वास्तविक पहाता माझा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही. किंवा तसा कुणाचाच नसतो पण राजकारण हा मात्र प्रत्येकाच्या चर्चेचा विषय नक्की असतो. मी तर असं स्पष्ट म्हणेन की बाकी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान मिळो वा न मिळो, स्वत:च्या आयुष्यातले हजारो प्रश्नांची उत्तरे सुटोत वा न सुटोत पण जर तुम्हाला तुमचे भारतीयत्व सिद्ध करायचे असेल तर क्रिकेट, बाॅलीवुड आणि राजकारण यातील ज्ञान असायलाच हवे. उद्या मला जर कोणी अशी माहीती दिली की भारतीय नागरीकत्व देण्यासाठी या तीन विषयांची लेखी परीक्षा द्यावी लागते तर मला मुळीच धक्का बसणार नाही. या विषयात प्रत्येक भारतीयाचा दांडगा व्यासंगच असायला हवा.
तर मुद्दा आपला राजकारणाचा! त्यातील फारशी अक्कल नसताही किंवा त्याबद्दल कुणी मत विचारले नसलेतरी... मी पण माझी मते परखडपणे मांडत असतो. जिथं संधी मिळेल तिथं. आॅफीसच्या जेवणाच्या टेबलवर असो, मित्रांच्या बरोबर गप्पात असो, फेसबुकच्या फोरम मधे असो वा व्हाटसॲप च्या ग्रुपमधे असो.
माझ्या राजकीय व्यासंगाबद्दलच विचाराल तर आमचं बालपण इंदिरा गांधी हत्येपासून सुरू झालं आणि ते हळू हळू नमो, रागा पर्यंत बहरत गेलं. सोनिया गांधीने पंतप्रधान पद नाकारून मनमोहन सिंग याना पद बहाल केल्यावर देशाचा कायापालट होणार असा दांडगा विश्वास वाटला होता. बुद्धीमत्तेला देशाचे सर्वोच्च अधिकार मिळाल्याचा गर्व झाला होता. कालांतराने मात्र त्यानी नक्की काय करायला हवे होते आणि ते काय काय करू शकले नाहीत याचा उलगडा मोदींच्या झंजावती प्रचारा नंतरच झाला. जनसामान्या बरोबर मलापण अचानक हा साक्षात्कार झाला की गेली दहा वर्षे ज्या महान अर्थतज्ञाला आपण पंतप्रधान रूपात पाहीलं ती व्यक्ती एकही देशोपयोगी कृत्य करू शकली नाही आणि या पदावर १००% अयशस्वी ठरली. या सर्व त्यांच्या अपयशाचे खरे मानकरी ते फक्त स्वत: नसून गांधी कुटूंबीय पण आहेत. आता याच घराण्याचे सुपूत्र राहुल गांधी यांनी देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे आणि त्यांची प्रेमळ आई हा बालहट्ट पुरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. एक ना दोन.. अनेक जनहितार्थ पसरलेल्या मेसेजेस नी अविरत ज्ञान ग्रहण चालू झाले. मोदींच्या निवडून येण्यामधे माझा सिंहाचा वाटा आहे असा समज मी बरेच दिवस करून घेतला होता. जरी प्रत्यक्ष मतदान करता आले नाही तर त्यांच्या महतीचे सर्व मेसेजेस मी या माझ्या या हातानी सर्व ग्रुपमधे पसरवले आहेत. मोदी ज्यावेळी निवडून आले आणि पंतप्रधान झाले त्यावेळी मला दहावीत बोर्डात नंबर येण्याइतका आनंद झाला होता. कुणाचं काय तर कुणाचं काय!
तर आजचा महत्वाचा आणि ज्वलंत मुद्दा म्हणजे नोटाबंदी! राजकारणात घडणाऱ्या घडामोडीचा माझ्या आयुष्यावर झालेला प्रत्यक्ष परीणामाचं हे पहिलं पण मोठं उदाहरण. मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जनसामान्य जनतेमधे जो एकच हल कल्लोळ उडाला, तो पाहून मला सुद्धा आपण गोंधळून जाणं गरजेचं आहे असं वाटू लागलं. देशाबाहेर बरीच वर्षे वास्तव्य असल्यामुळे वास्तविक पाहता या नोटांचा आणि माझा फारसा संबंध नव्हता. तरी हा प्रश्न मला अतिशय जिव्हाळ्याचा व देशभक्तीचा वाटू लागला. मी उगाचच घरातील कपाटं झाडून हजार अन पाचशेच्या नोटा शोधण्याचा प्रयत्न केला. फारशा न सापडण्यानं मी हळहळ पण व्यक्त केली. तरी मी कसाबसा पाच हजार चा ऐवज गोळा केलाच. कहर म्हणजे सौ च्या मैत्रीणीकडं वीस पंचवीस हजाराच्या नोटा असल्यामुळं त्या महिला मंडळात खुपच शोआॅफ करीत होत्या म्हणे. या कारणावरून सौ ने माझ्या जवळ नाराजी पण व्यक्त केली. "मी काय उत्तर देऊ माझ्या ग्रुपमधे? ती अमकी आहे ना तिच्या नवऱ्याकडं तब्बल वीस हजार च्या नोटा आहेत... आणि मेलं आमचं नशिब फुटकं बघा. फक्त पाच हजार?" मला पण आपल्या कुवतीची किव येऊ लागली.
मी ज्यावेळी माझ्या भारतातील मित्राजवळ ही कैफियत मांडली त्यावेळी त्यानं तर त्याच्या दु:खाची गाथाच वाचून दाखवली आणि मला माझं दु:ख शीतळ वाटू लागलं. तो म्हणाला त्याची बायको नेमकी मोदींच्या भाषणादरम्यान माहेरी होती. पण ताबडतोब घरातील सर्व नोटांची विल्हेवाट लावायची आहे हे कारण सांगून लौकर परत आली. माझा मित्र बिचारा नोकरदार! त्याच्याकडं कुठला आलाय काळा पैसा? तर घरात लपवण्यासारखा काहीच नाही हे कळल्यावर बिचाऱ्याचं जेवण बंद झालं. शेजारच्याना नोटा जाळताना बघून बायकोचा प्रचंड जळफळाट झाला. बिचाऱ्यानं जे दोन हजार खिशात पडलेत ते बदलून घ्यावेत म्हणून सहज खिसा चाचपडून बघितला तर नोटा गायब! बंद पडलेल्या नोटा मारून चोराला काय फायदा असा तो विचार करीत असतानाच बायकोनं स्पष्टोक्ती केली. "काल शेजारचे नोटा जाळत असताना पाहीले आणि मी पण त्यांच्या नाकावर टिच्चून आपले दोन हजार फाडून टाकले." एवढं बोलून ती थांबली नाही तर मला असा टोमणा पण मारला की "किती तो कफल्लक पणा? खिशात या माणसाला दहा हजार पण ठेवणं परवडत नाही!"
माझ्या मित्राची अशी व्यथा ऐकल्यावर मी पटकन माझे पाच हजार लपवून ठेवले. आता एक प्रश्न समोर आ वासून उभा होता तो म्हणजे या पाच हजाराच्या नोटा बदलायच्या कशा? मी नुकताच भारतात जाऊन आल्यामुळं लगेच फेरी मारण्याचा विचार नव्हता. केवळ पाच हजाराच्या बदलासाठी पंचवीस हजार खर्चून जाणे शहाणपणाचे ही होणार नव्हते. उगाचच कुठं खपतात का बघू म्हणून मी डाॅलरच्या बरोबरीने रूपये पण वागवायला लागलो. जरा टॅक्सीवाल्या समोर पाचशेची नोट सरकवून काय होते ते पहावे असाही विचार मनाला शिवून गेला. पण तसला अगाऊपणा करण्याचे धाडस मात्र झाले नाही. विमानतळावरच्या मनी चेंजर ला मी धडकून आलो. तिथल्या कर्मचारीने मलाच माहीती नसल्याप्रमाणे समजावलं की लौकर भारतात जाऊन बदलून घ्या. लिटील इंडीयात पण एक चक्कर मारून आलो. त्यानी पुणेरी पद्धतीने स्पष्ट नकार देऊन माझी हकाल पट्टी केली. सिंगापुरातील स्टेट बॅंकेची नोटा न स्विकारण्याची नोटीस वाऱ्यासारखी पसरली. माझ्या सारखे नोटबंदी पिडीत कैक या देशामधे फिरत असणार याची दाट शक्यता मला वाटत होती. अचानक मला फेसबुकवर याच संदर्भात एक मेसेज दिसला. कोणीतरी खात्रीलायक लिहीले होते की स्टेट बॅंकेची एक ठराविक शाखा या नोटा स्विकारतात. मी ताबडतोब फोन लावला पण कोणी उचललाच नाही. मग मी तडक ती शाखा गाठली. तिथं माझ्याप्रमाणे अनेक अतिउत्साही मंडळी माझ्या आधीच हजरी लाऊन बसले होते. शाखाधिकाऱ्यानी शांतपणे सर्वाना नकार देऊन बाहेरचा रस्ता दाखवला. माझे पगाराचे खाते इथल्या स्थानिक बॅंकेत आहे. बरीच वर्षे माझी त्यांची ओळख आहे. मी तिथंपण जाऊन नोटांचे नशिब आजमावून आलो पण नोटांचा माझा सहवास संपण्याचे काही लक्षण दिसत नव्हते.
देशासाठी आपण पाच हजाराची कुर्बानी दिली अशी मी मनाला समजुत घालत होतो. पण एक मन माझा व्हाईट मनी वाईट स्थितीत अडकल्याचे दु:ख करीत होते. मोदीनी घेतलेल्या ऐतिहासीक निर्णयाचे मनापासून आणि भरभरून स्वागत करावे हे मान्य होते पण माझे कष्टाचे, टॅक्स भरलेले पाच हजार वाया जावेत हे काही पटत नव्हतं. अखेरीस माझा एक स्नेही भारतात सुट्टीसाठी जाणार हे ऐकिवात आले. त्याला ताबडतोब मी फोन लावला. फोनवर त्यानं त्याच्याकडील सहा आणि त्याच्या अजून एका मित्राचे सहा असे एकूण बारा हजाराचा हिशोब दिला. उगाच याहून अधिक कॅश मी घेऊन जाणार नाही असा सुज्ञ विचार पण त्यानं ऐकवला. दरम्यान व्हाॅटसॲप वर आणि फेसबुकवर मोदीभक्तीपर प्रचंड मेसेजेस ना ऊत आला. यामधे सुर न मिळवणारा देशद्रोही वाटू लागला. मी पाच हजाराचे दु:ख गिळत मनसोक्त स्तुतीसुमने उधळली. उद्याच्या उज्वल भारताची स्वप्ने पाहू लागलो. विरोधकांवर केले गेलेले अतीप्रचंड विनोद मी न थकता वाचून काढले आणि त्यांचा सतत प्रसार केला.
अजूनही माझे पाच हजाराचे शल्य काही संपले नव्हते. महाभारतातल्या युद्धामधे शल्याने कर्णाला टोचून बोलून कसा त्रास दिला असेल याची कल्पना त्या नोटा सतत करून देत होत्या. एक दिवस अचानक माझा तो सुदीन उगवला. माझ्या आॅफीसमधल्या एका सज्जन व्यक्तीने माझे पाच हजार घेऊन जाण्याचे कबूल केले. त्याच्या या निर्णायामुळे मला अगदी हर्षवायूच झाला. त्याचा विचार बदलण्यापुर्वी ताबडतोब मी सर्व कागदपत्र तयार करून त्यावर सह्या करून पाच हजाराची रक्कम सुपूर्त केली. त्यानं पण मोठ्या कामगिरीचे भाव चेहऱ्यावर आणत विडा उचलावा तसे ते पैसे उचलले. त्यानंतर त्यानं भारतात जाऊन ते पैसे बॅंकेत जमा करे पर्यंत माझ्या जीवाला अजिबात चैन नव्हती. दोन तीन कोटी रूपयांची जबाबदारी मी दुसऱ्यावर सोपवली अशी माझी भावना झाली होती. अखेरीस एकदाचा त्याचा मेसेज आला. "मनी डिपाॅझिटेड टू युवर अकौंट!" तो वाचताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मी थरथरत्या हातानं त्याला उत्तर पाठवले. "नोटेड वुईथ थॅंक्स." आज या नोटेड मधे पाच हजाराच्या नोटा दडलेल्या होत्या.
No comments:
Post a Comment
Name:
Message: