Tuesday, 19 May 2026

लिफ्ट करा दे!

आपला एक टुमदार बंगला असावा, दारात एक मोटर कार असं छोटसं स्वप्न प्रत्येकाने रंगवलेलं असतं. पण नशिबात काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं. शहरीकरणाच्या शर्यतीमध्ये उंच उंच इमारतींमध्ये खुराड्या इतकी जागा मिळवून आयुष्य काढावे लागते. अशा उंच इमारतींचा एक अविभाज्य घटक म्हणजे लिफ्ट!

पूर्वी लिफ्टमधून जाण्याचे एक अप्रूप असायचे. त्याकाळी जाळीचे लोखंडी दरवाजे बंद करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागत असे. दोन्ही दरवाजे बंद झाल्याशिवाय लिफ्ट जागची हलायची नाही. एखाद्या महाभागाने जर चुकून दरवाजा नीट बंद नाही केला तर लिफ्ट न थकता बंद करण्याचा सल्ला ओरडत राही. दरवाजा आपोआप बंद होण्याचे तंत्रज्ञान त्या काळात का नव्हते याचे कोडे मला आजही पडले आहे. लिफ्टचा दरवाजा बंद करतानाचा त्याचा धडकण्याचा आवाज ऐकल्यानंतरच लिफ्ट जागची हलत असे. बंद दरवाज्यामागील भिंतीचे निरीक्षण करीत आपला प्रवास पार पडत असे. गुटख्याच्या पिचकाऱ्यानी भिंत रंगवणाऱ्या लोकांचे सुप्त गुण दाखवण्याची ती एक हक्काची जागा होती. आता आपोआप बंद होणाऱ्या दरवाज्यांच्या संस्कृतीत त्या कलेची गळचेपी होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्याकाळी लिफ्ट ही एक अतिशय चिंचोळी आणि अस्वच्छ जागा असायची. घरं एक वेळ मोठाली सापडतील, पण लिफ्ट मात्र तोकडी. चुकून तीन माणसं एकावेळी घुसली तर मुंबईच्या लोकलपेक्षा अधिक दाटीवाटी. बऱ्याचदा तर लिफ्टमधे ठार अंधार असे किंवा रामसे बंधूच्या चित्रपटात शोभेल असा पुकपुकणारा किरकोळ बल्ब! अशा अनेक लिफ्टमधून मी अनेकदा प्रवास करून सुखरूप जीवंत बाहेर पडलो आहे.

हळू हळू काळ बदलला तसा लिफ्टचा चेहरा मोहरा देखील बदलू लागला. रूंद आकार, एकावेळी दहा लोक ऐसपैस उभे राहतील एवढी जागा, आपोआप बंद होणारे दरवाजे, स्वच्छ प्रकाश, मागील भिंतीवर पूर्ण आकाराचा आरसा, मजल्याचा आकडा दाखवणारा डिजिटल डिसप्ले, आणि डोक्यावरील फॅनमुळे खेळती हवा. काही लिफ्टमध्ये तर सुमधुर संगीत सुद्धा ऐकवले जाते. आता तर सामान ने-आण करण्याची एक स्वतंत्र लिफ्टची सोय पण केलेली असते.

आजही मी असे अनेक लोक पाहिले आहेत ज्यांचा एका गोष्टीवर हमखास गोंधळ उडालेला असतो. वरच्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी लिफ्टला वर (UP) येण्याची आज्ञा द्यावी का खाली जायचे म्हणून DOWN चे बटण दाबावे? या गोंधळात हे लोक इतर लोकांचा वेळ घालवतात. अजून एक हमखास होणारा गोंधळ म्हणजे स्वतःचा मजला येण्याआधीच जर चुकून दरवाजा उघडला तर बाहेर पडून “अरेच्चा!” म्हणत परत लिफ्टमध्ये घुसणे! असं म्हणतात की काही मैत्री या लिफ्ट पुरत्या मर्यादित असतात आणि जर चुकून बाहेर कधी भेटलेच तर एकमेकांना ओळख दाखवतीलच याची खात्री नसते. अशा मैत्री या निव्वळ एका स्मित हास्याच्या किंवा फार तर “गुड मॉर्निंग” पुरत्या बनलेल्या असतात. परदेशात तर म्हणे बऱ्याचदा काहींची हृदयं लिफ्टमध्येच जुळतात आणि… आणि काही नाही!


ऑफिसच्या लिफ्ट तर अजूनही मोठ्या असतात. पंधरा ते वीस लोक मावतील अशा प्रशस्त बनलेल्या असतात. आजकालच्या IT Park मध्ये पंधरा मजली इमारतीत किमान पंचवीस कंपन्या असतात आणि आठ ते दहा हजार नोकरदार असतात. अशा वेळी तर दहा लिफ्ट ची सोय असून सुद्धा त्या कमीच पडतात. कधी कधी तर लिफ्टमध्ये जागा मिळण्यासाठी अर्धा अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. अशा लिफ्टमध्ये हमखास घडणारा प्रकार म्हणजे overload message. सर्वजण शेवटी घुसलेल्या व्यक्तीकडे भयंकर नजरेने पाहतात आणि बिच्चाऱ्याला मुकाट्याने बाहेर पडावे लागते.

लिफ्टमध्ये वागण्याच्या अनेक तऱ्हा असतात. काहीजण आत शिरल्याक्षणी खिशातून मोबाईल काढतात आणि उगाच जुने मेसेजेस वाचू लागतात. काहींना आरशात स्वतःलाच निरखण्याची सवय असते. काही महिलांना लिफ्टमधील आरशात बघून मेकअप करायचा असतो. काही लोकांना तर ईप्सित स्थळी पोचण्याची इतकी घाई असते की ते मजल्याचे बटण वारंवार दाबून लिफ्टचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी कोणी लिफ्टमध्ये आले की त्यांच्या परफ्युमचा सुगंध पसरतो किंवा कोणी आज डब्यात आणलेल्या खमंग भाजीचा सुगंध जिभेवर चव निर्माण करून जातो. माझे एक सहज निरीक्षण… लिफ्टमध्ये घुसता क्षणी सर्वजण अचानक शांत होतात! का ते मला माहीत नाही. जणू तिथं मौनव्रताचा नियमच आहे. कधी जर सोसायटीमधील व्रात्य कार्टे आपल्या बरोबर घुसले तर सर्व मजल्याची बटणं दाबून अगदी संताप आणतात.

सर्व सामान्य लोकांच्या मनात असलेली एक भीती… मी आत असताना लिफ्ट बंद पडली तर! ते ईमर्जन्सी चे बटण ऐनवेळी धोका तर नाही ना देणार? नेमके मोबाईलला आतमध्ये नेटवर्क का येत नाही? मग मी बाहेरच्या लोकांना कळवणार कसा? आणि कोणाला कळवणार? आत पुरेसा श्वास घेता येईल ना? … असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत असतात. तरीपण लिफ्टचा वापर हा अनिवार्य आहे. मी स्वतः बऱ्याचदा लिफ्टमध्ये अडकलो आहे. मला अशा सर्व अनुभवांचा गाढा अनुभव आहे. अनेकदा लाईट गेल्यामुळे लिफ्ट बंद पडली पण जनरेटरने मला काही मिनिटांत सहीसलामत जीवंत बाहेर काढला आहे.

लिफ्टमध्ये अडकण्याचा माझा अजून एक मोठा अनुभव आहे. आमच्या सोसायटीमध्ये काही नशीबवान लोकांना तिसऱ्या मजल्यावर पार्किंग दिले आहे. तिथं पर्यंत पोचण्यासाठी कारलिफ्ट देण्यात आली आहे. शून्य ते तीन आणि तीन ते शून्य इतकाच माफक प्रवास या लिफ्टकडून अपेक्षित आहे. आख्खी कार या लिफ्टमध्ये जाते आणि ती अलगद तिसऱ्या मजल्यावर पोचते. काही जागरूक शेजाऱ्यांना या लिफ्टच्या आकारावरून जोरदार आक्षेप आहे. मारूती अल्टो वरून फॉरट्युनर SUV अपग्रेड करता येणार नाही अशी खंत काहींनी व्यक्त करून झाली आहे.

तर… मी असाच एकदा ऑफिसच्या घाईत तिसऱ्या मजल्यावरून माझी गाडी घेऊन खाली येत होतो… आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला, थोडी थरथरली अन मग एका जागेवर थबकली. माझ्या गडबडीच्यावेळी लिफ्टच्या कंपनीने मला शांत करण्याची ही नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली असावी असा माझा समज झाला. मी नक्की तिसऱ्यावर आहे की शून्यावर हे कळायचा काहीच मार्ग नव्हता. डिसप्लेवर काहीतरी अगम्य अक्षरं दिसत होती. मला काय करावे कळेना.


फोनला रेंज नसल्याने त्याचाही काही उपयोग नव्हता. यावेळी मात्र मला ईमर्जन्सी चे बटण चेक करण्याची संधी मिळाली. तेवढाच एक क्षणैक आनंद! गाडीचा हॉर्न आणि लिफ्टचा सायरन वाजवून बिल्डिंगमधील बऱ्याच मंडळींना गोळा केले. दरम्यान लाईट बंद झाले आणि फॅन पण बंद पडला. मला गाडीतून उतरून बाहेर पडणे अशक्य होते. गाडीचा दरवाजा उघडायला जागाच नव्हती. दुसऱ्या बाजूला थोडी जागा दिसली. मी माझी सीट बदलून दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. यावेळी माणसाला योगासनांची का गरज आहे याचे महत्त्व पटले. ठार अंधारात लिफ्टचा दरवाजा बडवत हाका मारू लागलो.


कोणीतरी मला प्रतिसाद दिला. सोसायटीचा वॉचमन, एक शेजारचे सदगृहस्थ आणि आसपासच्या दोन-चार लोकांनी मिळून अथक प्रयत्न केले… आणि अखेरीस मी माझ्या गाडीसह या भूतलावर अवतरलो. माझा तब्बल पन्नास मिनिटांचा तो कालावधी मला एका महान पर्वासारखा वाटत होता. बाहेर बायको वाट पाहत उभी होती. तिने मी युद्ध जिंकून आल्याप्रमाणे स्वागत केले. इतरांनी न वाजवलेल्या टाळ्यांच्या गजरात मी धुरंधर चालीने बाहेर आलो. लिफ्टच्या कंपनीला लाख शिव्या शाप देण्याचे तात्कालिक कर्तव्य आम्ही पार पाडले. पुढील बरेच दिवस त्या लिफ्टमध्ये जाणे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे वाटत होते.

आजकाल जिने हे फक्त आपत्कालीन परिस्थिती आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठीच बनलेले असतात. सर्वसामान्यांसाठी लिफ्ट आहेच ना! कोणी काहीही म्हणो, उंच वाढणाऱ्या शहराला जमिनीवर आणून ठेवण्यासाठी फक्त लिफ्टचाच मोठा वाटा आहे.

Saturday, 14 March 2026

निर्णय — घ्यावेत आणि भोगावेत

आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य; आणि सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्या निर्णयांचे परिणाम भोगणे.

खरं सांगू? माझ्या मते सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे निर्णय घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज काहीना काही निर्णय घ्यावेच लागतात. काही छोटे असोत वा काही मोठे. आपापल्या कुवती प्रमाणे आपण निर्णय घेतच असतो. निर्णय घेताना गोंधळून जाणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तरीही आपण निर्णयापासून पळ काढू शकत नाही. तो काही ना काही घ्यावाच लागतो. कधीकधी निर्णय न घेणे हा पण एक प्रकारचा निर्णयच आहे.


दर सोमवारी “आज मी ऑफिसला जाऊ की रजा टाकू” या प्रश्नावर  जगातील करोडो लोक गोंधळलेले असतात आणि नाईलाजाने कामावर जाण्याचा निर्णय घेतात. “उद्या लौकर उठून पळायला जाऊ का नको?” या प्रश्नावर सुद्धा तितकेच किंबहुना अधिकच लोक “उद्या नको पण परवा नक्की!” हा निर्णय घेतात. “मी अजून एक गुलाब जामुन घ्यावा का?” हा प्रश्न पडण्यापूर्वीच त्यावर निर्णय झालेला असतो. सगळेच निर्णय हे दिल किंवा दिमाग घेत नसतात; तर जिभेसाठी सुद्धा काही अधिकार राखून ठेवलेले आहेत.



मी रोज रात्री झोपायच्या आधी ठरवतो की आज जरा मोबाईलला हात न लावता लवकर झोपून टाकू. पण झोपायच्या आधी मोबाईल हातात घेतला जातो आणि “फक्त पाच मिनिटं” असा निर्णय घेतला जातो. त्यानंतर WhatsApp, facebook, reels, YouTube, News… असे अनेक निर्णय आपोआप घेतले जातात. आणि लक्षात येते की असाच तासभर निघून गेला. काही निर्णय आपल्यासाठी मोबाईलने घेतलेले असतात.



कधीतरी आपण ठरवतो “नेहमी एकाच रस्त्याने का जायचे, आज जरा नवीन रस्ता ट्राय करू.” गुगल काकांनी नवीन रस्ता शॉर्टकट आहे असे ठासून सांगितलेले असते. मग काय, मोठ्या विश्वासाने आपण पुढे जातो. मग अनेक खड्डे, मधेच रस्ता चुकणे आणि उशीर या सर्व प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनुभवाला शॉर्टकट नसतो; कारण त्यातूनच पुढच्या निर्णयाचं शहाणपण जन्म घेतं. क्वचित आपला निर्णय योग्यही ठरू शकतो पण त्याची खात्री कधीच देता येत नाही. म्हणूनच असे निर्णय हे धाडसी समजले जातात. निर्णय घेताना आपण स्वतःला  खूप हुशार समजतो; पण परिणामांचे अनुभव आपल्याला अधिक हुशार बनवतात.


आपल्याला निर्णय घेण्याची मुभा असणे ही गोष्ट आपण स्वातंत्र्य मानतो. पण खरंतर निर्णय घेऊन विषय संपत नसतो. त्याचे परिणाम भोगण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. बऱ्याचदा तुमच्याकडे निर्णय घेण्याची मुभा नसते. परिस्थिती तुमच्यावर निर्णय लादत असते. काही निर्णय तुम्हाला मनाविरूद्ध घ्यावे लागतात. अभ्यासासाठी लौकर उठणे, ऑफिसमध्ये कामं करणे, आजारी पडल्यास पथ्य पाळणे… असे अनेक निर्णय आपल्या हातात नसतात. तरीपण ते घ्यावेच लागतात.


काही निर्णयांबरोबर वेळेची गुंफण घातलेली असते. शेअर मार्केटमध्ये पैसे कधी गुंतवायचे आणि ते शेअर्स विकून बाहेर कधी पडायचं… याच्या वेळा सर्वानाच जमतात असे नाही. असं म्हणतात की मार्केटमध्ये गुंतवणं सोपं आहे पण त्यातून योग्य वेळी बाहेर पडणे हे खूप कठीण. हाव आणि आशा या दोन गोष्टी आपल्याला शेअर्समधून बाहेर पडू देत नाहीत. 


निर्णय घेणे ही मक्तेदारी ठराविक वयानंतरच येते हा गैरसमज आहे. दहावीनंतर आर्टस का कॉमर्स का सायन्स, बारावीनंतर मेडिकल का इंजिनिअरिंग.. एक ना अनेक. नोकरीत बॉसला खुश ठेऊ का नको, आज थांबून कामं पूर्ण करू का नको. याहून कठीण प्रश्न म्हणजे पन्नास हजाराचा फोन घेऊ का लाखाचा आयफोन घेऊ. किती ते प्रश्न आणि किती ते निर्णय! शक्यतो एकदा घेतलेला निर्णय परत बदलता येत नाही. आयुष्यात अनडू ची सुविधा नसते. आपण रिडू करू शकलोच तरी वेळ परत येऊ शकत नाही. कारण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही.


निर्णय घेताना आपण भविष्य निवडत असतो. चुकण्याची भीती असली तरी निर्णय टाळून उपयोग नसतो. आयुष्य कोणासाठीही थांबत नसते. कदाचित जीवन म्हणजे घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांचा अनुभव आणि न घेतलेल्या निर्णयांची खंत असावी.

Monday, 23 February 2026

मधूमेहः एक कथा आणि व्यथा

कुठेतरी वाचनात आलं की “काय रे विद्यापीठाच्या” (WhatsApp University) संशोधनानुसार रक्तदाब, मधूमेह यासारखे आजार हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य माणसांसाठी अस्तित्वात आणलेले आहेत. कोणता मोठा सेलिब्रिटी गेली वीस वर्षे रक्तदाबाच्या गोळ्या घेत आपल्या कार्यक्षेत्रात छान काम करतोय.. असं कधी ऐकिवात आहे का? कधीच नाही. पण आपण मात्र चाळीशीला लागलेली गोळी पुढील तीस वर्षे गोळ्या घेत सत्तर-ऐंशी वयाचा टप्पा सहज पार पाडतो.

या प्रवासात समस्त डॉक्टर प्रजातीचा सिंहाचा वाटा असतो. हे डॉक्टर लोक रक्तदाब, मधूमेह यांच्या अस्तित्वाची जाणिव करून देतात आणि आपल्या मागे एक ससेमिरा लागल्याची जाणीव होते. खरंतर तसे आपल्याला प्रत्यक्ष काहीच होत नसते. तरीपण हा बागुलबुवा आपल्याला सतत भॉऽक करत भीती घालत असतो. आपल्याला दुसऱ्या काही तरी झालेल्या व्याधीचं मूळ कारण हे मधूमेहच आहे असे पटवून दिले जाते.



तर या जोडगोळी मधील मधूमेह हा पन्नाशी नंतर तुमचा साथी बनलाच पाहिजे असा नियम आहे. तुम्ही सेलिब्रिटी नाही आणि तरी पण तुम्हाला मधूमेह नाही, असे झाले तर तुम्ही मेले आहात असे समजावे. असंही कुठंतरी काय रे विद्यापीठात लिहून ठेवलंय. असो, तर अखेरीस मला माझ्या जीवंत पणाचा दाखला मिळाला… किंबहुना डॉक्टर लोकांनी बहाल केला. तसा थोडा उशीरच झाला म्हणावे लागेल, पण वयाच्या ४५ व्या वर्षी माझ्या स्वभावातील गोडपणा रक्तात उतरला. तसा मी चालता बोलता ठिक ठाक असूनही मला असल्या आजारपणाचा शाप दिला गेला. मधूमेह.. आणि माझा एक प्रवास सुरू झाला.

अचानक घरामध्ये भीतीचे सावट पसरले. सर्वजण माझ्याकडे बघून हळहळ व्यक्त करू लागले. मी सुद्धा स्वतःला आजारी समजू लागलो. गेली वीस वर्षे गोळ्या घेणाऱ्या आईने माझ्याकडं बघून काळजी व्यक्त केली. जी चॉकलेट मी कधीच खात नाही ती सर्व लपवून ठेवण्यात आली. मुलींनी यातूनच पितृप्रेम प्रदर्शित केले. बायकोनं माझ्या आहारातून नव्वद टक्के गोष्टी काढून टाकल्या. शिल्लक राहिलेल्या दहा टक्के गोष्टींमधे फक्त काकडी गाजरंच राहिली.

या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या जगात अजून एका खेळण्याची घरात भर पडली. ग्लुकोमीटर… एका छानशा डब्यामधे ते उपकरण घरात आले. त्यातली सुई आणि छोटूशा फोनसारखे दिसणारे एक मशीन. एकंदरीत सुरवातीला सर्वच गंमतीशीर आणि छान वाटत होते. दर पंधरा दिवसांनी सकाळी उठले की रक्त तपासणे ही एक प्रथाच पडली. शेअर मार्केटच्या आकड्यां प्रमाणे आजचा साखरेचा आकडा काय याकडे सर्वांचे डोळे लागू लागले. माझ्या बोटातून रक्त काढणे या महान व अवघड कामाची जबाबदारी बायकोने स्वखुशीने स्वीकारली. मला एक वेळ खुद्द वाघ समोर आला तरी एवढी भीती वाटणार नाही तेवढी त्या सुईची वाटते. थेंबभर रक्तासाठी जीव पणाला लावावा लागतो. माझा साखरेचा आकडा फारसा बदल दाखवायला तयार नव्हता. सव्वाशे ते दोनशे दरम्यानच्या या खेळाचा मला पण कंटाळा आला. माझ्या ऑफिस मधल्या एका हुशार इसमाने तर दंडालाच एक मशीन बसवून घेतले. ते म्हणे दर मिनीटाला साखर तपासते आणि इंटरनेटवर अपडेट करते. आपण ते मोबाईलच्या ॲपवर पाहू शकतो. जेवतानाच्या प्रत्येक घासागणिक साखरेचा हिशोब ठेवू शकतो. बापरे! खाल्लेला प्रत्येक घास पचायच्या आधीच त्याचा पंचनामा करण्याची ही आधुनिक पद्धत मला फारसी रूचली नाही.

इतर सर्व आजार आणि मधूमेह यातील अतिशय महत्वाचा फरक… इतर आजारात तुम्हाला घरचे प्रेमाने खाऊ घालतात; पण इथे प्रेमाने खाऊच देत नाहीत. जे छान आणि चवीष्ट ते इथे वर्ज्य! जेवणातून भाताचे उच्चाटन झाले. चपातीचं प्रमाण कमी होऊन हिरव्या भाज्या वाढल्या. सॅलेडचा एक डबा माझ्या टिफिन मधे समाविष्ट करण्यात आला. सणावाराचं काही गोडधोड खाणं पाप ठरू लागले. घरात मुलींसाठी काही चमचमीत पदार्थ बनलाच तर तो मी घरी येण्यापूर्वी संपवून किचन मधून त्याचे पुरावे नष्ट केले जाऊ लागले. एकंदरीत मला बिनसाखरेची कडक शिक्षा ठोठावण्यात आली. चहा, कॉफी यातून साखर गायब झाल्याने त्याचा कडवटपणा मी गोड मानून घेऊ लागलो. या कठोर परिस्थितीत मला काही बऱ्याच गोष्टींचा शोध लागला. फक्त गोड पदार्थातच नव्हे तर फरसाण, चिवडा, चकलीसारखे खमंग पदार्थही साखर वाढवू शकतात. थोडक्यात म्हणजे जे काही खाण्यास गोड वाटतात ते सर्व साखर वाढवू शकतात. एक मोठ्ठा शोध… मनात पुरणपोळी, गुलाबजाम यांचा विचार जरी आणला तरी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. (संदर्भ अर्थातच - कायरे विद्यापीठ)

तर या मधूमेह नामक राक्षसाला हरवण्याचे मी सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पहाटे उठून चालायला सुरुवात केली. महिन्याभराच्या परिश्रमानंतर माझ्यातील “उद्या नक्की” या उदात्त विचाराने उत्साहावरती विजय मिळवला. ऑफिस मधील चहा कॉफी बंद करून मी ग्रीन टी बनवून प्यायला सुरू केले. आठवड्याभराच्या उत्साहानंतर बेचव हिरव्या पाण्याचा आणि ते बनवण्याचा कंटाळा येऊ लागला. कामाच्या व्यापातून सवडच मिळत नाही या सबबी वर मी ग्रीन टी थांबवला. सर्वात अधिक त्रास होतो, जेव्हा कोणीतरी जेवायला बोलवते. “असू दे रे! आजचा चीट डे!” असल्या प्रेमळ आग्रहाला बळी पडावे लागते. कधी एकटाच बाहेर गेलो असेन तर वडापाव चे दुकान खुणावते, पण निग्रह मी शक्यतो ढळू देत नाही. क्वचित प्रसंगी मीच स्वतःला समजावतो.. “असू दे रे! आजचा चीट डे!”

मधूमेह मागे लागल्यापासून मी एका डॉक्टरला नियमित भेट देत असतो. त्याचे नेहमीचे सल्ले “वजन कमी करा. व्यायाम भरपूर करा. खाण्याचे पथ्य पाळा. कामाचा ताण घेऊ नका.” मी प्रत्येक वेळी हे सर्व नव्याने ऐकतो आणि तसेच वागण्याचे त्यांना वचन देऊन बाहेर पडतो. मी कसा सांगू की मी खरंच प्रयत्न करतोय हो! पण सातत्यच रहात नाही.

आता हळूहळू हा मधूमेह माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. थेट कोणताही त्रास दिसत नसला तरी माझ्या इतर व्याधींचे प्रमाण वाढू लागले आहे. नजर कमजोर होणे, वारंवार बाथरूमला जाणे, सतत तहान लागणे असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. एक गोष्ट नक्की, निरामय जीवनशैली कशी असावी याचे ज्ञान अवगत झाले. किमान पक्षी जे काही करतोय ते सर्व अयोग्य याचे तरी ज्ञान प्राप्त झाले. या रोगातून या जन्मी सुटका नाही हे नक्की असले तरी त्याचे परिणाम कमी व्हावेत एवढेच प्रयत्न महत्वाचे!

मला वाटते, मधूमेह हा आजार नसून तुम्हाला योग्य जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणारा निसर्गाने दाखवलेला धाक आहे. त्याला घाबरून का असेना आपण योग्य वळण लावून आयुष्य जगावे. गोड खाण्यापेक्षा गोड जगण्याचा प्रयत्न करावा.

Wednesday, 28 January 2026

पुणे ते कोल्हापूर

मला खूप पूर्वी असे एक स्वप्न पडायचे. एक लांबलचक, मस्त गुळगुळीत रस्ता आहे. माझ्या हातात एक सुंदर कार आहे आणि मी सुसाट दीडशेच्या वेगाने जात आहे. वाटेत खड्डे नाहीत, अडथळे नाहीत, सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर नाहीत… आणि माझ्यासोबत फक्त वेग!

कालांतराने समजून चुकले की हे फक्त स्वप्नातच घडू शकते. या जन्मात असे काही घडणे शक्य नाही.

अनुभवाने आलेले शहाणपण म्हणा अथवा माझे वय म्हणा, मी आता ड्रायव्हिंगचा कंटाळाच करतो. तसं मला ड्रायव्हिंग आवडत नाही असं काही नाही; पण पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे मी ते शक्यतो टाळतो. लक्ष्मी रोड, टिळक रोड किंवा पेठेत जावेच लागले तर टॅक्सीचा पर्याय मला अधिक सोयीचा वाटतो. उगाच ट्रॅफिकमध्ये चिडचिड नको, पार्किंग कुठे करू हा प्रश्न नको, आणि गाडीला कोणीतरी घासून गेला तर होणारा मनःस्ताप तर मुळीच नको.


तरीपण कधीतरी गाडी चालवावीच लागते. रोज ऑफिसला जाताना किंवा कधी परगावी जाताना गाडीचा वापर आवर्जून करावा लागतो. हातात गाडी असली की सोईची वाटते. मुंबई, कोल्हापूर अशा अनेक फेऱ्या झाल्यात. कधी भटकंतीसाठीही फिरणं झालंय. या सर्व प्रवासांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असा प्रवास म्हणजे पुणे ते कोल्हापूर.

प्रयत्न आणि ध्येय यामध्ये अंतर असतं असं म्हणतात… पण हे अंतर दिवसेंदिवस वाढत जातं, हे माहीत नव्हतं. पाच–सहा वर्षांपूर्वी पुणे ते कोल्हापूर फक्त चार ते साडेचार तासांत पार पडायचे. तेच अंतर आता सात ते आठ तास घेतं. कदाचित पृथ्वीच खेचली जात असावी असं वाटतंय. पूर्वी कोल्हापूरहून सकाळी निघालो तर दुपारच्या जेवणाला घरी पोहोचायचो. आता बायकोला सांगावं लागतं “रात्रीच्या जेवणाची वाट पाहू नकोस.” जगभर दोन ठिकाणांमधील अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं; पण पुणे–कोल्हापूर हे अंतर संयम आणि BP मध्ये मोजतात, असं मला वाटतं.

प्रत्येक कोल्हापूर प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. इच्छित स्थळी पोहोचल्यावर युद्ध जिंकून आल्याची अनुभूती येते. प्रवासातील खड्डे, हादरे आणि चिघळलेले ट्रॅफिक यातून जीवनाचं सार सापडल्याचा भास होतो. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने तेच खड्डे आपल्याला जवळचे वाटू लागतात. मार्गात येणारा प्रत्येक खड्डा एखाद्या जुन्या ऋणानुबंधासारखा खुणावल्यासारखा वाटतो.

मी असे ऐकले आहे की कोणीतरी गुगलला खास सूचना देऊन नकाशामध्ये खड्डेही दाखवा असा सल्ला दिला आहे. गुगल यावर संशोधन करत आहे अशी बातमी आहे. रस्त्यातील प्रत्येक डायव्हर्जन तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असल्यासारखा वाटू लागते. एखादा किलोमीटर डायव्हर्जनशिवाय पार केला तर रस्ता चुकल्याची शंका येते. मुख्य रस्त्याच्या लांबीपेक्षा डायव्हर्जनची लांबी जास्त असते; मात्र रुंदी एक चतुर्थांश असावी लागते. तीन पदरी रस्त्याचं महत्त्व समजण्यासाठी अरुंद डायव्हर्जनची आवश्यकता मानवजातीला आहे, असं मला वाटतं. जागोजागी अशी पाटी दिसते “आगे अस्थायी मोड है।” आता या अस्थायी चा अर्थ किमान दहा पंधरा वर्षे असू शकतो.

या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं वर्णन करावं तेवढं कमीच. असं वाटतं की अख्खं पुणे नेमकं आजच कोल्हापूरच्या देवदर्शनाला निघालं आहे. सर्रास लेन बदलणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, या कला अवगत असल्या शिवाय तुम्हाला कोल्हापुरात प्रवेश नाही, अशी मला दाट शंका आहे. रस्त्याच्या मध्यभागातून संथ गतीने जाणारे भलेमोठे ट्रक तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. तुम्ही कितीही हॉर्न वाजवला तरी तो आवाज त्या ड्रायव्हरच्या कानापर्यंत पोहोचत नाही. या प्रवासात ओव्हरटेक करता येणं ही सुवर्णसंधी असते; त्यासाठी मागच्या जन्मीचे पुण्यसंचय लागते. चुकून एखाद्या वेळी मी संथ जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करायला लागलोच, तर तो अचानक वेग वाढवतो आणि मला माझी जागा दाखवून देतो. “अपनी औकात में रहो।” असं काहीतरी तो ओरडून सांगतोय असा भास होतो. समोरचा ट्रक, मागचा बसवाला आणि बाजूचा कारवाला — या सगळ्यांचं एकच ध्येय असतं: माझ्या गाडीला पुढे जाण्याचे कष्ट होऊ नयेत. संथ आणि आरामात माझा प्रवास व्हावा.

खरी परीक्षा असते ती टोल प्लाझावर. हे लोक टोल का घेतात यावर पुणे विद्यापीठात संशोधन चालू आहे, असं ऐकीवात आहे. तरीपण मी एक जागरूक नागरिक या नात्याने स्लो रस्त्यावर फास्टटॅगद्वारे टोल भरतो. टोल प्लाझा जवळ आला की किमान दहा गेट दिसतात आणि प्रत्येक गेटवर भल्या मोठ्या रांगा. त्यातली जी रांग छोटी वाटते, तिथे गाडी घुसवली की हमखास शेजारच्या उजव्या-डाव्या रांगा पटापट पुढे सरकतात आणि आपली रांग तशीच राहते. कोणाच्या तरी फास्टटॅगला प्रॉब्लेम असतो आणि तो बिचारा अडकलेला असतो. त्याच्या मागे उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या हॉर्न वाजवून काय सांगत असतात, हे मला आजतागायत कळलेलं नाही. अशा वेळी मागे हटणं शक्य नसतं, कारण माझ्या मागेही अजून चार गाड्या उभ्या असतात आणि त्या देखील हॉर्न वाजवून आपापल्या गाड्या जिवंत ठेवत असतात. टोल भरताना मी स्वतःच्या मनाला समजावतो, हे पैसे वर्तमानकाळातील रस्त्यांसाठी नसून उज्ज्वल भविष्यातील सुंदर भारतातील रस्त्यांसाठी केलेले अल्प प्रयत्न आहेत. पुढच्या पिढ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता तो नक्की कोणाच्या पिढीला, या वादात मी पडत नाही.

पूर्वी या प्रवासात लोक फक्त एक चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचे. आता तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण असा कार्यक्रम पार पडतो. या निमित्ताने वाटेतील सर्व उद्योगधंद्यांना चांगला हातभार लागतो, इतकाच उद्देश असावा.

भले तुमच्या असंख्य तक्रारी असतील; पण पुढच्या खेपेस कोल्हापूर फेरी करायचीच झाली, तर तुमच्याकडे काही पर्यायी रस्ता आहे का? … नाही ना? मग मुक्तपणे कौतुकच केलेलं बरं!

एकवेळ तुम्हाला तक्रार करणं जमेल, पण रस्ता बदलणं अजून कोणाला जमलेलं नाही.

Tuesday, 18 November 2025

उंदरावरचे शहाणे

उंदीर हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याची घृणा केली जाते आणि पूजा सुद्धा. गणपती बाप्पांनी उंदराला वाहन करून भलतेच धाडस दाखवलं आहे. ते त्यांच्या आईला भेटायला गेल्यावर बिचारी माऊली त्याला रागवून सांगत असणार, “अरे बाळा! तुला दुसरा प्राणी नाही का मिळाला? त्याला मुळीच घरात घेऊन यायचं नाही. कालच नवीन साडी आणलेली कपाटात ठेवलीय. दादाकडं बघ, त्यानं मोर पाळलाय. तुझ्या वडिलांनी बैल पाळलाय. आणि तू उंदीर! काय ही दरीद्री लक्षणं! अरे, वाघ, सिंह, गेंडा, घोडा पाळ... हे कसलं खुळ डोक्यात घेतलंयस?” असो! बाप्पाला त्याची आई रागवत असेल का नाही, हे माहीत नाही. पण उंदीर मात्र घरोघरी डोकेदुखीचा विषय आहे. एकवेळ कितीही घृणा वाटली तरी पाल कधी डोकेदुखी होऊ शकत नाही... पण उंदराचं अस्तित्व हे घरात भूत शिरल्या प्रमाणे वाटू शकतं.

गावाकडील घरांमध्ये पाळीव प्राण्यांच्या बरोबरीने उंदरांचा संचार हमखास आढळतो. तिथे राहणाऱ्या लोकाना उंदराच्या दर्शनाने मुळीच कुतूहल अथवा भीती वाटत नाही. छताच्या तुळईवर, अडगळी मधे, कपाटामध्ये, धान्याच्या साठवणी जवळ हे उंदीर हक्काने संचार करीत असतात. त्यांच्या पाळतीवर मांजरे पण फिरत असतात. मांजराला हुलकावणी देण्यात तिथले उंदीर बरेच तरबेज असतात. तिथली मांजरे सुद्धा ‘कष्टाविण फळ नाही’ या नियमाने ‘पळल्याविण उंदीर नाही’ हे समजून चपळ असतात. गावाकडे उंदरामधे सुद्धा अनेक प्रकार आढळतात. पिटूकल्या उंदरांपासून ते मोठ्ठाले उंदीर.. यामधे पिटूकले उंदीर अतिशय चपळ आणि नाठाळ असतात. भारताच्या सीमेवरील घूसखोरीच्या प्रकारावूनच 'घुस' हे नाव पडले असावे. मातीच्या भिंतींना फोड्यात यांचा दातखंडा. हा प्राणी भीतीदायक आणि धान्य साठवणीचे मोठे नुकसान करण्याची ताकद. चिचुंद्री हा प्राणी लांब तोंडाचा आणि घराच्या काना कोपऱ्यात चुक-चुक असा विचित्र आवाज काढत पळणारा प्राणी. या सर्व प्रजातींचा उद्देश ठरलेला असतो.. खादाडी आणि नासाडी!

पिटूकल्या उंदरांना शहरात फिरण्याचा परवाना मिळालेला असतो. बाकीच्या प्रजाती शहरवासीयांना तशा दुर्मीळच. शहरी भागात मात्र उंदरांची दहशत ही बिबट्यांच्या दहशतीपेक्षा अधिक असते. तसं उंदरांचं दर्शन दुर्मीळ असले तरी बऱ्याचदा ते आपल्या घरी हजेरी लावतात. जर कधी घरच्या मालकीणीची आणि त्या उंदराची नजरा नजर झालीच तर घरात प्रचंड हलकल्लोळ माजतो. अशा प्रसंगात उंदीरही बुचकळ्यात... मी घाबरू का, ही महिला घाबरेल? नक्की कोणी कोणाला भॉकऽऽ केलंय या गोंधळात घरात बरीच पळापळ होते. घरचे यजमान मात्र गोंधळलेल्या अवस्थेतच उंदीर हटाव मोहीम राबवू लागतात. शहरात काही लोक मांजर पाळतात. पण ते लाडावलेले मनीमाऊ किंवा बोकूली उंदीर पाहताक्षणी मालकीणीच्या मागे लपून बसतात. उंदीर हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमातून वगळलेला असतो.

खूप वर्षांपूर्वी आम्ही एका छानशा टाऊनशिपमध्ये राहात होतो. मुंगीला सुद्धा आत शिरण्यासाठी सिक्युरिटीची परवानगी घ्यावी लागे. तरीही त्यांची परवानगी न घेता उंदीरांचा टाऊनशिपमध्ये बराच सुळसुळाट झाला. टाऊनशिपमध्ये जर साप आढळला तर एका सर्पमित्राला बोलवण्यात येई. पण आमच्या ओळखीचा कोणी उंदीरमित्र नव्हता. घरातील बऱ्याच कापडी गोष्टींना उंदराने आपल्या मुखस्पर्शाने अपवित्र करून टाकल्या होत्या. त्याचं अस्तित्व जाणवलं पण त्याचं दर्शन होत नव्हतं. घरात एखादा अतृप्त आत्मा वावरत असावा असं बायकोला वाटू लागलं. दिवसभर मी ऑफिस गेलो की ती घरात एकटी राहायला घाबरू लागली. रोज संध्याकाळी घरी आलो की आजचं उंदराचं प्रताप यावर चर्चा घडू लागल्या. रोज सकाळी उठल्यावर त्याच्या 'रात्रीस खेळ चाले' आढावा घेणं असं रूटीन सुरू झालं. असेच पाच-सहा दिवस उलटले. तरीही या बहादूराने आम्हाला त्याचं दर्शन दिलं नव्हतं. अखेरीस तो दिवस उगवला. एका महान संध्याकाळी बायकोला अचानक तो दृष्टीस पडला. 'आजी म्या ब्रह्म पाहीले' या सुरात घरात हाहाकार उडाला. आता मात्र माझ्यावर पडलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. दुकानातून उंदीर मारण्याचे औषध आणलं. गणपती बाप्पाला नमस्कार करून माफी मागितली आणि ते औषध घराच्या काना-कोपऱ्यात पसरून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पासून काहीच हालचाल दिसली नाही. कदाचित उंदराला आमच्या कृष्णकृत्याचा अंदाज आला असेल आणि त्याने पळ काढला असेल असं मी समजूत करून घेतलं. पण दोन दिवसांनी अडगळीच्या खोलीतून घाणेरडा वास येऊ लागला. तिथल्या एका कोपऱ्यात बिचाऱ्याचा धारातीर्थ पडलेला देह मला दिसला. पुन्हा एकदा बाप्पाची माफी मागून मी उंदराला घराबाहेर कचऱ्यात टाकून दिला.

तसे आयुष्यात बरेच उंदीर आले आणि गेले, काही आवर्जून स्मरणात राहीले तर काही दूर पळून गेले. अलीकडेच माझा एका अदृश्य उंदराचा सामना झाला. आमच्या सोसायटी मधे बऱ्याच लोकानी उंदीर पाहिल्याच्या बातम्या पसरवल्या. कोणाच्या बाथरूम मध्ये तर कोणाच्या किचन मध्ये! कोणाच्या कारच्या टपावर तर कोणाच्या बाल्कनीत… अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक उंदीर पाहिले. काही जणानी तर नुकसानीचे किस्से आणि आकडे रंगवून आणि फुगवून सोसायटीच्या ग्रुपवर टाकले. या सर्व कथांमधे तथ्य किती आणि अफवा किती यावर आमच्या घरात चर्चा रंगल्या. आम्ही कथाकाराच्या व्यक्तिमत्वावर कथेची सत्यता निश्चित ठरवली. कोणीतरी यावर अशी बौद्धिक टिप्पणी केली की हे उंदीर मुळचे आपल्या सोसायटीचे नाहीतच… ते जे अमुक त्यांचे सामान घेऊन आले ना, त्यावेळी त्यांच्या सामानातून हे उंदीर आले. बिच्चारे अमुक अजून सोसायटीच्या ग्रुपमधे सामील झाले नव्हते. तर या अशा सर्व रंजक कथा आणि चर्चेचा आम्ही उभयतांनी यथेच्छ आनंद घेत होतो. आणि अचानक तो दिवस उजाडलाच… त्या भल्या सकाळी आमच्या ड्राय बाल्कनीची डासांची जाळी फाटलेली दिसली. ते पाहल्यावर घरात उंदीर शिरल्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले. घरात सर्व काने कोपरे पाहिले पण कुठेच मागमूस लागेना. काहीही कुरतडलेले नव्हते, ना फाटलेले होते, काही सांडलेले नव्हते, ना विस्कटलेले होते. तरीपण त्याच्या येण्याची चाहूल मनात कुरतडत होतीच. कुणीतरी आहे तिथे या मालीकेची शृंखला सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. पण अचानक मला आमच्या बाल्कनीचे जाळीचे दार सुद्धा कुरतडलेले दिसले… आणि भांड्यात जीव पडला. उंदराने ड्राय बाल्कनी मधून शिरून बाल्कनीतून पोबारा केला यावर शिक्कामोर्तब झाले. पण घरात त्याने काहीच नासधूस न करता गेला याची खंत वजा आश्चर्य वाटत राहिले. कदाचित घराचे इंटेरिअर आणि नीटनेटके पणा पाहून तो खुश झाला असावा आणि आम्हाला माफ केले असावे. त्यानंतर जाळीवाल्याला जाळी अशी तकलादू का अशी विचारणा केली असता, त्याचा उलट प्रश्न आला. “तुमच्या घरी उंदीर येतील ते बोलला नाही! मी फक्त डासांसाठी जाळी बसवून दिली होती.” माझ्या कडे यावर उत्तर नव्हते. त्याने पुन्हा एकदा भरीव रक्कम वसूल करून डास व उंदीर दोघां पासून सुरक्षित अशी जाळी बसवून दिली.

त्यानंतर आम्ही पण सोसायटी ग्रुपवर आमची रसभरीत कथा प्रकाशित केली आणि आमच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे नुकसानीचे आकडे सजवून रंगवून इतरांना सांगितले.

Sunday, 29 June 2025

कावळा - एक तुच्छ शोध

कावळा.. तसा तुच्छ असला तरी मुळीच दुर्लक्षित पक्षी नाही. आपण फारसे महत्त्व द्यायचे नाही ठरवले तरी ते दिले जातेच. मोबाइलच्या युगात चिमण्या दुर्मिळ झाल्या असल्या तरी कबुतरं आणि कावळे मात्र आपल्या खिडकीबाहेर ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि जाता जाता पोटं साफ करून जातात. तसा मला या पक्षांवर फारसा राग अथवा प्रेम नसले तरी मी कावळ्यावर एखादा लेख लिहावा असा एक क्षुद्र विचार.



एखाद्या दिवशी निवांत झोपावं, आणि उशीरा उठावं असं ठरवलं तर सहाच्या आधीपासून खिडकी बाहेर कावळा कर्रकश्श्य ओरडायला चालू करतो आणि झोपेचा सत्यानाश होतो. दुपारी थोडं आडवं व्हावं म्हणलं तर हा हमखास बोंबलून वैताग आणतो. याच्या कर्ण कर्कश्श “काव! काव!!” गजराने भयंकर चिडचिड होते. कदाचित याचमुळे चिडण्याला ग्रामीण भाषेत “कावणे” म्हणत असावेत. लोकांना मी पोपट पाळलेलं पाहीलं आहे, चिमण्या पाळलेलं पाहिले आहे, अगदी कबुतरं सुद्धा पाळलेलं पाहीलं आहे. पण कोणी कावळा पाळलेला माझ्यातरी माहितीत नाही.


खरं म्हणजे त्याच्या काळ्या रंगाचा मला मुळीच राग नाही पण का कुणास ठाऊक तो उगाचच बेरकी असल्या सारखा वाटतो. आणि इतरांना त्रास देण्यातच आनंद मानत असावा असा भास होतो. चोचीतून टपकणारी लाळ, काहीतरी लंपास करण्याच्या तयारीत असलेली भिरभिर नजर... यामुळे तो कोणाला आवडावा असा पक्षी मुळीच वाटत नाही. बंर, पळवलेला माल खाऊन टाकेल असेही नाही, हा बावळट, सगळं खाद्य वाटेत सांडत जातो. अरे! जर तुला खायचं नव्हतं तर पळवलंसच का? आमच्या बाल्कनीत अनेकदा पावाचे तुकडे, भजाचा घास, हडूक.. असलं काहीतरी पडलेलं दिसतं. त्या सर्वांचे श्रेय या काक महाराजांनाच जातं. कधी चुकून बाल्कनीत काही खात उभारलो तर हमखास हा कुठूनतरी अचानक येऊन झडप मारतो आणि खाद्य लंपास करतो. अशा अचानक होणाऱ्या आक्रमणाची मलाच भीती वाटते. त्याला मात्र माझी कधीच भीती वाटली नाही. कितीही हटकलं तरी हा जागचा हलत नाही. या वरून एक गोष्ट नक्की… मरणोत्तरांत माझ्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.


लहानपणीच्या चिऊ काऊ च्या कथेतील लाचार कावळ्यांची कधीच किव वाटली नाही; याउलट शेणाचं घर बांधणाऱ्या कावळ्याची फक्त घृणाच वाटली. रांजणात दगडं टाकून पाणी पिणारा चतुर कावळ्याची गोष्ट मला कधीच पटली नाही. हे डोकं कावळ्याचं असूच शकत नाही. कदाचित घारीला कथाकाराने चुकून कावळा समजलं असावं.


याच्या कोकलण्याच्या स्वभावाला अगदी ज्ञानेश्वरांनीही ओळखले होते. पैलतोगे काऊ कोकत आहे.. असे त्यांनी कौतुक केलेले आहे. रामायणात याच चावट कावळ्याने सीतेला त्रास दिला होता म्हणून रामाला त्याचा एक डोळा फोडावा लागला होता. याचा अर्थ कावळ्याच्या व्रात्यपणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदी भाषिक लोकानी “झूठ बोले, कौवा काटे। काले कौवे से डरीयो।” असे बोलून काहीतरी भयंकर गैरसमज समाजात पसरवले आहेत. एकतर सगळे कावळे हे काळेच असतात. “काले कौवे” काय? नीळा, पिवळा कावळा मी तरी पाहिलेला नाही. फारतर ठार काळा किंवा धुरकट काळा अशा दोनच शेड मी पाहिल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे खोटारड्या व्यक्तीला चावायचा या महाभागाला कोणी अधिकार दिला? असो! कदाचित उत्तरेकडील कावळे मराठी कावळ्यांपेक्षा जास्त सुज्ञ असतील.


कावळ्याच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कावळा शिवणे. याचा अर्थ कावळ्याने भाताचा घास खावा हे अपेक्षितच नसतं, त्यानं ते फक्त शिवावे! बिच्चारा कावळा! स्वर्गवासी व्यक्तीला बाकीचे सर्व पशू पक्षी सोडून कावळ्याच्या रूपातच का यावेसे वाटते हे एक नवलच! कोणी पोपट बना, मांजर बना… पण असो! जे धर्मग्रंथात नियम लिहिलेत ते मृत्यू नंतर ही पाळावेच लागतात. तर, चार पाच भाताच्या पिंडांमधून अचूकपणे योग्य ती पिंड निवडण्याची परीक्षा प्रत्येक मनुष्यामागे बिचाऱ्याला द्यावी लागते. अरे हा माणूस सदा सर्वकाळ मला हाकलत असतो आणि आज का एवढा उदार? अशी शंका त्यावेळी कावळ्याच्या मनात नक्कीच येत असणार. एखादा कावळा हुशार असलाच तर म्हणेल की माणसानं काहीतरी सापळा रचलेला दिसतोय. कावळ्याने पिंड शिवावा यासाठी याचना करताना मी पाहिलेले आहे. याचा अर्थ कावळा मराठी समजू शकतो. कदाचित सर्व भारतीय भाषांचे ज्ञान त्यांना अवगत असावे. परदेशी कावळे मात्र भाषेच्या ज्ञानात कुठंतरी मागास असावेत. त्यामुळे तिथं अशी रिस्क कोणी घेत नसावेत.


पुलंनी एकदा परदेशी प्राणीसंग्रहालयात कावळ्याला पाहील्यावर तो “क्रो क्रो” असे ओरडतो का अशी एक सहज शंका व्यक्त केली होती. त्यानंतर मी परदेशात गेल्यावर आवर्जून कावळ्यावर नजर ठेऊन होतो. त्याचा काव काव आवाज ऐकल्यावर मराठी भाषेची महती पटली. मनुष्य कितीही प्रगत झाला तरी त्याच्या दिनचर्येत कावळ्याचे स्थान अबाधित आहे. तसं त्याच्यावर भरपूर काही लिहावं इतकं काही मोठं त्याचं कृतृत्व नाही. तरीपण चार ओळी खरडून त्याला न्याय देण्याचा हा रिकामा प्रयत्न!

Sunday, 1 June 2025

एक घरगुती प्रश्न

तुम्ही घरमालक आहात का? तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे? एक फुकटचा सल्ला.. नको, ताबडतोब घर विका! भाड्याच्या फंदातच पडू नका. उगाच मनस्ताप! स्वानुभवाचे बोल आहेत. तरीपण धाडसी निर्णय घेताय? माझ्या लाख लाख शुभेच्छा!


मनुष्याच्या मुलभूत गरजांपैकी घर ही एक मुलभूत गरज आहे. चार भिंती आणि डोक्यावर छत इतकीच सोपी व्याख्या वाटली तरी प्रत्येकाच्या मनात एखादे छानसे घर दडलेले असतेच. ते छानसे हे कधीच लहानसे नसते, ते महालच असते. कथा कादंबऱ्या मध्ये “माझी झोपडी प्यारी” अशा पोकळ कल्पना उगाचच रंगवलेल्या असतात. अलिशान, दोन-तीन मजली, प्रशस्त अंगण, मोठाली गच्ची, मोठ्या मोठ्या बेडरूम्स, किचन, डायनिंग, हॉल, अशा अनेक खोल्या… कल्पनेतले घर हे कधीच टुमदार किंवा 1RK प्रकारात मोडत नाही. भले, स्वतःची लायकी काहीही असो.


काही कारणांमुळे अशी इच्छा पूर्ण होईलच असे काही नाही. विकत घेणं परवडत नसलं तरी भाड्यानं घेणं आवाक्यात बसू शकतं.. असा एक समज! त्यामुळे एक सोपा उपाय म्हणजे घर भाड्याने घेणे. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी एक जमात आपल्या सेवेत बसलेली असती.. ती म्हणजे घरमालक! किती भाडं देणार, किती कालावधी साठी राहणार आहात हे फारसे महत्वाचे नसते, तुम्हाला जसं हवं तसं घर देण्यासाठी घरमालकानं तत्पर राहणं बंधनकारक असतं. जावई देखील करणार नाहीत इतका हट्ट करण्याची भाडेकरूना मुभा असते. या अशा समजुती मधील बरेच निरागस भाडेकरू मी अगदी जवळून पाहिले आहेत. त्याना मी सेवा पुरवण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.


अगदी ठरवून नाही पण काही कारणाने आणि नशीबाने गेल्या काही वर्षात तीन चार घरांचा घरमालक बनण्याची मला भगवंताने शिक्षा ठोठावली. स्थावर मालमत्तेतून काही पैसे गाठीला सुटावेत इतकीच माफक अपेक्षा ठेवून मी गुंतवणूक केली. वास्तु मध्ये गुंतवलेले पैसे हे कालांतराने वृद्धिंगत होतात आणि शिवाय ते चोरीला जाण्याचे भय सुद्धा नसते, अशी माझी एक बाळबोध समजूत. लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा तो एका सोप्पा उपाय.. हा एक मोह!


असो! नानाविध पंथाचे, धर्माचे, भाषेचे भाडेकरू मी याची देही याची डोळा पाहीले आहेत आणि अनुभवले आहेत. सभ्य असोत वा भांडखोर असोत.. सर्वांची एकच माफक इच्छा असते, कमी भाड्यात राजेशाही थाट मिळावा. भाडेकरूचे नखरे हे घर पहायला येण्यापासून सुरू होतात. सांगितलेल्या वेळेला येतीलच याची खात्री नसते. आलेच तर घर बघताना प्रत्येक खोलीत जाऊन नाके मुरडतात. एकदा तर एका महाभागाने तब्बल पंचवीस सुधारणांची यादीच करून दिली. शिवाय भाडे मात्र कमी करण्याचा हट्ट होताच. एसी बसवून हवेत, किचन ट्रॉली हवेत, नवीन कपाटं हवीत, स्टडी टेबल, ड्रेसिंग टेबल, कपडे वाळवण्याचे रॉडस.. एक ना दोन! इतक्या सगळ्या सोयीच्या घरात त्याला सहा महिनेच रहायचे होते.


प्रत्येक भाडेकरू हा कशा ना कशा प्रकारे समस्या निर्माण करतात. कधी जाणून बुजून तर कधी अजाणतेपणाने आपल्याला एक नवीन अनुभव शिकवून जातात. माझ्या एका फ्लॅटमधे काही विद्यार्थी राहत होते. एक दिवस सकाळी लौकर मला सोसायटीच्या चेअरमन चा फोन आला. त्या विद्यार्थ्याकडे रात्री काही मित्र आले होते आणि ते सर्व लिफ्टमध्ये एकाच वेळी घुसल्यामुळे लिफ्ट नादुरुस्त झाली. त्यानी तर cctv चा व्हिडीओ पाठवून दिला. दहा लोकांच्या लिफ्ट मध्ये तब्बल अठरा लोक घुसले होते. आता मी काय करणार? भाडेकरू ला फोन केल्यावर त्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने दाखवले. मग पुढील दोन तास मी “अपराधी कौन?” मालिकेच्या डिटेक्टिव ची भुमिका बजावली आणि अखेरीस माझ्या भाडेकरून कडून लिफ्ट दुरूस्तीचा खर्च वसूल करण्याचे वचन दिले. एकदा एक तरूण जोडपे रहात होते. मुलगा कुठेतरी नोकरी करीत होता. कदाचित त्याची आर्थिक स्थिती ठिक नसावी. दर महिन्याला वेळच्या वेळेला भाडे देण्याचे कबूल केले असले तरी प्रत्येक महिन्याला मला वाट पाहून आठवण करावी लागे. एका महिन्यात तर मीच आठवण करायचं विसरलो आणि तो पण सोयिस्कर रित्या विसरला. पुढच्या महिन्यात त्यानं दिलेले भाडे नक्की कोणत्या महिन्याचे आहे हे समजायला मला चार दिवस लागले.


प्रत्येक भाडेकरू हा नवीन काहीतरी शिकवून जातो. प्रत्येकाचा हेतू शुद्ध असतो. घरमालकाला शहाणे करून सोडायचे...! एकदा एका भाडेकरूने घर सोडण्याच्या आधी महिनाभर मला विनंती केली, शेवटच्या महिन्याचे भाडे डिपॉझिट मधून वळते करा आणि उर्वरित रक्कम मला आत्ताच देऊन टाका. मी पण विचार केला.. बिचाऱ्याला पैशाची गरज असेल. मी ताबडतोब सर्व रक्कम देऊन टाकली. ठरल्या प्रमाणे शेवटच्या दिवशी घराची किल्ली त्याने दिली. घराची अवस्था पाहून मी घाबरूनच गेलो. सर्व भींतींवर त्याच्या चार वर्षांच्या मुलीने चित्रकला मुक्तपणे साकारली होती. सोफ्याचे कव्हर फाटले होते. दोन पंखे बंद पडले होते. किचन सिंकमधून पाणी गळून ट्रॉलीचे दरवाजे कुजले होते... आणि संपूर्ण घरात कचऱ्याचा डोंगर होता. डोकं सुन्न झालं. मला मुकाट्याने सर्व खर्च करण्याशिवाय पर्याय नव्हता.



कोरोनाच्या काळात अजून एक अनुभव! माझ्या सिंगापूरातल्या फ्लॅटमधे एक भारतीय भाडेकरू रहात होता. बिचारा चांगला होता. फारशा तक्रारी करीत नसे आणि वेळच्यावेळी भाडं पण देत असे. त्याच्या आणि माझ्या दुर्दैवाने आम्ही एका भयंकर परिस्थितीत अडकलो. काही कारणांमुळे तो आणि त्याची बायको भारतात आले होते आणि लॉकडाऊन लागले. मी पण भारतात! त्याला परत जाता येईना. त्यात त्याची नोकरी गेली. तो म्हणाला, “साहेब, लॉकडाऊनमुळे आम्ही अडकलो, कृपया फ्लॅटचं भाडं तरी माफ करा!” आता याची नोकरी जाण्याची मला शिक्षा झाली होती. त्यांचं सामान सिंगापूरमध्ये घरात आणि घराची किल्ली त्याच्याकडं भारतात! तो आणि मी दोघेही चिंताग्रस्त! अखेरीस त्यानं किल्ली कुरीयर करून माझ्या एजंटकडे पाठवली. त्या एजंटनं सर्व सामान बाहेर काढून त्याच्याकडे पाठवले. मला तर तो एजंट अगदी देवासमान वाटला. त्यामुळं मला भरभक्कम प्रसाद चढवावा लागला.


तुमच्या घरात जर विद्यार्थी रहात असतील तर काही वेगळेच अनुभव असतात. मुलं रहात असतील तर शेजारचे तक्रारी करतात. वेळी अवेळी येतात, दंगा करतात. घराचा उकीरडा करून टाकतात. आणि मुली असतील तर शेजारच्या काकूना त्यांचे वागणे खटकते. त्यांचे कपडे, त्यांचे मित्र, उशीरा घरी येणे. जणू काही या माझ्याच मुली असल्या प्रमाणे माझ्या कडे तक्रारी करतात. “या मुली रात्री बेरात्री येतात, आणि त्यांचे कपडे तर बघायलाच नको! तुम्ही जरा भाडेकरू नीट बघून ठेवत जा ना!” सगळ्यात गंमत म्हणजे घर भाड्याने देताना ज्या मुलांच्या अथवा मुलींच्या हातात किल्ली दिलेली असते, ती मुलं किंवा मुली घर सोडताना नसतातच. दुसरंच कोणीतरी किल्ली परत करून जातो. सर्व सोसायटींचा एक अलिखित नियम असतो, विद्यार्थ्यांना घर भाड्याने द्यायचे नाही. हा नियम कधी कधी इतका त्रासदायक ठरू शकतो की तुमचे घर दोन तीन महिने रिकामे राहू शकते. 


भाडेकरूंचे मुड हे शेअर मार्केट पेक्षाही वेगाने बदलतात. एका भाडेकरूने तर डिपॉझिट दिले आणि आठ दिवसात रहायला येतो सांगून गेला. जाताना रितसर ॲग्रीमेंट पण करून गेला. सहा दिवसानंतर फोन करून सांगितले की डिपॉझिट परत द्या तुमचा फ्लॅट नको आहे. मी तर अवाकच झालो. कारण काय तर त्याला दुसरा फ्लॅट मिळाला. डिपॉझिट जप्त करावे किंवा काही पैसे वळते करावे ठरवले तर त्याचे सतत फोन. ऑफिस ची कामं करू का याच्या फोनला उत्तर देत बसू? अखेरीस त्याचे सर्व डिपॉझिट परत करून सुटकेचा निश्वास सोडला. एका हुशार भाडेकरूने तर एक महिना राहिल्यावर सांगितले की घर सोडायचे आहे. कारण काय तर बायकोला पार्किंग मध्ये गाडी पार्क करता येत नाही. “अरे! तिला ड्रायव्हींग स्कूल मधे घाल.” असा खोचक सल्ला देण्याचा मोह मी टाळला.


प्रत्येक नवीन भाडेकरू रहायला येताना जरी सर्व कागदपत्रांची शहानिशा केली असली तरी ती व्यक्ती भविष्यात कशी वागेल हे कोणीच सांगू शकत नाही. आजकाल हे एजंट लोक पोलीस व्हेरीफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत आणि ॲग्रीमेंट चे रजिष्ट्रेशन इतक्या तत्परतेने करतात की आपल्यालाच त्या कागदांवरती शंका येऊ लागते. 


इतके सर्व अनुभव गाठीशी घेऊन मी आजही एक समर्थ घरमालक अशी भूमिका चोखपणे पार पाडीत आहे. येणाऱ्या प्रत्येक भाडेकरू बरोबर नव्याने गोड बोलून व्यवहार करीत आहे. कॅपिटल गेन टॅक्स नामक राक्षस मला फ्लॅट विकू देत नाही आणि आजही मी भाडेकरूंच्या सेवेत रूजू आहे.