Sunday, 9 April 2017

अवघे धरू सुपंथ

शाळे मधे विवीध दळण वळणाची साधने असे काही तरी शिकण्यासाठी प्रवास साधनांची नावे पाठ करावी लागत. मला मात्र सतत असे वाटे की या लोकांना पीठाच्या गिरणीसाठी खुप लांब जावं लागतंय. आमच्या घराजवळच गिरणी असल्यामुळे त्या बाबतीत आम्ही नशिबवान मानून अभ्यास संपवत असे. पुढं आयुष्यात दळण नसेना पण या साधनां मधून बरीच वळणं घेणं नशिबात होतं.

पुर्वी आमचा बराचसा प्रवास हा राज्य परीवहन मंडळाच्या कृपेनेच होत असे. एश्टी ही हक्काची आणि अतिशय सोयीची वाटायची. आजही या लाल गाडीकडे पहाताना बालपण आठवतं. लाल डब्या बद्दल कमालीचे प्रेम अजूनही आहे. त्याकाळी गावाला जायचे म्हणजे फक्त एशटी असेच समिकरण होते. कितीही गर्दी असली तरी या वाहनाची ओढ कायम रहायची. बसण्याच्या जागेवरून होणारे विवीध प्रेमळ संवाद ऐकत अथवा खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झोतात पेंगत माझा प्रवास खुप छान होत असे. बस चालक आणि वाहक यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संवादाचा मी भुकेलेला असायचो. वाहका शेजारची जागा म्हणजे मंत्रीमंडळातील स्थान पक्के वाटायचे आणि चालका शेजारची जागा म्हणजे सिंहासनारूढ वाटायचं. चालकाचे नैपुण्य, वाहकाच्या भाषेतील सोज्वळ गोडवा आणि सहप्रवाशांचे सभ्य वर्तन या सर्वांचे मला बाळकडू पाजले गेले आहेत. माझ्या बालपणी कित्येक तास मला या सर्व विद्वानांचा सत्संग लाभलेला आहे. प्रत्येक प्रवासात आपल्या शेजारी कोणीतरी सुंदर व्यक्ती बसायला यावी अशी मनापासून ची इच्छा असे. अशी दिवास्वप्न कधीच पूर्ण होत नसत हे निश्चित! माझ्या शेजारची जागा जणू धोतरवाले मामा, गुटख्याचा तोबरा भरलेला भाऊ किंवा मिश्री लावलेल्या वृद्ध मावशी यांच्यासाठी एश्टी मंडळानं आरक्षितच ठेवलेली असायची. त्यांनी माझ्या शेजारी येऊन धपकन अस्ताव्यस्त बसण्यानं मला माझी जागा आखडून घ्यावी लागे. त्यांना सोडायला आलेल्या त्याच्या नातलगा बरोबर सहृद संवाद माझा अडथळा जुमानता खिडकीतून बाहेर डोकावून चाले. त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या सुगंधामधे स्नान करीत प्रवास चालू होई. गाडी सुरू झाल्यावर हमखास झोपण्याचं त्याना वरदानच असे. झोपेत माझ्या खांद्याचा उशी तत्सम उपयोग व्हावा या हेतूने त्यांचा देह माझ्या दिशेला झुकू लागे. मी पण त्या व्यक्तीची झोप मोड करण्याचे पातक घेता आगंतुक संकटातून स्वत:ला कसे वाचवता येईल याच प्रयत्नात राही. यामधे बराचसा वेळ कसा निघून जाई हे मलाच समजत नसे. वाटेत आलेल्या थांब्यांवरील स्थानकांवर पेरू, गोळ्या, बिस्कीटं विक्रेते हमखास त्यांची झोपमोड करण्यास उपटत असंत. खिडकी आणि धोतरवाले मामा अथवा मिश्रीवाल्या मावशी यांच्या दरम्यान माझे स्थान ठळक असले तरी खिडकी वर त्यांचे एकछत्री राज्य चाले. कधी उघडायची, कधी झाकायची, किती फट उघडायची या सर्व गोष्टींवर बारकाईने जातीने त्यांचे लक्ष असे. विक्रेत्याकडून हमखास खरेदी करणे गरजेचे आहे असा त्यांचा समज असायचा. माझ्या अंगावर शरीराचा पूर्ण भार देऊन खिडकी बाहेर उभ्या असलेल्या विक्रेत्या बरोबर यथा योग्य व्यवहार चाले. शेअर बाजारा प्रमाणे भाव केले जायचे आणि फक्त ठराविकच व्यवहाराना अंतिम स्वरूप देण्यात येई. शेजारी भाऊ असेल तर व्यावहारीक त्रास नसे पण त्यांच्या माव्याच्या धुंद वासामधे एश्टी ऐवजी विमानातून प्रवास चालू असल्याची अनुभूती मिळे. भाऊ जोपर्यंत तोंड मिटून गप्प आहेत तोपर्यंत रामराज्य वाटे. काही कारणानं त्यांचा बोलण्याचा प्रसंग आलाच तर मुखावाटे सुगंधी अभ्यंगस्नान घालणार हे नक्की. अशा लोकांची झोपमोड होऊ नये यासाठी मी सदैव प्रयत्नशील असे. प्रवास संपताना मावशी अथवा मामा अथवा भाऊ ला सोडून उतरताना पुनर्जन्मावर चा विश्वास अधिक दृढ होई. आता या दुर्मिळ होत चाललेल्या अनुभवाची खंत माझ्या मनात टोचत राहते.

मुंबई पुण्या सारख्या शहराच्या संपर्कात आल्यावर बस आणि लोकल या स्थानिक वाहतुकीच्या सुविधा दिनक्रमाचा भाग बनून जातात. बस मधे शक्यतो कोणी कोणाचा नसतो. तिथं तिऱ्हाईताकडं हसून पाहणं हे वेड्याच्या इस्पितळातून पळालेल्या वेड्याचे लक्षण समजलं जातं. नाव जरी बस असले तरी शक्यतो उभारूनच प्रवास नशीबात असतो. बसच्या रस्त्यावरील प्रवासाबरोबर आपला पण प्रवास मागील दरवाज्या पासून पुढील दरवाज्या पर्यंत होणे आवश्यक असते. जर एखाद्याने एकाच ठिकाणी डेरा टाकला तर त्याचे तिथून उच्चाटन करून पुढे ढकलणे प्रत्येक सहप्रवाशाचे आद्य कर्तव्य असते. बसमधे बसण्याच्या जागेवरून सांस्कृतिक संवाद शक्यतो विकोपाला जात नाहीत. क्वचित तुरळक प्रेमाचे संवाद घडतात पण ते लगेचच विरून जातात. बसचा वाहक हा नुसताच गुरगुरणारा वाघ असतो पण एखाद्या प्रवाशानं डरकाळी फोडली तर मात्र बिचाऱ्यामधली शेळी दर्शन देते.

बस प्रमाणेच लोकलच्या प्रवासाची सुध्दा खासियत वेगळी असते. लोकल आणि गर्दी हे समानार्थी शब्द आहेत असे वाटते. सीट नंबर नसताना आणि आरक्षणाची सोय नसताना प्रत्येक जागा ही कोणाच्या ना कोणाच्या नावाने सुरक्षित ठेवलेली असते. नवीन माणसाने त्यात घुसण्याचा प्रयत्न करू नये. सहप्रवाशांच्या टोळीत स्थान मिळवल्याशिवाय बसण्याचे स्थान मिळू शकत नाही. मुंबईतल्या लोकल मधे प्रवास करण्यासाठी तीन गोष्टींमधे रस निर्माण करावा लागतो. जनरल डब्यात भजने क्रिकेटच्या गप्पा आणि प्रथम श्रेणीमधे अर्थशास्त्र. तिथं बोलण्याची सक्ती नसते पण हातात इकोनाॅमिक्स टाईम्स किंवा बिजनेस इंडीया प्रमाणे काहीतरी रद्दी बाळगणं आवश्यक असते. त्यात नाक खुपसून बसला असाल तर अधिक उत्तम! लोकल मधे येणारे भिकारी आणि तृतियपंथीय पाहून हळव्या लोकाना प्रवासाचा मानसिक त्रास होण्याची पण शक्यता असते.

भारताची रक्तवाहीनी म्हणजे रेल्वे. त्यातून केलेला प्रवास हा तर अनुभवाचा, ज्ञानाचा, विवीधतेचा खजिनाच म्हणायला हरकत नाही. एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासातून मिळालेल्या अनुभवाने व्यक्तीचा आत्मविश्वास दुणावतो. तो जगातील कोणत्याही स्पर्धात्मक आव्हानाला सहज सामोरा जाऊ शकेल याची मला खात्री वाटते. पुणे ते त्रिवेंद्रम, मुंबई ते कोलकता, कोल्हापूर ते तिरूपती, पुणे ते चेन्नाई, मिरज ते दिल्ली, मुंबई ते जामनगर अशा अनेक महान प्रवासांचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक राज्यातून जाताना त्या त्या भागातील सांस्कृतीक परंपरांचे दर्शन प्रवाशांच्या वागण्यातून दृष्टीस पडते. पश्चिम महाराष्ट्रातील माणूस हा शक्यतो लांबच्या प्रवासाच्या फंदात पडत नाही. तरीपण जर पडलाच तर सतत प्रत्येकाकडे साशंक नजरेने पहात असतो. प्रवासातील प्रत्येकजण आपल्याला फसवण्याच्या मिशनवर आलाय आणि आपल्या जवळ असलेली टाॅप सिक्रेट इंन्फर्मेशन सांभाळून नेण्याची जबाबदारी ही थेट पंतप्रधानानी आपल्यावर सोपवली आहे अशा आविर्भावात त्यांचा प्रवास सुरू होतो आणि संपतो पण. या हून थोडा भिन्न अनुभव पुण्या मुंबईच्या प्रवाशांचा. पुण्याचे चौकोनी कुटूंब प्रवास करीत असेल तर मुलं फाजील शहाणी असतात, पत्नी सतत नवऱ्यावर दाब दाखवत असते आणि नवरा कुटूंबाच्या सेवेसाठी जीवाचं रान करीत असतो. मुंबईचे मराठी कुटूंब एकदम तरतरीत दिसते. इतरां बरोबर त्यांची पटकन मैत्री होते शिवाय गप्पा मारायला यांच्याकडे बरेच विषय असतात. गुजराथी कुटूंबाचा गाडी स्थानकातून हलताक्षणी खाण्याचा कार्यक्रम सुरू होतो, तो थेट मुक्कामाचे ठिकाण आले की थांबतो. त्यांच्या एकंदरीत सामानापैकी पंन्नास टक्के ऐवज हा प्रवासातच संपतो. पण हे लोक स्वत: खाऊन सहप्रवाशाना सुध्दा फाफडा आणि ठेपले चा आस्वाद देतात. प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबली की हे लोक सामोसे, वडे किंवा किमान चहा तरी खरेदी करून स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार पण लावतात. दक्षिण भारतीया बरोबर प्रवास करताना त्यांचा आपसातील संवाद हा शून्य कळत असल्यामुळे पण भावनेने काठोकाठ भरलेला असल्यामुळे सरळ संवाद सुध्दा भांडायला लागल्या प्रमाणे वाटतो. मध्य प्रदेशातील सहप्रवासी चटकन मैत्री करतात पण आपलाच पेपर वाचायला मागून आपल्या श्रीमंतीच्या बढाया मारतात. बिहार उप्र चे सहप्रवासी मोठ्या मोठ्यानं बडबड करून संपूर्ण बोगीला जागृत ठेवतात. त्यांनी आणलेल्या खाण्यातून सरसोंका तेलाचा वास तुमची अन्नावरची इच्छा नष्ट करण्यास मदत करते. बंगाली व्यक्ती फारशा कोणाच्या फंदात पडता आपापल्या छंदात धुंद असतात. त्यांच्याकडील प्रत्येक वस्तू ही बाकीच्या लोकांची कुतूहलाची बाब असते. मग ते वाचत असलेलं पुस्तक असो वा चेन ने कंबरेला अडकवलेलं घड्याळ असो, डब्यातील रसगुल्ला असो वा सुबक काठी असो. यांची प्रत्येक गोष्ट इतराना हवीहवीशी वाटते.

काही मंडळी ही आपापल्या प्रांताच्या वर्णनाप्रमाणे वागण्याचा फाजीलपणा करतात. त्यांची वागण्याची तऱ्हा काहीशी वेगळीच असते. काही मंडळी स्वत: पेपर विकत घेत नाहीत पण दुसरा वाचत असताना डोकाऊन त्याच्या हातातील पेपर चा समाचार घेतात. रहावून त्याला पेपर देऊ केलाच तर खजिल होऊन नको नको म्हणत नाकारतात. पण पुन्हा दुरून वाचन चालूच! मी तर असे पण लोक पाहीलेत जे स्वत: पेपर विकत घेतात पण वाचतात मात्र दुसऱ्याच्या हातातूनच. झोपताना शेजाऱ्याच्या खांद्याची हक्काने उशी करणारी मंडळी तर पावलोपावली सापडतील. काही लोक स्वत: केलेल्या फालतू विनोदावर उगाचच गडगडाटी हास्य करतात. काही लोक प्रत्येक वाक्याला आपल्या समोर हात धरून टाळीची अपेक्षा करतात. काही लोकांची व्रात्य कार्टी आपल्या अंगावर कुत्री सोडावीत तशी सोडून निवांत झोपा काढतात. ही कार्टी मात्र बापाची रेल्वे असल्या प्रमाणे उच्छाद आणतात. अशा सुपुत्रांच्या माता पुत्रप्रेमापोटी अमेरीके बरोबर सुध्दा एकहाती युध्दास सज्ज असतात. एखादे तरूण जोडपे जर येऊन बसले आणि जर लग्न झालेल्याचे कोणतेच चिन्ह दृष्टीस पडले नाही तर आपल्या मनातील उत्सुकता भलतीच ताणली जाते. अशावेळी हे नुसतेच प्रेमी युगल आहेत का नवरा बायको आहेत का मित्र आहेत हे ओळखण्याचा सोपा उपाय. त्यांचा संवाद नीट लक्ष देऊन ऐकणे. जर ती त्याला झापत असेल आणि तो मुकाटपणे ती सांगेल ते ऐकत असेल तर ते प्रेमी युगल. ती भलतीच जोरात झापतीय पण तो निवांत दुर्लक्ष करतोय तर ते विवाहीत. दोघे मस्त हास्य विनोद करतायत तर ते मित्र. आणि दोघे बोलता आपापल्या नादात असतील तर बहीण भाऊ.

विमानातील सहप्रवाशांवर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. कदाचित मी लौकरच त्यावर सविस्तर अनुभव मांडेन.

असे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. जी व्यक्ती घराबाहेर पडते, तिला अनुभव मिळाल्या शिवाय रहात नाही. फेसबुक आणि व्हाटसॲप वरच्या छद्मी समाजापेक्षा प्रवासात आवर्जून जवळून अनुभवलेला समाज आपणास खुप काही शिकवून जातो.

No comments:

Post a Comment

Name:
Message: