिल्कशेक होऊ घातले होते.



आता काय करायचे? एवढा बाका प्रसंग ओढवल्यामुळं माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहीला. माझ्या वीकेंड चा सत्यानाश होणार, याची मला जाणीव झाली. फ्रिज कंपनीच्या सर्विस सेंटर ला फोन लावला. त्यांचा दिवस अजून सुरू व्हायचा होता. कदाचित दहानंतर भेटतील या आशेने मी दहा वाजण्याची वाट पहात बसून राहिलो. तोपर्यंत बायको आणि फ्रिज दोघांचे तापमान गरम होऊ लागले होते. मुलांनी पण उगाचच वाय-फाय बंद पडल्या प्रमाणे त्रागा करून घेतला. साधारण दहा वाजता मी पुन्हा एकदा फोन लावला. यावेळी एका मधुरभाषी व्यक्ती कडून माझी दखल घेण्यात आली. फ्रिजचे वय, वजन, उंची इत्यादी फालतू माहिती विचारून त्याने मला उपयुक्त माहिती दिली. तुमचा फ्रिज वॉरंटी मधे नाही. टेक्निशियन च्या व्हिजीट चे दोन हजार रूपये आणि त्यावर अठरा टक्के टॅक्स लागेल. शिवाय काही पार्ट बदलावा लागणार असेल तर त्याचे वेगळे.


मी विचार करून सांगतो… असं बोलून फोन ठेवला. काय करावे काही समजेना. माझा पैशाचा विचार बायकोला फारसा पटलेला दिसत नव्हता. तरीपण माझ्या मनाला नुसत्या व्हिजीटचे दोन हजार देणं पटत नव्हतं. मी इतर काही पर्याय मिळतात का ते पाहू लागलो. गुगल वरून टेक्निशियन चे नंबर शोधले. त्यातील दोन जणांनी वेळ नाही असं सांगून स्पष्ट नकार दिला. एकानं तर फुकटचा सल्ला दिला.. “साहेब वॉरंटी संपलीय त्याची. सरळ नवीन फ्रिज घेऊन टाका.” त्याला धन्यवाद बोलून दुसऱ्या नंबर वर फोन लावला. या वेळेस माझ्या प्रयत्नाना फळ मिळण्याची आशा पल्लवित झाली. या टेक्निशियन नं एक तासात येतो असे आश्वासन दिले. चारशे रूपये व्हिजीट फी आणि पार्ट चे जे होतील ते! मी ताबडतोब सौदा कबूल केला. दुपारी बारा वाजे पर्यंत येतो असे शब्द ऐकल्यावर सुटकेचा निश्वास सोडला.


फ्रिजमधील सर्व वस्तू आता चांगल्याच गरम झाल्या होत्या. भाज्या शेळपटून गेल्या होत्या. दही आंबट होऊ लागले होते. काही अन्न पदार्थाना वास येऊ लागले होते. बोलून आणि तहानेनं कोरड पडलेल्या घशाला थंड पाण्याची गरज होती. पण कोमट पाण्यानं घसा ओला करून घेणे चालू होते. बारा वाजून गेले, साडे बारा झाले. मी न राहवून परत फोन केला. वाटेत अजून एक काम आलंय ते करून पंधरा मिनीटात पोचतो.. असं सांगून त्यानं अजून वेळ मागून घेतला. शनिवारची दुपारची हक्काची झोप मला पाण्यात सोडावी लागणार होती.. आणि तेही कोमट!


लॉफ्टवर ठेवलेला जुना माठ काढण्याची मला आज्ञा झाली. त्याला स्वच्छ धुवून पाणी भरायचे काम बायकोने केले. पाणी थंड व्हायला किमान तासभर तरी लागणार होता. दरम्यान एक वाजला आणि मी टेक्निशियनवर चांगलाच वैतागलो. “तू येणार आहेस का नाहीस?” असं निरवाणीचं विचारण्यालाठी फोन लावला. “दहा मिनीटात पोचतोच आहे” असं सांगून त्यानं मला गप्प केले.


साधारण दिडच्या सुमारास त्यानं बेल वाजवून प्रवेश केला. त्याला पाहून मला तर अगदी देवदुत पाहिल्याचा आनंद झाला. त्यानं वेळ न दवडता फ्रिज ला चेक केलं. कॉम्प्रेसर चांगला आहे. असं सांगून त्याच्या आयुष्याची दोरी भक्कम असण्याची हमी दिली. अजून थोडे परिक्षण करून झाल्यावर त्याने सुतोवाच केले की “त्यातली एक मोटर खराब झालीय. ती बदलावी लागेल. ही मी काढून घेऊन जातो आणि असलीच नवीन घेऊन येतो. साधारण तीन ते साडेतीन हजाराची ती मोटर असते.” माझ्याकडे हो बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. एक तासात मोटर घेऊन येतो, असे सांगून तो चालता झाला. घरात फ्रिज सताड उघडा आणि त्याचे आतील सर्व अवयव बाहेर विखुरून पडलेले होते. दुपारचे अडीच वाजले होते.


सहज लक्ष गेले तर दिसले की माठ गळायला लागला होता. त्यातून टपटप पाणी सांडून किचन मधे तळं झालं होतं. बायकोनं किचन परत आवरले आणि मी तासभर विश्रांती घ्यावी या विचाराने थोडा आडवा झालो. आता चार वाजले तरी टेक्निशियनचा पत्ता नव्हता. मी त्याला फोन केला तर त्यानं दुसरा धक्का दिला. ती मोटर उपलब्ध नाही. बेंगलोर वरून मागवावी लागेल. आता मात्र मी त्याच्यावर भलताच वैतागलो. “ताबडतोब येऊन जी आहे ती मोटर परत बसवून जा आणि विखुरलेला फ्रिज होता तसा करून ठेव”. पाच वाजता विखुरलेला फ्रिज पुन्हा जोडूला तो गेला.


आता मात्र बायको सहीत घरातील सर्व सदस्यांची सहनशीलता संपत आली होती. बायकोनं ताबडतोब दुकानात जाऊन नवीन फ्रिज घेऊन येऊ असे फर्मान सोडले. माझ्या मनाची मात्र तयारी होत नव्हती. फटक्यात चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करायला मन तयार होत नव्हते. बायकोनं आणि मुलांनी इंटरनेट वरून मॉडेल पसंत पण करून टाकले. एक्सचेंज ऑफर मधे दोन हजार ची सुट, फक्त ट्रान्सपोर्ट खर्च अडीच हजार रुपये! डिल ऐकून मी डोक्याला हात लावला. आणि एकमताने मी निर्णय घेतला की अजून थोडा प्रयत्न करू.


अजूनही माझ्यातला मिडल क्लास संपलेला नव्हता. मी अजून कोणी दुसरा टेक्निशियन मिळतो का ते शोधू लागलो. प्रत्येकाला फोन करून मोटर बदलायची आहे असा सांगू लागलो. दोघा तिघानी तर मोटर चे हे मॉडेल बंद झाले आहे, तुम्ही आता फ्रिजच बदला. असा प्रामाणिक सल्ला दिला. मी मात्र हार मानायला तयार नव्हतो. सुमारे सहा च्या दरम्यान एका रिपेअर कंपनी कडून होकार आला. मोटर आमच्याकडे उपलब्ध आहे पण ती ओरीजनल कंपनीची नाही. असे सांगण्यात आले. तीन हजार मोटारीचे आणि व्हिजीट फी पाचशे. मी ताबडतोब सौदा मान्य करून त्याला येण्याची विनंती केली.


आता त्याचा टेक्निशियन सुमारे रात्रीचे आठ वाजता उगवला. एकंदरीत मला तो नवखाच वाटत होता. त्याला फ्रिज खोलायला बरेच कष्ट घ्यावे लागले. पण अखेरीस त्याने आधीची मोटर काढून नवीन बसवली. सुट्टे केलेले फ्रिजचे काही पार्ट त्याला बसवता येईनात. त्यानं ते तसेच ढकलून काम झाल्याचे सांगितले आणि साडे तीन हजार रुपये घेऊन चालता झाला. फ्रिज थंड होण्यासाठी तीन तास लागतील असा सल्ला देऊन गेला.


मी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि किमान रविवार तरी निवांत लोळून काढू अशा विचाराने झोपी गेलो. रविवारी सकाळी उठल्यावर आवर्जून फ्रिज उघडून पाहीला तर सर्व काही गरमच! आता मात्र माझं डोकं पण गरम झालं आणि गरगरायला लागलं. आठ वाजता पुन्हा त्या कंपनीला फोन केला. त्यांच्या मॅनेजरला सर्व माहिती दिली. आवाजात शक्य तितका सभ्यपणा आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो. त्या मॅनेजरने सुद्धा फार काही विशेष घडल्याचे न दाखवत, टेक्निशियन पाठवण्याचे कबूल केले.


आता मी सुद्धा नवीन फ्रिजसाठी मनाची तयारी सुरू केली. हा एक शेवटचा प्रयत्न असं स्वतःला समजावून सांगितलं. आणि टेक्निशियनची वाट बघत बसलो. सुमारे बारा वाजता टेक्निशियन उगवला. गेल्या दोन दिवसात हा तिसरा टेक्निशियन! हा थोडा अनुभवी वाटत होता. त्यानं पुन्हा एकदा फ्रिज उघडला. “साहेब, मोटर उलटी बसवलीय. चालायचंच! दोस्ताकडून चुक झाली पण मी सुधारतो की!” असं बोलून त्यानं मोटर काढली आणि सरळ बसवली. बाकीचे सर्व पार्टस त्यानं व्यवस्थित बसवले आणि निव्वळ पंधरा ते वीस मिनीटात काम संपवून बाहेर पडला. यावेळेस त्याने पैसे घेतले नाहीत.


अजूनही माझा त्याच्यावर विश्वास बसलेला नव्हता. मी एक पाण्याची बाटली भरून ठेवली आणि सुमारे दोन तास कोणीही फ्रिज उघडायचा नाही असे फर्मान सोडले. सुमारे दोन तासाने फ्रिज उघडला आणि अहो आश्चर्य! पाणी थंड झाले होते. आतले शेल्फ, डबे आता गारेगार झाले होते. 


आणि आमचा फ्रिज पुन्हा निरंतर सेवेमध्ये रूजू झाला.

Sunday, 6 April 2025

टायगर जिंदा है।

लेखाचा विषय आपल्या लक्षात आलाच असेल. अर्थातच आपला राष्ट्रीय प्राणी “वाघ”. आता या महान प्राण्यावर मी पामर काय लिहणार? तरीपण हा एक क्षुद्र प्रयत्न!


शतकानुशतके अबालवृद्धांना नेहमीच कुतूहल, भीती आणि आकर्षण वाटणारा एक सर्वसामान्य हिंस्त्र प्राणी. शक्यतो कोणाच्या वाटेला न जाणारा आणि निव्वळ पोटासाठी हत्याकरून गुजराण करणारा हा इवलासा जीव! कथा कादंबऱ्यात आणि सर्व चित्रपटात बिच्चाऱ्याची प्रतिमा उगाचच मलिन करून ठेवली आहे. आपण भलं, अन आपलं भक्ष्यं भलं! अशा साध्या सरळ शांत विचाराचा… असो! तर या अशा प्राण्याला मी फक्त चित्रपटात आणि पिंजऱ्यातच पाहीला होता. प्रत्यक्षात कधीतरी मुक्त संचार करताना पहायला मिळावे असे मला नेहमीच वाटे.


सुमारे पंधरा वर्षापुर्वी मला एका जंगलाला भेट देण्याचा योग आला. माझे आई बाबा, बायको आणि माझ्या दोन कन्या असा आमचा ताफा रणथंबोर ला भेट देण्यासाठी सज्ज झाला. आमच्या मुली तशा छोट्या होत्या. त्याना फारसं काही समजत नसलं तरी वाघोबाऽऽऽ असं काही तरी बोलून आम्ही त्यांच्या मनात भीती व कुतूहल निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.


रणथंबोर जंगलच्या कर्मचारी वर्गाला श्रीमंत करण्याच्या उदात्त उद्देशाने आम्ही उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आणि सुविधा विकत घेतल्या होत्या. मी आणि बाबानी तर हंटर कॅप घालून तेथील कर्मचाऱ्यांचा आणि वाघांचा उत्साह द्विगुणीत केला होता. मुलीना सर्वांकडून सतत सुचना चालूच होत्या. जंगलात मोठ्याने बोलायचे नाही, वाघाला हाय-हॅलो करायचे नाही, त्याच्या नजरेत रोखून पहायचे नाही… अनेक शास्त्रीय/ अशास्त्रीय सुचनांचा भडीमार केला गेला.



अखेरीस आम्ही आणि आमच्यासारखे अजून काही उत्साही प्रवासी एका मोठ्या कॅंटर उर्फ बिनछताच्या मिनीबसमधून जंगलात प्रवेश केला. सुमारे तीन तास आमच्या वाहनाने जंगलातील बरेच उंच सखल, रूंद अरूंद, खडकाळ सपाट, उन्हात, सावलीत अशी आमची रपेट घडवून आणली. जंगलातील झाडं, वेली, माकडं, बरीच हरणं आणि काही रंगबिरंगी पक्षी यांना निरखून आम्ही समाधान मानले. गरीब बिच्चारा वाघ मात्र कुठेतरी लपून बसला होता. मुकं जनावर, घाबरलं असेल! अशी आईनं सर्वांची समजूत घातली. आम्ही मात्र ऊन्हानं काळवंडलेले आणि धुळीने माखलेले चेहरे घेऊन मॅच हरलेल्या टिम प्रमाणे परत फिरलो. त्याचवेळी मी एक निर्णय घेतला, परत वाघासाठी जंगलाच्या दिशेने पाऊल टाकायचे नाही.


त्या नंतर बरीच वर्षे खुणावणाऱ्या वाघाला मुळीच भाव दिला नाही. नाही म्हणजे नाही! कशाला उगाच गरीब प्राण्याला कोड्यात पाडायचे? कशाला त्याची मानसिक कुचंबणा करायची? वाघांचे अनेक चित्रपट आले, ते दाखवून मी माझ्या मुलीना मोठे केले. प्राणी संग्रहालयात वाघाची ओळख शाबूत ठेवली.


बऱ्याच वर्षानंतर आमचा काझीरंगा जंगलात जाण्याचा प्रसंग आला. छोट्याशा जिपमधे बसून आम्ही चौघे जंगलात घुसलो. हे जंगल गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. अहो! पावलो पावली, गेंडे फिरत होते. अक्षरशः दहा मीटर वर गेंडे मस्तपैकी चरत फिरत होते. आम्ही त्यांना बघतोय, त्यांचे फोटो काढतोय, त्यांच्या जाडी आणि वजनावर त्यांची चेष्टा करतोय.. त्याना काहीच फरक पडत नव्हता. स्वतःच्याच धुंदीत निवांत फिरत होते. गेंड्यांना बरोबरी म्हणून का काय, पण जंगली हत्ती, विविध हरणे, माकडे पण मुक्तसंचार करीत होते. जणूकाही आमच्या येण्याने त्यांचे जीवन आनंदीत झाले होते. एकंदरीत या अनुभवा नंतर मी जंगलावरील गैरसमज दूर करण्याचे ठरवले. कसेही असले तरी ते सुध्दा हाडामासाचे प्राणीच आहेत! त्यांना सुध्दा कोणीतरी आपल्याला भेटायला यावे, आपले फोटो काढावेत, इंस्टावर टाकावेत.. असे नक्की वाटत असणार. बिचारे बोलत नसले म्हणून काय झाले! भावना तर नक्की असणार ना!



काझीरंगाच्या ताज्या अनुभवावरून उत्क्रांती वादाच्या सिद्धांतांवर विश्वास बसला. गेल्या पंधरा वर्षात प्राणी आता खुपच सुधारले असणार अशी खूणगाठ मनाशी बांधली. आणि नव्या उत्साहात मी अजून एक जंगल सफारी करायचे ठरवले. आता वाघ स्वतःहून पुढे येऊन गुड आफ्टरनून म्हणेल अशी एक शक्यता मनात घोळून गेली. तर यावेळेस आता आम्ही जिम कॉरबेट ला जायचे ठरवले. मी, सौ आणि आमच्या दोन्ही कन्या असा आमचा बेत ठरला.


आमची पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोचली. वाघाच्या ओढीने आम्ही लांबचा प्रवास न थकता करून जिम कॉरबेटला पोचलो. जिप्सी आणि कॅंटर अशा दोन्ही वाहनाच्या पर्यायाचे बुकींग करायचे ठरवले. वाघाला दोन वेळा भेटून ऋणानुबंध दृढ करावे असे ठरवले. हॉटेल वर पोचल्यावर आम्हाला सांगण्यात आले की कॅंटर चे बुकींग फुल्ल आहे. पण जिप्सी चे बुकींग होऊ शकते.


आम्ही ताबडतोब दुपारच्या जिप्सीचे बुकींग केले. टायगर को दोबारा देखने केलिये कल सुबह को हम फिर से जायेंगे। अशी आगाऊ सुचना जिप्सी वाल्याला देऊन ठेवली. वाघाच्या ओढीने आमचा थकवा पळून गेला होता. जंगलच्या प्रवेशद्वाराजवळ आमच्यासारख्या पंचवीस जिप्सी उभ्या होत्या. आमच्या सारखेच वाघाच्या ओढीने व्याकुळलेली जनता जिप्सी च्या रांगेत वाट पहात होती. इतक्यात एका इसमाने आमच्या जवळ येऊन त्याच्याकडील दुर्बिण आम्हाला दिली वजा लादली. दूरसे आप टायगर को देख सकते हो। ले लो। आमच्या ड्रायव्हरने पण आग्रह केला त्यामुळे नाही म्हणण्याची काही मुभाच नव्हती. वापस आने के बाद चारसो रूपये देना। असं सांगून तो पसार झाला. सुमारे तीन तास हे दोन किलोचे ओझे गळ्यात वागवण्याचे त्याला चारशे रूपये द्यावे लागणार होते.


आमचा नंबर आल्यावर एक जंगलचा कर्मचारी आमच्या गाडीत येऊन बसला. आपको टायगर दिखेगा और मै पुरे जंगलके बारेमें सब इन्फरमेशन दुंगा। असे म्हणत त्याने त्याचे हजार रूपये वसूल केले. जंगलच्या कायद्यात त्याची सेवा नाकारण्याची परवानगी नव्हती. जंगलात प्रवेश केल्यावर त्याने माहीती द्यायला सुरू केली. कोणी मोठ्यानं बोलू नका, गाडीतून उतरू नका.. अशा सुचनाच जास्त होत्या. बाकी या जंगलात दोनशेहून अधिक वाघ आहेत या माहीतीने मला हायसे वाटले. आता कदाचित झुंडच दिसणार अशी आम्ही मनाची तयारी केली. आमचा ड्रायव्हर वाघ मागं लागल्या प्रमाणे तुफान वेगाने गाडी पळवू लागला. बहोत अंदर जाना पडेगा। बाघ अंदर रहता है। त्याच्या बोलण्यातून एक प्रकारचा विश्वास दिसत होता. किमान अर्धा तास प्रवास केला तरी तुरळक हरणं वगळता कोणताच खास प्राणी नजरेस पडला नाही. अरे भैया, ये वाघ किधर लपून बैठा है? असा सौ ने विचारलेल्या प्रश्नावर गाईडला थोडासा राग आला. मैडम को बाघ तुरन्त दिखना चाहीये। अरे ये तो अपने मर्जी के मालिक होते है। आपको उसे देखना है तो मेहनत करनी पडेगी। असे काहीसे तत्वज्ञान देऊन त्याने आम्हाला गप्प केले.


आता जवळ जवळ आम्ही दिडतास फिरत होतो. गाडी कधी दगडातून तर कधी नदीच्या कोरड्या पात्रातून, कधी उंचवट्यावरून तर कधी खड्यातून तशाच वेगाने धावत होती. काही माकडं, बरीच हरणं या व्यतिरिक्त काहीही दृष्टीस पडले नव्हते. खरंतर बराच प्रवास करून आलो होतो आणि नीटशी झोपही झाली नव्हती. वाघाच्या दर्शना अभावी आमची झोप आम्हाला जाणिव करू लागली. 


आमची चुळबूळ थोडी शांत झालेली गाईडच्या लक्षात आले. त्यानं एका ठिकाणी त्या ड्रायव्हर ला गाडी थांबवायला लावली. दूर एका ठिकाणी छोट्याशा गुहे सारखे काहीतरी दिसत होते. उधर बाघ रहता है। अशी उपयुक्त माहीती दिली. वाघ जरी दिसला नाही तरी कधीतरी पत्र पाठवायला त्याचा पत्ता उपयोगी पडेल या भावनेने मी हो म्हणले. थोडी गाडी पुढं नेऊन त्या ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबला आणि गाडी मागं आणली. मातीकडं बोट दाखवत, ये टायगर के पंजोंके निशान है। मला तर तिथं फक्त विसकटलेली मातीच दिसत होती. तरीपण मी हो ला हो म्हणले. अजून पुढे गेल्यावर त्याने असाच ब्रेक दाबला. ये देखो, बाघीन और उसके बछडे के पंजे के निशान है। वोह छोटा है ना वो बछडे का है। देवाशप्पथ सांगतो, मला अजूनही तिथं फक्त माती आणि फिरणाऱ्या जिप्सीची चाकंच दिसत होती.



अशा आमच्या दोन अडीच तासांच्या भ्रमंती मधे आम्हाला अजूनही व्याघ्र दर्शन झाले नव्हते. आता मात्र आमचा सर्वांचा धीर सुटत चालला होता. कुठंतरी वाटेत थांबून तो गाईड माझ्या गळ्यात असलेली दुर्बीण मागून घ्यायचा आणि लांब फोकस लावून बोलायचा.. नही है। त्याने दिलेल्या माहीती नुसार काही हरणे वाघ जवळ असेल तर विशिष्ट आवाजात ओरडतात. आम्हाला असाच काहीतरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने आमची गाडी पळाली पण तो आवाज लुप्त झाला आणि वाघ काही दिसला नाही.


आता वाटेत एक छोटासा पाणवठा लागला. गाईडने सांगितले की टायगर इधर पानी पिने के लिए आता है। आम्ही थोड्या अंतरावर गाडी उभी करून वाघाची वाट बघत बसलो. वाघाला कडाडून तहान लागावी आणि तो इथं पाणी प्यायला यावा अशी प्रार्थना करीत आम्ही गाडीत बसून राहीलो. तब्बल अर्धा तास थांबून एखादा ससा सुध्दा तहानेन व्याकुळ झालेला पाहीला नाही. वाट पहाण्यात आमच्या जवळची पाण्याची बाटली मात्र रिकामी झाली.


असेच पुढे एका ठिकाणी काळ्या रंगाची घाण पडलेली होती. गाईडने ती वाघाचीच विष्ठा आहे अशी अमुल्य माहीती पुरवली.. एका झाडावर बरेच ओरखडे ओढलेले दिसत होते. ते सर्व वाघानं केले आहेत असे आम्हाला सांगण्यात आले. वाटेत भेटलेल्या एका  होतकरू प्रवाशाने सांगितले की ती काळी विष्ठा आणि त्या पाऊलखुणा त्याच्या दोन दिवसांपूर्वीच्या सफारी मधे पण दाखवल्या गेल्या होत्या. अजून एका पाणवठ्याजवळ आमची गाडी थांबली. साधारण दहा पंधरा मिनिटांनी मी त्याला नम्र विनंती केली, भैया, आज टायगर का मुड नही है। कही सो गया होगा। चलो अब वापस चलते है।


ड्रायव्हर ने पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी परतीच्या मार्गावर पळवायला सुरू केली. मी पुन्हा एकदा एक मॅच हरण्याच्या भावनेने परतलो. दुर्बीणीचे चारशे रूपये वसूल करून तो इसम पोबारा झाला. टायगर दिखा क्या? अशी एक साधी चौकशी करण्याची तसदी त्याने घेतली नाही. वाघाची त्या दुर्बीण वाल्या बरोबर, त्या गाईड बरोबर आणि ड्रायव्हर बरोबर काहीतरी मिलीभगत असणार अशी शंका वाटून गेली.


आम्ही दुसऱ्या दिवशीची सफारी रद्द करून हॉटेलवर मस्त आराम केला.