Sunday, 28 June 2026

भूत : एक शोधगाथा

प्रत्येकाच्या मनात भूत या कल्पनेबद्दल अनामिक भीती आणि कुतूहल लपलेलं असतं. लहानांपासून थोरांपर्यंत कोणीसुद्धा याला अपवाद नाही. जगभरातील सर्व संस्कृतींमध्ये नक्की सापडणारी गोष्ट म्हणजे “भूत”. नुसत्या शब्दोच्चारानेच मनात कुठेतरी भीतीची लाट उत्पन्न होते. आपल्या पूर्वजांनी घाबरून “भीती” हा शब्द उच्चारताना तो “भूत” असा उमटला आणि “भूत” हा शब्द तयार झाला, असा एक न सापडलेला शोध. लाखो पुस्तकं, कथा या भुतांवर लिहिल्या गेल्या आहेत. कदाचित देवापेक्षा मोठा वाचकवर्ग या भुतांचा असावा. या भुतांनी कित्येक नट, संगीतकार, गायक यांना, चित्रपटांपासून टीव्ही सिरीयल्सपर्यंत सर्व प्रकारातील कलाकारांना पोटं भरायला भरपूर खाद्य पुरवलं आहे.

सर्वमान्य मराठी संकल्पनेनुसार भूतं ही पांढऱ्या रंगाची असतात. हीच भूतं जिवंत माणसं असताना घडोघडी रंग बदलतात, अशी जरी तुमची तक्रार असली तरी भूतात परिवर्तन झाल्यावर बिचाऱ्यांना फक्त एकाच रंगावर समाधान मानावं लागतं. त्यांना पांढऱ्या रंगाचं कापड कोण पुरवतं याचा शोध चालू आहे. ही भूतं चालण्यापेक्षा हवेत तरंगत जाणं पसंत करतात. या भुतांना गुरुत्वाकर्षणाचा त्रास कसा काय होत नाही, कोण जाणे? न्यूटनचं भूत तरंगतं का चालतं? … एक सहज शंका. हाही शोध चालू आहे.



किरकोळ हातचलाखीयुक्त जादूचे खेळ यांना चांगले अवगत असतात. प्रत्येक भुताची काहीतरी अतृप्त इच्छा असायलाच हवी, असा हिंदू संस्कृतीत आग्रह आहे. तरीपण मला अशी बरीच भूतं ज्ञात आहेत, जी बिनकामाची, रिकामटेकडी उगाचच पिंपळाच्या झाडावर किंवा विहिरीत निवांत लटकत पडलेली असतात. काही भूतं बरीच निरर्थक कामं करीत असतात. उगाच मोकळी खुर्ची हलवायची, रिकाम्या झोपाळ्याला झोका द्यायचा, किचनमधली भांडी पाडायची, दरवाज्याला कडी लावत जायचं किंवा सगळे झोपले की हातात मेणबत्ती घेऊन फिरायचं… उद्दिष्टहीन जगणं… नाही, मरणं!


अजून एक महत्त्वाचा शोध… एकदा का तुमचं माणूसातून भूतात रूपांतर झालं की तुमचा आवाज बदलतो. तुमचा घसा कायमचा बसतो आणि साधंसोपं बोलणंसुद्धा कठीण होऊ शकतं. गायकांच्या भुतांचा आवाज कसा असेल, हा फालतू प्रश्न उपस्थित करू नये. तर त्यांच्या आवाजाला घाबरून न जाता, तो केवळ भुतांचा नाईलाज समजून सहानुभूती व्यक्त करावी, अशी सुज्ञ वाचकांना विनंती. गंमत म्हणजे काही कलाप्रेमी भूतं सुमधुर आवाजात गाणं गात हिंडत असतात. अशी भूतं बोलताना मात्र त्यांचा घसा बसलाय, हे लक्षात येतं. हा असाच एक शोध!


कोणी तरी शीतं समोर टाकून भूतं बोलवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय म्हणे; पण ती शीतं त्या भुतांनी खाल्ल्याचा पुरावा अजून सापडलेला नाही. काही मंडळींनी रक्त पिणारी भूतं असं काही वर्णन करून ठेवलंय. कदाचित पाण्याचं दुर्भिक्ष्य! महापालिकेचे पाणी त्यांना मिळत नसावे. बंर मग शिल्लक राहिलेल्या शरीराचं ही भूतं काय करतात, याचा अजून उलगडा झालेला नाही. संशोधन चालू आहे.


जाऊ दे! भुतांवर फार विज्ञान खर्च नको करायला. लहानपणी शाळेत भौतिकशास्त्र हा विषय भुतासारखाच भीती दाखवत दरवर्षी मानगुटीवर बसलेला असायचा. याच कारणावरून या विषयाचं नाव भौतिक पडलं असावं… एक न सापडलेला शोध!


या भुतांचं आवडतं पार्किंगचं ठिकाण म्हणजे वडाचा अथवा पिंपळाचा डेरेदार वृक्ष. गावाबाहेरील थंड वाऱ्यानं त्यांना मुळीच थंडी वाजत नाही. कदाचित यांचं शरीर पातळ पापुद्र्यासारखं असल्यामुळे वाऱ्यानं झाडपाल्यासोबत आपणसुद्धा उडून जाऊ, अशी यांना भीती असावी. याच कारणासाठी ते स्वतःला झाडावर लटकवून घेतात. आला वाऱ्याचा झोत की घ्यायचा एखादा झोका; आणि झाड सोडायचं नाही. आंबा, पेरू, चिक्कू अशा इतर वृक्षांवर यांची उपस्थिती अत्यल्प आढळते… एक सर्वेक्षण!


ही भूतं कधी घड्याळ वापरत नाहीत, तरीपण वेळेच्या बाबतीत अतिशय कडक! रात्रीचे बारा वाजले की यांची रात्रपाळी सुरू होते. दिवसभर उन्हाची कामं करायला त्यांना नकोसं वाटत असावं. पण रात्री बारा वाजले की लगेच कामाला लागतात. कर्तव्य म्हणजे कर्तव्य! कमकुवत दिसणाऱ्या भुतांच्या अंगात शक्ती येते ती अमावस्येला. याचा अर्थ ही भूतं चंद्रावरसुद्धा नजर ठेवून असतात. जसजसा चंद्र छोटा होऊन प्रकाश कमी होत जाईल, तसतशी यांची शक्ती वाढत जाते आणि चंद्र मोठा होऊ लागला की यांची शक्ती घटत जाते. चंद्रप्रकाशामुळे भरती येते आणि अमावस्येला ओहोटी येते, हे शिकलो होतो. पण भुतांचं हे उलटं तंत्र जरा शोधमोहीमेच्या बाहेरचं आहे.


या भुतांच्या कुवतीनुसार त्यांची विभागणी विविध प्रकारांमध्ये केलेली असते. त्यांच्या विभागणीनुसार त्यांना कामं वाटून दिलेली असतात. प्रत्येकानं आपापली भूमिका पार पाडली की झालं. गाणी म्हणणे, वाटसरूंना भीती दाखवणे अशा किरकोळ जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. संपूर्ण भूतव्यवस्था याच तत्त्वावर अविरत चालू असते. त्यामध्ये कधी गडबड, गोंधळ, भांडणं, जातीयवाद, मूकमोर्चे असे प्रसंग दिसून येत नाहीत. हा एक महत्त्वाचा शोध!


एक प्रसिद्ध पावलेला स्त्रीलिंगी भुतांचा प्रकार म्हणजे “हडळ”. भुतांचीच एक बहीण म्हणा हवं तर! ही हडळ काहीशी विद्रूप दिसते. शिवाय तिचा अवतारसुद्धा अजागळ आणि विचित्र असणं अपेक्षित असतं. स्त्री असूनसुद्धा त्यांच्या शक्ती मध्ये तसूभरही कमतरता आढळणार नाही. आवर्जून नोंद करण्याची गोष्ट म्हणजे स्त्रीयांना समान हक्काचा कायदा भूतसंस्कृतीत सापडतो. हा एक उल्लेखनीय शोध! या हडळ जमातीचा पुल्लिंगी प्रकार म्हणजे पिशाच्च! हे लोक तसे घाबरट! कुणाच्या अध्यात ना मध्यात! कुठंतरी गावाबाहेर लांब यांचं वास्तव्य! चुकून एखादा माणूस त्यांच्या वस्तीत गेला, तरच ही पिशाच्च त्यांच्याशी नातं जोडतात. एका शोधकर्त्याचा अनुभव!


हडळीची मानवी स्त्री साथीदार म्हणजे चेटकीण. समस्त चेटकीणी या म्हाताऱ्या, लांब टोकदार नाकाच्या आणि कुबड असलेल्या असणं आवश्यक असतं. तरुण अथवा जेन झी लोकांना या व्यवसायात प्रवेश बंदी आहे. या महिला वर्गाकडे माणसाचं पोपटात आणि पोपटाचं माणसात असे परिवर्तन करण्याची कला अवगत असते. महत्त्वाचं म्हणजे या चेटकीणीचं घर अतिशय गलिच्छ व किळसवाणं असतं. तिच्याकडे स्वच्छतेसाठी झाडू नसतो, अशातला भाग नाही. पण त्या झाडूचा वाहन म्हणून उपयोग केला जातो. या कारणानं घरातली स्वच्छता होऊ शकत नाही. कृपया अशी एखादी चेटकीण आपणास भेटल्यास तुमचे पोपटात रूपांतर होण्याआधी तिला एखादा फिलिप्सचा व्हॅक्यूम क्लिनर भेट द्यावा, ही विनंती.


चीनच्या भुतांची एक वेगळीच गंमत. ही भूतं बेडकासारख्या उड्या मारत चालतात. ही भूतं भारतीय भूतांसारखी प्रगत नसल्यामुळे तरंगत प्रवास करीत नाहीत. यांना तांदूळ आणि मांजर यांची भीती वाटते. बाकी वाघ समोर आला, तरी घाबरणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही भूतंसुद्धा चिनी लोकांसारखीच दिसतात.

पाश्चिमात्य भुतांचेही बरेच प्रकार. त्यांचा आवडता रंग काळा. काही प्रसिद्ध पावलेले प्रकार म्हणजे झॉम्बी, हॅलोविन, ड्रॅक्युला इत्यादी. या सर्व प्रकारांतील भूतांना माणसाला पकडून त्याच्या मानेवर दोन दात रुतवायला फार आवडते. या भुतांचा आवडता प्राणी म्हणजे लांडगा. चंद्राला पाठीमागे धरून उर्ध्व बांग दिली की या सर्व भुतांची शक्ती जागृत होते. हा एक पाश्चिमात्य शोध!


झॉम्बी प्रकारातील भुतांची गोष्ट थोडी वेगळी. या भुतांना डोक्याचा भाग जरा कमीच म्हणायला हरकत नाही. सतत गुरगुरत फिरत असतात आणि माणूस तावडीत सापडला की त्याच्या मानेचा मुका घेतात. माणसाशी उगाचच झोंबाझोंबी करतात म्हणून त्यांचं नाव झॉम्बी पडलं असावं, असा एक न पडताळलेला शोध!


सर्व भूतांच्या प्रकारांत एका गोष्टीचं साधर्म्य आढळते. प्रत्येकजण कशाला ना कशाला तरी घाबरतो. पाश्चिमात्य भुतांना क्रॉसची भीती वाटते, तर भारतीय भुतांना हनुमान चालीसेची. आपला उपाय किती सोपा आहे! हनुमान चालीसा पाठ केली की झालं! उगाच तो क्रॉस सांभाळत बसायला लागत नाही.


इतक्या संशोधनानंतरही खरीखुरी भूतं सापडलेली नाहीत; पण माणसाच्या मनातील भीती मात्र सहज सापडू शकते. एकदा भॉऽऽऽक! करून ने तपासून पहा.


वास्तविक पाहता द्वेष, मत्सर, ईर्ष्या, क्रोध, हाव हीच खरी भूतं आहेत. त्यांच्यापासून सुटका जी व्यक्ती करू शकेल, तिला कोणतीच आणि कधीच भीती स्पर्श करू शकणार नाही.

Wednesday, 24 June 2026

नाभिका रे

सामान्यतः केस वाढल्याची जाणीव इतरांना प्रथम आणि स्वतःला शेवटी होते. बायको, मुलं किंवा मित्र जेव्हा यावर भाष्य करतात तेव्हा आपल्याला नाभिकाची आठवण होते. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात कंटाळवाण्या दोन घटना, त्या म्हणजे दाढी आणि केशकर्तन! या घटना पुढं ढकलता येतात पण टाळता येत नाहीत.

आठवड्यातून दोन-तीन वेळा धारदार खोरे चेहऱ्यावरून क्रूरपणे फिरवावे लागतेच आणि महिन्यातून एकदा तरी न्हाव्यासमोर मान तुकवावी लागतेच. काही नशीबवान पुरुषांना देवाने टकलाचे वरदान दिल्यामुळे त्यांचा हा त्रास वाचतो. तरीपण साधारण चाळीशीला पोहोचेपर्यंत सलूनचे उंबरठे झिजवावे लागतातच. आमच्या खानदानात कोणीच टकले नसल्यामुळे माझ्या कपाळी नाभिक समुदायाचे जन्मजन्मांतरीचे नाते टिकून आहे.

केस कापणे हा पुरुषाच्या डोक्यावर करण्यात येणारा एक सामाजिक संस्कार आहे. तुम्ही अनेक गोष्टी त्याग करू शकता पण केशकर्तन पूर्णतः टाळू शकत नाही. केस वाढल्याची वर्दी सर्वप्रथम बायकोला लागते आणि मग एक हक्काची आरामाची रविवार सकाळ सलून व्यवसायाला प्रदान करावी लागते. अशावेळी मात्र टक्कल न पडल्याची खंत आवर्जून वाटते. लहानपणी केस वाढवण्याची इच्छा उराशी बाळगणाऱ्या पुरुषांना चाळीशीनंतर जे काही उरले आहेत तेवढे तरी टिकावेत एवढीच माफक अपेक्षा राहते.

सलूनमध्ये शक्यतो रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच भेट देणारा मी! तिथली तोबा गर्दी पाहून मला वाटते की भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा केशवाढीचा प्रश्न अधिक ज्वलंत आहे. आजकाल सलून एअरकंडिशन्ड असतात. पण तिथं बसायला जागा मिळेलच याची खात्री नसते. मुकाट्याने दुकानाच्या बाहेर टाकलेल्या बाकड्यावर बुड जमवावे लागते. मुख्य नाभिकाला किती वेळ लागेल असं विचारले तर एकच उत्तर, “साहेब, हे दोन झाले की लगेच तुम्हाला घेतो.” त्या दोनमध्ये प्रत्येकी दाढी, कटिंग, हेड मसाज, फेशियल, हेअरडाय असे सर्व सोपस्कार दडलेले असतात. प्रत्येकी सुमारे तासभर या न्यायाने दोन तास वाट बघणे क्रमप्राप्त असते. फाजीलपणे “मी नंतर येतो” असा शहाणपणा केला तर परत आल्यावर तुमचा नंबर पुन्हा एकदा शून्यापासून चालू होतो. “साहेब, काय करायचं, ही सगळी कधीची वाट बघत इथंच बसलीत.” अशी समजूत काढली जाते. त्यामुळे मी तिथेच ताटकळत वाट पाहणे पसंत करतो.


आपल्यासारखी बरीच मंडळी वाट पाहणाऱ्यांमध्ये सामील असतात. काही मंडळी समोर टाकलेली मासिकं चाळत असतात, काही समोर लावलेल्या टीव्हीवरील टुकार चित्रपट पाहण्यात मग्न असतात तर काही मंडळी फोनवरील रील्स बघत गालातल्या गालात हसत असतात. याहून वेगळी अजून एक कॅटेगरी असते. ते लोक सुसाट आत घुसतात, नाभिकाचा कंगवा किंवा पाण्याचा फवारा केसांवर मारतात. कामात व्यस्त असलेल्या नाभिकाबरोबर मित्रत्वाच्या गप्पा मारतात. हक्कानं त्याच्या पाठीवर थाप मारून निघून जातात. जिथे आपण मान खाली घालून बसतो अशा ठिकाणी हे लोक ताठ मानेने वावरतात; यालाच वरपर्यंत ओळख असणे असे म्हणतात.

आपला नंबर लागल्यावर एक स्वर्गीय आनंद होतो. गडबडीने मी नाभिकासमोरील खुर्चीत विराजमान होतो. बसमध्ये चढल्यावर खिडकीशेजारील सीट मिळावी किंवा लग्नात जेवायला पहिल्याच पंगतीत जागा मिळावी, तसा हा आनंद होतो. काही मंडळींचे नक्की कोणत्या नाभिकाकडून केस कापायचे यावरही प्राधान्य ठरलेले असते. त्यासाठी ते अधिक वेळ प्रतीक्षा करायलाही तयार असतात. मी अशा लोकांचे कौतुक करत, माझा नंबर लवकर लागला या आनंदात खुर्चीत विराजमान होतो. ज्याप्रमाणे “वदनि कवळ घेता” या श्लोकाचा तुम्ही काय खाताय याच्याशी काहीही संबंध नसतो, त्याप्रमाणे “केस केवढे कापायचे?” या प्रश्नाचा वास्तविक केवढे केस कापायचे या गणिती मोजमापाशी काहीही संबंध नसतो. ती एक फक्त औपचारिकता असते. तुम्ही काहीही सांगा, तो नाभिक आणि तुमचे नशीब हेच तुमच्या केसांचे भविष्य ठरवतात. राज्याभिषेक सोहळ्यात जसे डोक्यावर किरीट बसवले जाते तसे आपल्या गळ्याभोवती एक सुवासिक वस्त्र गुंडाळले जाते. त्या पवित्र वस्त्राने आजवर अनेक रंगाचे, वयाचे आणि वासाचे केस झेललेले असतात. आपल्या स्वच्छतेच्या संकल्पना अशा केशसंस्कारामध्ये आणायच्या नसतात. आता तुमचे हात, फोन आणि डोकं संपूर्णपणे नाभिकाच्या नियंत्रणात गेलेले असते. अहो! साधी शिंक आली तरी तुम्हाला नाभिकाची परवानगी घ्यावी लागते.

तुमच्या डोक्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेबरोबरीने नाभिक तुमच्याशी संवाद सुरू करतो. “कसे आहात? ऑफिस कसे काय? यंदा उन्हाळा फार वाढलाय हो!” आणि त्यानंतर तुम्ही फक्त “हो”, “बरोबर आहे”, “खरंय!” याशिवाय काहीच बोलू शकत नाही. पण नाभिक मात्र समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय मुद्दे, हवामानशास्त्र या सर्व विषयांवरील प्रगाढ पांडित्य आपल्यासमोर उलगडत जातो. “तुम्हाला कसं काय हो, हे सगळं माहीत?” हा प्रश्न विचारण्याचे माझ्यात तरी धारिष्ट्य नसते. पण जर कोणी तसं विचारलंच तर.. “अहो! ते आपले पाटील साहेब आहेत ना, अहो… ते हो! त्या पलीकडच्या सोसायटीतले… ते आपलेच कश्टंबर!” अशा प्रसंगी ते पाटील एका पतसंस्थेत क्लार्कचे काम करतात हा उलगडा करण्याचे कोणाचेच धाडस नसते.

सोसायट्यांमधील भानगडींपासून दिल्लीतील राजकारणापर्यंत कोणताही विषय घ्या…  हा नाभिक अतिशय आत्मविश्वासाने बोलू शकतो. या नेत्याचा नक्की काय डावपेच आहे आणि त्याने कसा मास्टरस्ट्रोक खेळला, या सर्व आतल्या गोटातील बित्तंबातम्या या नाभिक वर्गाला माहिती असतात. अहो! फक्त राजकारणच नाही तर माझ्या समोर एका सज्जन व्यक्तीला त्वचारोग आणि उपचार, आहारशास्त्र, आरोग्यदायी जीवनशैली अशा अनेक विषयांवर त्याने अधिकारवाणीने सल्ले दिलेले मी पाहिले आहेत.

केस कापून झाल्यावर आपल्याला जो आरसा दाखवून “कसं झालंय?” हा प्रश्न विचारला जातो, तो केवळ एक शिष्टाचार असतो. तुमच्या अभिप्रायावर इथे कोणत्याही कृतीची शक्यता नसते. तुम्हाला आवडो वा न आवडो, जे आहे ते स्वीकारावेच लागते. नाभिकाला दिलेले “छान!” हे उत्तर खोटे बोलणे होऊ शकत नाही. याला आलेल्या परिस्थितीला आनंदाने स्वीकारणे असे म्हणतात.

कटिंग संपल्यावर आपल्यासमोर दोन पर्याय ठेवले जातात. दाढी आणि हेड मसाज. मला हेड मसाज प्रचंड आवडतो. पैसे देऊन डोक्यावर मार खाण्याचा हा जगातील बहुधा एकमेव लोकप्रिय प्रकार असावा. वास्तविक या संपूर्ण संस्कारातील तोच एक माझ्या आवडीचा भाग आहे. एक लयबद्ध आवाज करत डोक्यावर आघात होऊ लागतात. तेव्हा मेंदूमधील सर्व वाहिन्या आणि मज्जातंतू कार्यरत होतात. हा कार्यरत झालेला मेंदू पुढील दहा मिनिटांत पुन्हा निष्क्रिय होत असेल तर कृपया बिचाऱ्या नाभिकाला दोष देणे योग्य नाही. तो तुमच्या मेंदूचाच दोष असू शकतो.

केस कापून आल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आपण स्वतःला आरशात खूप वेळा पाहतो. तिसऱ्या दिवसापासून पुन्हा सगळं विसरून जातो. मग आयुष्य पूर्ववत सुरू होते. आणि एक दोन महिन्यांनी कोणीतरी आपल्याला आठवण करून देते.. केस वाढलेत. आता बघवत नाही.

Sunday, 21 June 2026

सहलीस जावे

प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान एकदातरी कुठेतरी लांब फिरायला जावे असे सतत वाटत असते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक विश्रांती हवीशी वाटते. शिवाय काहीतरी नवीन पाहून, अनुभवून पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू अशी आशा असते. दमलेल्या आयुष्याला एका ट्रिपचा रिचार्ज मारणे हे अतिआवश्यक असते. आमचे कुटुंब यातून सुटलेले नाही. वर्षातून किमान एकदा कुठेतरी भेट देऊन तिथल्या स्थानिक व्यवसायांना वृद्धिंगत करण्याचे हे राष्ट्रीय कर्तव्य आम्ही अनेक वर्षे चोखपणे पार पाडीत आलो आहोत. 

सहलीला जाण्याचे ठरल्यानंतर सर्वप्रथम प्रश्न येतो.. कुठे जायचे? सर्वांची मते घेतली जातात आणि एकमताने बायकोने ठरवलेल्या ठिकाणीच जाण्याचे ठरते. त्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे संपूर्ण प्रवासाचे प्लॅनिंग - कोणत्या दिवशी निघायचे ते कुठे राहायचे, काय पाहायचे, शिवाय कुठे काय खरेदी करायची या सर्व गोष्टींचा आराखडा बनवण्याची अवघड जबाबदारी बायकोवर येऊन पडते. मी मात्र फक्त सोपी कामं माझ्याकडे ठेवतो. तिकीटं काढणे, हॉटेलचे बुकिंग करणे आणि शॉपिंग करून झाल्यावर काउंटरवर बिलं भरणे इत्यादी.



बॅगा भरणे हा एक मोठा प्रोजेक्ट असतो. माझ्या मुली आणि बायको यांची एक नेहमीची तक्रार - प्रवासात घालायला कपडेच नाहीत. जे आहेत ते पूर्वीच्या ट्रिपमध्ये घातल्यामुळे ते सगळ्या फोटोत आले आहेत. आता आम्हाला नवीन कपडे घ्यायलाच हवेत. तुमचं काय! तुम्हीतर कित्येक वर्षांपासून सेमच कपडे घालता. आम्हाला नवीन कपडे ताबडतोब घ्यावेच लागतील. अशा युक्तीवादाचे तात्पर्य नवीन कपडे खरेदीमध्ये होते. अशा संवादाला सांसारिक शास्त्रामध्ये नवऱ्याकडून किंवा वडिलांकडून संमती मागणे असे म्हणतात.. असा गैरसमज जनमानसात पसरला आहे. वास्तविक ती केवळ निर्णयाची अधिकृत सूचना असते. अजून एक महत्त्वाचे निरीक्षण - जाताना सहज भरलेली बॅग परत येताना भरूच शकत नाही. त्यामुळे चाणाक्षपणे बायकोने एक दोन फोल्डेबल बॅग्ज बरोबर घेतलेल्याच असतात. त्यामुळे परतीला बॅगांची संख्या वाढलेली असते.


प्रवासाच्या ऐनवेळेपर्यंत सर्व कामे आटपणे चालूच राहते. दूधवाला, पेपरवाला, कामवाली यांना सुट्टी देणे, सर्व आवश्यक वस्तू बॅगेत भरणे अशी सर्व महत्त्वाची कामे शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहतात. आठ दहा दिवस बाहेर राहणार असल्याने सर्व झाडांची काळजी कोण घेणार अशी चिंता दूर करण्यासाठी शेजारी धावून येतात.


अखेरीस सर्व तयारी झाली की प्रवासाचा दिवस उगवतो. ऑफिसचे फोन आता आठवडाभर घ्यायचे नाहीत या वचनावर आमचा प्रवास सुरू होतो. घरापासून एअरपोर्टला पोहोचेपर्यंत मला चार फोन आलेले असतात. कितीही छान तयारी केली तरी काहीतरी विसरलेच पाहिजे असा कदाचित योग्य नियोजनाचा भागच असावा. त्यात जर शंकेखोर मुलीने बोर्डिंगच्यावेळी प्रश्न विचारला “आई, गिझर बंद केला होता ना?” तर मात्र संपूर्ण प्रवासात गिझर डोक्यात चालूच राहतो.


बऱ्याचदा इप्सित स्थळी पोचण्यासाठी विमान प्रवासाच्या बरोबरीने टॅक्सीचा प्रवास सुद्धा क्रमप्राप्त असतो. आधीच ठरवलेला टॅक्सी चालक वाट पाहत उभा असतो. आपल्याला तो विमानतळाच्या दारात उभं करून कुठेतरी लांब उभी केलेली टॅक्सी आणायला निघून जातो. तब्बल अर्धा तास ताटकळल्यानंतरच त्याच्या टॅक्सीचे दर्शन घडते.


माझे एक निरीक्षण - भारतात तुम्ही कोणत्याही भागात फिरायला जावा. सर्व टॅक्सीवाले एकसारखेच वागतात. त्यांच्या अशा वर्तनाचा आणि त्यांचे राज्य, भाषा, वर्ण, रंग-रूप यांचा काहीही संबंध नसतो. स्थानिक राजकारणापासून ते तेथील संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास असतो. या चालकाच्या मते, ते आणि त्यांचे मित्रमंडळी हेच फक्त टॅक्सीची सर्वोत्तम सर्व्हिस देऊ शकतात. बाकी सर्व टॅक्सीवाले हे भुरटे आणि पैसे उकळण्यासाठी धंदा करतात. केवळ तो एकटाच हा व्यवसाय अगदी सचोटीचा करतो, असे त्याचे ठाम मत असते. गाडीमध्ये जर छानशी गाणी लावा अशी विनंती केलीच तर फक्त त्यांच्याच आवडीची गाणी वाजवली जातात. वाटेत जर भूक लागली आणि एखाद्या हॉटेलपाशी थांबण्याची विनंती केली तर फक्त त्यांच्याच आवडीच्या हॉटेलच्या दारीत गाडी थांबवली जाते. तिथं पोचायला अजून दोन तास लागले तरी चालेल. एकंदरीत या चालक वर्गाची मनमानी आणि मर्जी सांभाळतच प्रवास पार पाडावा लागतो.


हॉटेलवर चेक-इन केल्यानंतर सर्वांचा जिव्हाळ्याचा एकच प्रश्न असतो.. वायफायचा पासवर्ड काय आहे? जणू काही त्याशिवाय आपला श्वासच कोंडून जाण्याची दाट शक्यता असते. चुकून माकून एखाद्या हॉटेलवरील वायफाय चालत नसेल तर ते हॉटेल ताबडतोब शून्य रेटिंगमध्ये गणले जाते. रूमवर पोचल्यावर साधारणपणे दोन गट पडतात. एक गट उत्साहात तयार होऊन बाहेर भटकायला सज्ज होतो तर दुसरा गट दमून आता जरा विश्रांती घेतो या मताचा असतो. अर्थातच माझा गट दुसरा आणि बायकोचा पहिला. मुलींना माझ्या गटात सामील व्हायचे असते पण ऐनवेळी आईच्या दबावाखाली त्यांची मतफोडी होते.


जेव्हा घरी असतो तेव्हा आवरून तयार होण्याचा क्रम मी प्रथम, बायको दुसरी आणि मुली शेवटी असा असतो. पण सहलीला गेल्यावर क्रम बदलतो. बायको प्रथम, मी दुसरा आणि मुली शेवटीच. पाच मिनिटांत आवरतो म्हणणाऱ्या माझ्या मुली किमान अर्धा तास लावतात. अजून एक शाश्वत सत्य… हॉटेलमध्ये मिळणारा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट “आत्ता भूक नाही” या सबबीवर कमी करणाऱ्या मुलींना पुढील निव्वळ एका तासात प्रचंड भूक लागते. या अनुभवासाठी त्यांच्या वयाची मर्यादा नाही.


बायकोची आज कोणती ठिकाणे बघायची याची एक चेकलिस्ट तयार असते. त्यात फारशी कोणी ढवळाढवळ केलेली तिला खपत नाही. हे खूप छान आहे, त्याचे युट्युबवर रिव्ह्यू खूप सुंदर आहेत.. या दाखल्यांसमोर आम्ही आमची शस्त्रे टाकून तह पत्करलेला असतो. मुली लहान असताना काही वेळातच कंटाळायच्या आणि रडायच्या, आता पण कंटाळतात आणि परतीचा हट्ट करतात. मी मात्र मुकाट्याने आज्ञेचे पालन करीत चेकलिस्टला न्याय देतो. “आता हे शेवटचे ठिकाण” या नावाखाली आम्ही अजून तीन चार ठिकाणे पाहूनच हॉटेलवर परततो. खरी मजा येते जेव्हा एखादे नवीन ठिकाण यादीत ॲड होते. मुली, ड्रायव्हर आणि मी विरोधात असलो तरी बायकोची बाजू घेऊन मला ड्रायव्हरवर दमदाटी करावी लागते. मुलींवर आईची दमदाटी झाली की ते नवीन ठिकाणसुद्धा आमच्या अजेंडामध्ये ॲड होऊन जाते.


मुली मोठ्या झाल्यापासून त्या आणि त्यांची आई यांची एक स्वतंत्र टोळी बनली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ते पहायला आलोय का फक्त फोटो काढायला आलोय अशी शंका येईपर्यंत दीडशे ते दोनशे फोटो काढले जातात. मला बऱ्याच फोटोंमध्ये जबरदस्तीने ओढले जाते आणि कृत्रिम हास्य दाखवत मी पण फोटोंच्या महासागरात वाहवत जातो. तरीसुद्धा मला सतत “बाबा, फोटोत जरा हसा.” अशा सूचना मिळत असतात. हसण्याची अट माझ्या मुलींना नसते. फोटोत काहीतरी चित्रविचित्र चेहरे करून, जीभ बाहेर काढून किंवा अतरंगी पोज घेऊन फोटो काढल्याबद्दल त्यांचे त्यांच्या आईला प्रचंड कौतुक! माझ्या एकाच पोजवर मात्र असंख्य टिकास्त्रे!!


“पुढचा पॉइंट इथंच आहे”.. असं आश्वासन देत टॅक्सीवाला आम्हाला किमान पंचवीस किलोमीटर घेऊन जातो. प्रवासाच्या सुरुवातीच्या तासाभरातच कंटाळलेल्या जीवांना पुढील सात आठ तास तो प्रवास नकोसा वाटतो. प्रत्येक स्थळाला भेट देत असताना माझे लक्ष सर्वांवर असते. उगाच कुणी रेंगाळू नये आणि मागे राहून कोणी चुकू नये इतकीच माफक अपेक्षा. पण म्युझियम असो वा एखादे उद्यान, फोटो काढत टाइमपास करण्याची माझ्या कुटुंबाला प्रचंड हौस! मी मात्र मेंढरं हाकणाऱ्या मेंढपाळासारखा सतत ओरडत राहतो. वेळेचे भान हा केवळ माझा विषय असतो आणि बाकीच्यांनी तो ऑप्शनला टाकलेला असतो. परतीला थोडा जरी उशीर झाला तर ड्रायव्हरच्या माझ्याकडे तक्रारी सुरू होतात आणि त्याला समजावताना माझी मात्र दमछाक होते. अखेरीस जास्तीचे पाचशे रुपये देऊन त्याची उपकारफेड करावी लागते.


सहलीमधील खरेदी हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. मला खरेदीपेक्षा निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात व डोळ्यात बंद करायला आवडते. माझ्या कुटुंबाला मात्र कपडे खरेदी किंवा स्थानिक वस्तू खरेदीमध्ये प्रचंड रस. सहलीपूर्वी केलेल्या खरेदीचा या नवीन खरेदीशी तसा तात्त्विकदृष्ट्या कोणताही संबंध नसतो. आणि वस्तूंचे विचाराल तर त्या विकत घेताना जितक्या प्रेमाने न्याहाळल्या जातात, त्याहून कैकपटीने अधिक घृणेने त्यांना काही महिन्यांतच अडगळीतून उचलून फेकताना पाहिले जाते. त्या फोल्डेबल बॅग्ज दुथडी भरून वाहण्यात या वस्तू आणि कपडे यांचा सिंहाचा वाटा असतो.


सर्व स्थळांना योग्य न्याय देत आम्ही ट्रिपच्या अखेरच्या दिवसापर्यंत पोचतो. आठ-दहा दिवस कसे भुर्रकन उडून गेले याची खंत सर्वजण बोलून दाखवतात. मी मात्र माझे लाखभर रुपये कसे भुर्रकन उडून गेले या हिशोबात असतो. एखादे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात आम्ही विमानतळावर तीन-चार तास लवकरच पोचतो. तिथल्या लाउंजमध्ये मला एकट्यालाच प्रवेश असल्याने विमानतळावरच टाइमपास करण्याचा निर्णय घेतो. सबवे, बर्गर किंगपासून कन्नू की चाय आणि बेस्ट ऑफ साऊथ यांचे हजार-दोन हजारचे देणे देऊन टाकावे लागते. मागील जन्माचे देणे… अजून काय?


एक विदारक सत्य… वर्षभराच्या धकाधकीचा शिणवटा घालवण्यासाठी सहलीला जाऊन आम्ही इतके दमून येतो की परतल्यावर आम्हाला अजून दोन दिवस सुट्टी काढून घरातच मस्तपैकी विश्रांती घ्यावीशी वाटते. सहलीचा सगळा थकवा, खर्च आणि गोंधळ विसरायला साधारण सहा महिने लागतात. आणि मग पुन्हा एकदा घरात चर्चा सुरू होते… ‘यावेळी कुठे जायचे?’

Tuesday, 19 May 2026

लिफ्ट करा दे!

आपला एक टुमदार बंगला असावा, दारात एक मोटर कार असं छोटसं स्वप्न प्रत्येकाने रंगवलेलं असतं. पण नशिबात काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं. शहरीकरणाच्या शर्यतीमध्ये उंच उंच इमारतींमध्ये खुराड्या इतकी जागा मिळवून आयुष्य काढावे लागते. अशा उंच इमारतींचा एक अविभाज्य घटक म्हणजे लिफ्ट!

पूर्वी लिफ्टमधून जाण्याचे एक अप्रूप असायचे. त्याकाळी जाळीचे लोखंडी दरवाजे बंद करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागत असे. दोन्ही दरवाजे बंद झाल्याशिवाय लिफ्ट जागची हलायची नाही. एखाद्या महाभागाने जर चुकून दरवाजा नीट बंद नाही केला तर लिफ्ट न थकता बंद करण्याचा सल्ला ओरडत राही. दरवाजा आपोआप बंद होण्याचे तंत्रज्ञान त्या काळात का नव्हते याचे कोडे मला आजही पडले आहे. लिफ्टचा दरवाजा बंद करतानाचा त्याचा धडकण्याचा आवाज ऐकल्यानंतरच लिफ्ट जागची हलत असे. बंद दरवाज्यामागील भिंतीचे निरीक्षण करीत आपला प्रवास पार पडत असे. गुटख्याच्या पिचकाऱ्यानी भिंत रंगवणाऱ्या लोकांचे सुप्त गुण दाखवण्याची ती एक हक्काची जागा होती. आता आपोआप बंद होणाऱ्या दरवाज्यांच्या संस्कृतीत त्या कलेची गळचेपी होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्याकाळी लिफ्ट ही एक अतिशय चिंचोळी आणि अस्वच्छ जागा असायची. घरं एक वेळ मोठाली सापडतील, पण लिफ्ट मात्र तोकडी. चुकून तीन माणसं एकावेळी घुसली तर मुंबईच्या लोकलपेक्षा अधिक दाटीवाटी. बऱ्याचदा तर लिफ्टमधे ठार अंधार असे किंवा रामसे बंधूच्या चित्रपटात शोभेल असा पुकपुकणारा किरकोळ बल्ब! अशा अनेक लिफ्टमधून मी अनेकदा प्रवास करून सुखरूप जीवंत बाहेर पडलो आहे.

हळू हळू काळ बदलला तसा लिफ्टचा चेहरा मोहरा देखील बदलू लागला. रूंद आकार, एकावेळी दहा लोक ऐसपैस उभे राहतील एवढी जागा, आपोआप बंद होणारे दरवाजे, स्वच्छ प्रकाश, मागील भिंतीवर पूर्ण आकाराचा आरसा, मजल्याचा आकडा दाखवणारा डिजिटल डिसप्ले, आणि डोक्यावरील फॅनमुळे खेळती हवा. काही लिफ्टमध्ये तर सुमधुर संगीत सुद्धा ऐकवले जाते. आता तर सामान ने-आण करण्याची एक स्वतंत्र लिफ्टची सोय पण केलेली असते.

आजही मी असे अनेक लोक पाहिले आहेत ज्यांचा एका गोष्टीवर हमखास गोंधळ उडालेला असतो. वरच्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी लिफ्टला वर (UP) येण्याची आज्ञा द्यावी का खाली जायचे म्हणून DOWN चे बटण दाबावे? या गोंधळात हे लोक इतर लोकांचा वेळ घालवतात. अजून एक हमखास होणारा गोंधळ म्हणजे स्वतःचा मजला येण्याआधीच जर चुकून दरवाजा उघडला तर बाहेर पडून “अरेच्चा!” म्हणत परत लिफ्टमध्ये घुसणे! असं म्हणतात की काही मैत्री या लिफ्ट पुरत्या मर्यादित असतात आणि जर चुकून बाहेर कधी भेटलेच तर एकमेकांना ओळख दाखवतीलच याची खात्री नसते. अशा मैत्री या निव्वळ एका स्मित हास्याच्या किंवा फार तर “गुड मॉर्निंग” पुरत्या बनलेल्या असतात. परदेशात तर म्हणे बऱ्याचदा काहींची हृदयं लिफ्टमध्येच जुळतात आणि… आणि काही नाही!


ऑफिसच्या लिफ्ट तर अजूनही मोठ्या असतात. पंधरा ते वीस लोक मावतील अशा प्रशस्त बनलेल्या असतात. आजकालच्या IT Park मध्ये पंधरा मजली इमारतीत किमान पंचवीस कंपन्या असतात आणि आठ ते दहा हजार नोकरदार असतात. अशा वेळी तर दहा लिफ्ट ची सोय असून सुद्धा त्या कमीच पडतात. कधी कधी तर लिफ्टमध्ये जागा मिळण्यासाठी अर्धा अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. अशा लिफ्टमध्ये हमखास घडणारा प्रकार म्हणजे overload message. सर्वजण शेवटी घुसलेल्या व्यक्तीकडे भयंकर नजरेने पाहतात आणि बिच्चाऱ्याला मुकाट्याने बाहेर पडावे लागते.

लिफ्टमध्ये वागण्याच्या अनेक तऱ्हा असतात. काहीजण आत शिरल्याक्षणी खिशातून मोबाईल काढतात आणि उगाच जुने मेसेजेस वाचू लागतात. काहींना आरशात स्वतःलाच निरखण्याची सवय असते. काही महिलांना लिफ्टमधील आरशात बघून मेकअप करायचा असतो. काही लोकांना तर ईप्सित स्थळी पोचण्याची इतकी घाई असते की ते मजल्याचे बटण वारंवार दाबून लिफ्टचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी कोणी लिफ्टमध्ये आले की त्यांच्या परफ्युमचा सुगंध पसरतो किंवा कोणी आज डब्यात आणलेल्या खमंग भाजीचा सुगंध जिभेवर चव निर्माण करून जातो. माझे एक सहज निरीक्षण… लिफ्टमध्ये घुसता क्षणी सर्वजण अचानक शांत होतात! का ते मला माहीत नाही. जणू तिथं मौनव्रताचा नियमच आहे. कधी जर सोसायटीमधील व्रात्य कार्टे आपल्या बरोबर घुसले तर सर्व मजल्याची बटणं दाबून अगदी संताप आणतात.

सर्व सामान्य लोकांच्या मनात असलेली एक भीती… मी आत असताना लिफ्ट बंद पडली तर! ते ईमर्जन्सी चे बटण ऐनवेळी धोका तर नाही ना देणार? नेमके मोबाईलला आतमध्ये नेटवर्क का येत नाही? मग मी बाहेरच्या लोकांना कळवणार कसा? आणि कोणाला कळवणार? आत पुरेसा श्वास घेता येईल ना? … असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत असतात. तरीपण लिफ्टचा वापर हा अनिवार्य आहे. मी स्वतः बऱ्याचदा लिफ्टमध्ये अडकलो आहे. मला अशा सर्व अनुभवांचा गाढा अनुभव आहे. अनेकदा लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद पडली पण जनरेटरने मला काही मिनिटांत सहीसलामत जीवंत बाहेर काढला आहे.

लिफ्टमध्ये अडकण्याचा माझा अजून एक मोठा अनुभव आहे. आमच्या सोसायटीमध्ये काही नशीबवान लोकांना तिसऱ्या मजल्यावर पार्किंग दिले आहे. तिथं पर्यंत पोचण्यासाठी कारलिफ्ट देण्यात आली आहे. शून्य ते तीन आणि तीन ते शून्य इतकाच माफक प्रवास या लिफ्टकडून अपेक्षित आहे. आख्खी कार या लिफ्टमध्ये जाते आणि ती अलगद तिसऱ्या मजल्यावर पोचते. काही जागरूक शेजाऱ्यांना या लिफ्टच्या आकारावरून जोरदार आक्षेप आहे. मारूती अल्टो वरून फॉरट्युनर SUV अपग्रेड करता येणार नाही अशी खंत काहींनी व्यक्त करून झाली आहे.

तर… मी असाच एकदा ऑफिसच्या घाईत तिसऱ्या मजल्यावरून माझी गाडी घेऊन खाली येत होतो… आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला, थोडी थरथरली अन मग एका जागेवर थबकली. माझ्या गडबडीच्यावेळी लिफ्टच्या कंपनीने मला शांत करण्याची ही नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली असावी असा माझा समज झाला. मी नक्की तिसऱ्यावर आहे की शून्यावर हे कळायचा काहीच मार्ग नव्हता. डिसप्लेवर काहीतरी अगम्य अक्षरं दिसत होती. मला काय करावे कळेना.


फोनला रेंज नसल्याने त्याचाही काही उपयोग नव्हता. यावेळी मात्र मला ईमर्जन्सी चे बटण चेक करण्याची संधी मिळाली. तेवढाच एक क्षणैक आनंद! गाडीचा हॉर्न आणि लिफ्टचा सायरन वाजवून बिल्डिंगमधील बऱ्याच मंडळींना गोळा केले. दरम्यान लाईट बंद झाले आणि फॅन पण बंद पडला. मला गाडीतून उतरून बाहेर पडणे अशक्य होते. गाडीचा दरवाजा उघडायला जागाच नव्हती. दुसऱ्या बाजूला थोडी जागा दिसली. मी माझी सीट बदलून दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. यावेळी माणसाला योगासनांची का गरज आहे याचे महत्त्व पटले. ठार अंधारात लिफ्टचा दरवाजा बडवत हाका मारू लागलो.


कोणीतरी मला प्रतिसाद दिला. सोसायटीचा वॉचमन, एक शेजारचे सदगृहस्थ आणि आसपासच्या दोन-चार लोकांनी मिळून अथक प्रयत्न केले… आणि अखेरीस मी माझ्या गाडीसह या भूतलावर अवतरलो. माझा तब्बल पन्नास मिनिटांचा तो कालावधी मला एका महान पर्वासारखा वाटत होता. बाहेर बायको वाट पाहत उभी होती. तिने मी युद्ध जिंकून आल्याप्रमाणे स्वागत केले. इतरांनी न वाजवलेल्या टाळ्यांच्या गजरात मी धुरंधर चालीने बाहेर आलो. लिफ्टच्या कंपनीला लाख शिव्या शाप देण्याचे तात्कालिक कर्तव्य आम्ही पार पाडले. पुढील बरेच दिवस त्या लिफ्टमध्ये जाणे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे वाटत होते.

आजकाल जिने हे फक्त आपत्कालीन परिस्थिती आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठीच बनलेले असतात. सर्वसामान्यांसाठी लिफ्ट आहेच ना! कोणी काहीही म्हणो, उंच वाढणाऱ्या शहराला जमिनीवर आणून ठेवण्यासाठी फक्त लिफ्टचाच मोठा वाटा आहे.

Saturday, 14 March 2026

निर्णय — घ्यावेत आणि भोगावेत

आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य; आणि सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्या निर्णयांचे परिणाम भोगणे.

खरं सांगू? माझ्या मते सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे निर्णय घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज काहीना काही निर्णय घ्यावेच लागतात. काही छोटे असोत वा काही मोठे. आपापल्या कुवती प्रमाणे आपण निर्णय घेतच असतो. निर्णय घेताना गोंधळून जाणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तरीही आपण निर्णयापासून पळ काढू शकत नाही. तो काही ना काही घ्यावाच लागतो. कधीकधी निर्णय न घेणे हा पण एक प्रकारचा निर्णयच आहे.


दर सोमवारी “आज मी ऑफिसला जाऊ की रजा टाकू” या प्रश्नावर  जगातील करोडो लोक गोंधळलेले असतात आणि नाईलाजाने कामावर जाण्याचा निर्णय घेतात. “उद्या लौकर उठून पळायला जाऊ का नको?” या प्रश्नावर सुद्धा तितकेच किंबहुना अधिकच लोक “उद्या नको पण परवा नक्की!” हा निर्णय घेतात. “मी अजून एक गुलाब जामुन घ्यावा का?” हा प्रश्न पडण्यापूर्वीच त्यावर निर्णय झालेला असतो. सगळेच निर्णय हे दिल किंवा दिमाग घेत नसतात; तर जिभेसाठी सुद्धा काही अधिकार राखून ठेवलेले आहेत.



मी रोज रात्री झोपायच्या आधी ठरवतो की आज जरा मोबाईलला हात न लावता लवकर झोपून टाकू. पण झोपायच्या आधी मोबाईल हातात घेतला जातो आणि “फक्त पाच मिनिटं” असा निर्णय घेतला जातो. त्यानंतर WhatsApp, facebook, reels, YouTube, News… असे अनेक निर्णय आपोआप घेतले जातात. आणि लक्षात येते की असाच तासभर निघून गेला. काही निर्णय आपल्यासाठी मोबाईलने घेतलेले असतात.



कधीतरी आपण ठरवतो “नेहमी एकाच रस्त्याने का जायचे, आज जरा नवीन रस्ता ट्राय करू.” गुगल काकांनी नवीन रस्ता शॉर्टकट आहे असे ठासून सांगितलेले असते. मग काय, मोठ्या विश्वासाने आपण पुढे जातो. मग अनेक खड्डे, मधेच रस्ता चुकणे आणि उशीर या सर्व प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनुभवाला शॉर्टकट नसतो; कारण त्यातूनच पुढच्या निर्णयाचं शहाणपण जन्म घेतं. क्वचित आपला निर्णय योग्यही ठरू शकतो पण त्याची खात्री कधीच देता येत नाही. म्हणूनच असे निर्णय हे धाडसी समजले जातात. निर्णय घेताना आपण स्वतःला  खूप हुशार समजतो; पण परिणामांचे अनुभव आपल्याला अधिक हुशार बनवतात.


आपल्याला निर्णय घेण्याची मुभा असणे ही गोष्ट आपण स्वातंत्र्य मानतो. पण खरंतर निर्णय घेऊन विषय संपत नसतो. त्याचे परिणाम भोगण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. बऱ्याचदा तुमच्याकडे निर्णय घेण्याची मुभा नसते. परिस्थिती तुमच्यावर निर्णय लादत असते. काही निर्णय तुम्हाला मनाविरूद्ध घ्यावे लागतात. अभ्यासासाठी लौकर उठणे, ऑफिसमध्ये कामं करणे, आजारी पडल्यास पथ्य पाळणे… असे अनेक निर्णय आपल्या हातात नसतात. तरीपण ते घ्यावेच लागतात.


काही निर्णयांबरोबर वेळेची गुंफण घातलेली असते. शेअर मार्केटमध्ये पैसे कधी गुंतवायचे आणि ते शेअर्स विकून बाहेर कधी पडायचं… याच्या वेळा सर्वानाच जमतात असे नाही. असं म्हणतात की मार्केटमध्ये गुंतवणं सोपं आहे पण त्यातून योग्य वेळी बाहेर पडणे हे खूप कठीण. हाव आणि आशा या दोन गोष्टी आपल्याला शेअर्समधून बाहेर पडू देत नाहीत. 


निर्णय घेणे ही मक्तेदारी ठराविक वयानंतरच येते हा गैरसमज आहे. दहावीनंतर आर्टस का कॉमर्स का सायन्स, बारावीनंतर मेडिकल का इंजिनिअरिंग.. एक ना अनेक. नोकरीत बॉसला खुश ठेऊ का नको, आज थांबून कामं पूर्ण करू का नको. याहून कठीण प्रश्न म्हणजे पन्नास हजाराचा फोन घेऊ का लाखाचा आयफोन घेऊ. किती ते प्रश्न आणि किती ते निर्णय! शक्यतो एकदा घेतलेला निर्णय परत बदलता येत नाही. आयुष्यात अनडू ची सुविधा नसते. आपण रिडू करू शकलोच तरी वेळ परत येऊ शकत नाही. कारण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही.


निर्णय घेताना आपण भविष्य निवडत असतो. चुकण्याची भीती असली तरी निर्णय टाळून उपयोग नसतो. आयुष्य कोणासाठीही थांबत नसते. कदाचित जीवन म्हणजे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांचा अनुभव आणि न घेतलेल्या निर्णयांची खंत असावी.

Monday, 23 February 2026

मधूमेहः एक कथा आणि व्यथा

कुठेतरी वाचनात आलं की “काय रे विद्यापीठाच्या” (WhatsApp University) संशोधनानुसार रक्तदाब, मधूमेह यासारखे आजार हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसांसाठी अस्तित्वात आणलेले आहेत. कोणता मोठा सेलिब्रिटी गेली वीस वर्षे रक्तदाबाच्या गोळ्या घेत आपल्या कार्यक्षेत्रात छान काम करतोय.. असं कधी ऐकिवात आहे का? कधीच नाही. पण आपण मात्र चाळीशीला लागलेली गोळी पुढील तीस वर्षे गोळ्या घेत सत्तर-ऐंशी वयाचा टप्पा सहज पार पाडतो.

या प्रवासात समस्त डॉक्टर प्रजातीचा सिंहाचा वाटा असतो. हे डॉक्टर लोक रक्तदाब, मधूमेह यांच्या अस्तित्वाची जाणिव करून देतात आणि आपल्या मागे एक ससेमिरा लागल्याची जाणीव होते. खरंतर तसे आपल्याला प्रत्यक्ष काहीच होत नसते. तरीपण हा बागुलबुवा आपल्याला सतत भॉऽक करत भीती घालत असतो. आपल्याला दुसऱ्या काही तरी झालेल्या व्याधीचं मूळ कारण हे मधूमेहच आहे असे पटवून दिले जाते.



तर या जोडगोळी मधील मधूमेह हा पन्नाशी नंतर तुमचा साथी बनलाच पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सेलिब्रिटी नाही आणि तरी पण तुम्हाला मधूमेह नाही, असे झाले तर तुम्ही मेले आहात असे समजावे. असंही कुठंतरी काय रे विद्यापीठात लिहून ठेवलंय. असो, तर अखेरीस मला माझ्या जीवंत पणाचा दाखला मिळाला… किंबहुना डॉक्टर लोकांनी बहाल केला. तसा थोडा उशीरच झाला म्हणावे लागेल, पण वयाच्या ४५ व्या वर्षी माझ्या स्वभावातील गोडपणा रक्तात उतरला. तसा मी चालता बोलता ठिक ठाक असूनही मला असल्या आजारपणाचा शाप दिला गेला. मधूमेह.. आणि माझा एक प्रवास सुरू झाला.

अचानक घरामध्ये भीतीचे सावट पसरले. सर्वजण माझ्याकडे बघून हळहळ व्यक्त करू लागले. मी सुद्धा स्वतःला आजारी समजू लागलो. गेली वीस वर्षे गोळ्या घेणाऱ्या आईने माझ्याकडं बघून काळजी व्यक्त केली. जी चॉकलेट मी कधीच खात नाही ती सर्व लपवून ठेवण्यात आली. मुलींनी यातूनच पितृप्रेम प्रदर्शित केले. बायकोनं माझ्या आहारातून नव्वद टक्के गोष्टी काढून टाकल्या. शिल्लक राहिलेल्या दहा टक्के गोष्टींमधे फक्त काकडी गाजरंच राहिली.

या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या जगात अजून एका खेळण्याची घरात भर पडली. ग्लुकोमीटर… एका छानशा डब्यामधे ते उपकरण घरात आले. त्यातली सुई आणि छोटूशा फोनसारखे दिसणारे एक मशीन. एकंदरीत सुरवातीला सर्वच गंमतीशीर आणि छान वाटत होते. दर पंधरा दिवसांनी सकाळी उठले की रक्त तपासणे ही एक प्रथाच पडली. शेअर मार्केटच्या आकड्यां प्रमाणे आजचा साखरेचा आकडा काय याकडे सर्वांचे डोळे लागू लागले. माझ्या बोटातून रक्त काढणे या महान व अवघड कामाची जबाबदारी बायकोने स्वखुशीने स्वीकारली. मला एक वेळ खुद्द वाघ समोर आला तरी एवढी भीती वाटणार नाही तेवढी त्या सुईची वाटते. थेंबभर रक्तासाठी जीव पणाला लावावा लागतो. माझा साखरेचा आकडा फारसा बदल दाखवायला तयार नव्हता. सव्वाशे ते दोनशे दरम्यानच्या या खेळाचा मला पण कंटाळा आला. माझ्या ऑफिस मधल्या एका हुशार इसमाने तर दंडालाच एक मशीन बसवून घेतले. ते म्हणे दर मिनीटाला साखर तपासते आणि इंटरनेटवर अपडेट करते. आपण ते मोबाईलच्या ॲपवर पाहू शकतो. जेवतानाच्या प्रत्येक घासागणिक साखरेचा हिशोब ठेवू शकतो. बापरे! खाल्लेला प्रत्येक घास पचायच्या आधीच त्याचा पंचनामा करण्याची ही आधुनिक पद्धत मला फारसी रूचली नाही.

इतर सर्व आजार आणि मधूमेह यातील अतिशय महत्वाचा फरक… इतर आजारात तुम्हाला घरचे प्रेमाने खाऊ घालतात; पण इथे प्रेमाने खाऊच देत नाहीत. जे छान आणि चवीष्ट ते इथे वर्ज्य! जेवणातून भाताचे उच्चाटन झाले. चपातीचं प्रमाण कमी होऊन हिरव्या भाज्या वाढल्या. सॅलेडचा एक डबा माझ्या टिफिन मधे समाविष्ट करण्यात आला. सणावाराचं काही गोडधोड खाणं पाप ठरू लागले. घरात मुलींसाठी काही चमचमीत पदार्थ बनलाच तर तो मी घरी येण्यापूर्वी संपवून किचन मधून त्याचे पुरावे नष्ट केले जाऊ लागले. एकंदरीत मला बिनसाखरेची कडक शिक्षा ठोठावण्यात आली. चहा, कॉफी यातून साखर गायब झाल्याने त्याचा कडवटपणा मी गोड मानून घेऊ लागलो. या कठोर परिस्थितीत मला काही बऱ्याच गोष्टींचा शोध लागला. फक्त गोड पदार्थातच नव्हे तर फरसाण, चिवडा, चकलीसारखे खमंग पदार्थही साखर वाढवू शकतात. थोडक्यात म्हणजे जे काही खाण्यास गोड वाटतात ते सर्व साखर वाढवू शकतात. एक मोठ्ठा शोध… मनात पुरणपोळी, गुलाबजाम यांचा विचार जरी आणला तरी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. (संदर्भ अर्थातच - कायरे विद्यापीठ)

तर या मधूमेह नामक राक्षसाला हरवण्याचे मी सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. महिन्याभराच्या परिश्रमानंतर माझ्यातील “उद्या नक्की” या उदात्त विचाराने उत्साहावरती विजय मिळवला. ऑफिस मधील चहा कॉफी बंद करून मी ग्रीन टी बनवून प्यायला सुरू केले. आठवड्याभराच्या उत्साहानंतर बेचव हिरव्या पाण्याचा आणि ते बनवण्याचा कंटाळा येऊ लागला. कामाच्या व्यापातून सवडच मिळत नाही या सबबी वर मी ग्रीन टी थांबवला. सर्वात अधिक त्रास होतो, जेव्हा कोणीतरी जेवायला बोलवते. “असू दे रे! आजचा चीट डे!” असल्या प्रेमळ आग्रहाला बळी पडावे लागते. कधी एकटाच बाहेर गेलो असेन तर वडापाव चे दुकान खुणावते, पण निग्रह मी शक्यतो ढळू देत नाही. क्वचित प्रसंगी मीच स्वतःला समजावतो.. “असू दे रे! आजचा चीट डे!”

मधूमेह मागे लागल्यापासून मी एका डॉक्टरला नियमित भेट देत असतो. त्याचे नेहमीचे सल्ले “वजन कमी करा. व्यायाम भरपूर करा. खाण्याचे पथ्य पाळा. कामाचा ताण घेऊ नका.” मी प्रत्येक वेळी हे सर्व नव्याने ऐकतो आणि तसेच वागण्याचे त्यांना वचन देऊन बाहेर पडतो. मी कसा सांगू की मी खरंच प्रयत्न करतोय हो! पण सातत्यच रहात नाही.

आता हळूहळू हा मधूमेह माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. थेट कोणताही त्रास दिसत नसला तरी माझ्या इतर व्याधींचे प्रमाण वाढू लागले आहे. नजर कमजोर होणे, वारंवार बाथरूमला जाणे, सतत तहान लागणे असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. एक गोष्ट नक्की, निरामय जीवनशैली कशी असावी याचे ज्ञान अवगत झाले. किमान पक्षी जे काही करतोय ते सर्व अयोग्य याचे तरी ज्ञान प्राप्त झाले. या रोगातून या जन्मी सुटका नाही हे नक्की असले तरी त्याचे परिणाम कमी व्हावेत एवढेच प्रयत्न महत्वाचे!

मला वाटते, मधूमेह हा आजार नसून तुम्हाला योग्य जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणारा निसर्गाने दाखवलेला धाक आहे. त्याला घाबरून का असेना आपण योग्य वळण लावून आयुष्य जगावे. गोड खाण्यापेक्षा गोड जगण्याचा प्रयत्न करावा.

Wednesday, 28 January 2026

पुणे ते कोल्हापूर

मला खूप पूर्वी असे एक स्वप्न पडायचे. एक लांबलचक, मस्त गुळगुळीत रस्ता आहे. माझ्या हातात एक सुंदर कार आहे आणि मी सुसाट दीडशेच्या वेगाने जात आहे. वाटेत खड्डे नाहीत, अडथळे नाहीत, सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर नाहीत… आणि माझ्यासोबत फक्त वेग!

कालांतराने समजून चुकले की हे फक्त स्वप्नातच घडू शकते. या जन्मात असे काही घडणे शक्य नाही.

अनुभवाने आलेले शहाणपण म्हणा अथवा माझे वय म्हणा, मी आता ड्रायव्हिंगचा कंटाळाच करतो. तसं मला ड्रायव्हिंग आवडत नाही असं काही नाही; पण पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे मी ते शक्यतो टाळतो. लक्ष्मी रोड, टिळक रोड किंवा पेठेत जावेच लागले तर टॅक्सीचा पर्याय मला अधिक सोयीचा वाटतो. उगाच ट्रॅफिकमध्ये चिडचिड नको, पार्किंग कुठे करू हा प्रश्न नको, आणि गाडीला कोणीतरी घासून गेला तर होणारा मनःस्ताप तर मुळीच नको.


तरीपण कधीतरी गाडी चालवावीच लागते. रोज ऑफिसला जाताना किंवा कधी परगावी जाताना गाडीचा वापर आवर्जून करावा लागतो. हातात गाडी असली की सोईची वाटते. मुंबई, कोल्हापूर अशा अनेक फेऱ्या झाल्यात. कधी भटकंतीसाठीही फिरणं झालंय. या सर्व प्रवासांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असा प्रवास म्हणजे पुणे ते कोल्हापूर.

प्रयत्न आणि ध्येय यामध्ये अंतर असतं असं म्हणतात… पण हे अंतर दिवसेंदिवस वाढत जातं, हे माहीत नव्हतं. पाच–सहा वर्षांपूर्वी पुणे ते कोल्हापूर फक्त चार ते साडेचार तासांत पार पडायचे. तेच अंतर आता सात ते आठ तास घेतं. कदाचित पृथ्वीच खेचली जात असावी असं वाटतंय. पूर्वी कोल्हापूरहून सकाळी निघालो तर दुपारच्या जेवणाला घरी पोहोचायचो. आता बायकोला सांगावं लागतं “रात्रीच्या जेवणाची वाट पाहू नकोस.” जगभर दोन ठिकाणांमधील अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं; पण पुणे–कोल्हापूर हे अंतर संयम आणि BP मध्ये मोजतात, असं मला वाटतं.

प्रत्येक कोल्हापूर प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. इच्छित स्थळी पोहोचल्यावर युद्ध जिंकून आल्याची अनुभूती येते. प्रवासातील खड्डे, हादरे आणि चिघळलेले ट्रॅफिक यातून जीवनाचं सार सापडल्याचा भास होतो. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने तेच खड्डे आपल्याला जवळचे वाटू लागतात. मार्गात येणारा प्रत्येक खड्डा एखाद्या जुन्या ऋणानुबंधासारखा खुणावल्यासारखा वाटतो.

मी असे ऐकले आहे की कोणीतरी गुगलला खास सूचना देऊन नकाशामध्ये खड्डेही दाखवा असा सल्ला दिला आहे. गुगल यावर संशोधन करत आहे अशी बातमी आहे. रस्त्यातील प्रत्येक डायव्हर्जन तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असल्यासारखा वाटू लागते. एखादा किलोमीटर डायव्हर्जनशिवाय पार केला तर रस्ता चुकल्याची शंका येते. मुख्य रस्त्याच्या लांबीपेक्षा डायव्हर्जनची लांबी जास्त असते; मात्र रुंदी एक चतुर्थांश असावी लागते. तीन पदरी रस्त्याचं महत्त्व समजण्यासाठी अरुंद डायव्हर्जनची आवश्यकता मानवजातीला आहे, असं मला वाटतं. जागोजागी अशी पाटी दिसते “आगे अस्थायी मोड है।” आता या अस्थायी चा अर्थ किमान दहा पंधरा वर्षे असू शकतो.

या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं वर्णन करावं तेवढं कमीच. असं वाटतं की अख्खं पुणे नेमकं आजच कोल्हापूरच्या देवदर्शनाला निघालं आहे. सर्रास लेन बदलणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, या कला अवगत असल्या शिवाय तुम्हाला कोल्हापुरात प्रवेश नाही, अशी मला दाट शंका आहे. रस्त्याच्या मध्यभागातून संथ गतीने जाणारे भलेमोठे ट्रक तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. तुम्ही कितीही हॉर्न वाजवला तरी तो आवाज त्या ड्रायव्हरच्या कानापर्यंत पोहोचत नाही. या प्रवासात ओव्हरटेक करता येणं ही सुवर्णसंधी असते; त्यासाठी मागच्या जन्मीचे पुण्यसंचय लागते. चुकून एखाद्या वेळी मी संथ जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करायला लागलोच, तर तो अचानक वेग वाढवतो आणि मला माझी जागा दाखवून देतो. “अपनी औकात में रहो।” असं काहीतरी तो ओरडून सांगतोय असा भास होतो. समोरचा ट्रक, मागचा बसवाला आणि बाजूचा कारवाला — या सगळ्यांचं एकच ध्येय असतं: माझ्या गाडीला पुढे जाण्याचे कष्ट होऊ नयेत. संथ आणि आरामात माझा प्रवास व्हावा.

खरी परीक्षा असते ती टोल प्लाझावर. हे लोक टोल का घेतात यावर पुणे विद्यापीठात संशोधन चालू आहे, असं ऐकीवात आहे. तरीपण मी एक जागरूक नागरिक या नात्याने स्लो रस्त्यावर फास्टटॅगद्वारे टोल भरतो. टोल प्लाझा जवळ आला की किमान दहा गेट दिसतात आणि प्रत्येक गेटवर भल्या मोठ्या रांगा. त्यातली जी रांग छोटी वाटते, तिथे गाडी घुसवली की हमखास शेजारच्या उजव्या-डाव्या रांगा पटापट पुढे सरकतात आणि आपली रांग तशीच राहते. कोणाच्या तरी फास्टटॅगला प्रॉब्लेम असतो आणि तो बिचारा अडकलेला असतो. त्याच्या मागे उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या हॉर्न वाजवून काय सांगत असतात, हे मला आजतागायत कळलेलं नाही. अशा वेळी मागे हटणं शक्य नसतं, कारण माझ्या मागेही अजून चार गाड्या उभ्या असतात आणि त्या देखील हॉर्न वाजवून आपापल्या गाड्या जिवंत ठेवत असतात. टोल भरताना मी स्वतःच्या मनाला समजावतो, हे पैसे वर्तमानकाळातील रस्त्यांसाठी नसून उज्ज्वल भविष्यातील सुंदर भारतातील रस्त्यांसाठी केलेले अल्प प्रयत्न आहेत. पुढच्या पिढ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता तो नक्की कोणाच्या पिढीला, या वादात मी पडत नाही.

पूर्वी या प्रवासात लोक फक्त एक चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचे. आता तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण असा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने वाटेतील सर्व उद्योगधंद्यांना चांगला हातभार लागतो, इतकाच उद्देश असावा.

भले तुमच्या असंख्य तक्रारी असतील; पण पुढच्या खेपेस कोल्हापूर फेरी करायचीच झाली, तर तुमच्याकडे काही पर्यायी रस्ता आहे का? … नाही ना? मग मुक्तपणे कौतुकच केलेलं बरं!

एकवेळ तुम्हाला तक्रार करणं जमेल, पण रस्ता बदलणं अजून कोणाला जमलेलं नाही.