खाणे आणि झोपणे या प्राण्याच्या मुलभूत गरजा असल्या तरी माणसाच्या त्या आवडी असायला हव्यात या मताचा मी आहे. एखादी व्यक्ती जर "मला खायचा कंटाळा येतो" किंवा "मला खायला आवडत नाही" असं सांगत असेल तर माझा दावा आहे की ती व्यक्ती तद्दन खोटं बोलतीय. असं होऊ शकतं की एखादा पदार्थ आवडत नाही पण वट्टात खाणंच आवडत नाही असं शक्य नाही.
असो. मी प्रांजळपणे कबूल करतो की मला खायला आवडतं. त्याबद्दल कोणी खादाड म्हणलं तरी हरकत नाही पण आपले सत्यवचन. मला गोड, तिखट, आंबट, तुरट, मसालेदार, चमचमीत, मिळमिळीत सर्व पदार्थ मनापासून आवडतात. पाककलेमधे जरी मी शुन्य असलो तरी खानकलेमधे पैकी च्या पैकी गुण आहेत. सुगरणीनं केलेल्या कष्टाचं चीज करावं हाच केवळ शुध्द हेतू असतो. संस्कृतीच्या पगड्यामुळं खाण्यावर शाकाहारी पणाचे बंधन आले असले तरी सर्व शाकाहारी व स्वच्छ पदार्थ सेवन करण्यात मी कधीच संकोच करीत नाही. लहान असताना आईच्या हातचे अनेक पदार्थ आवडीने खाल्लेत. वरण भाता पासून ते पुरणपोळी व मोदका पर्यंत सगळ्या पदार्थांचा मी भक्कम भक्त व उपभोक्ता होतो. मला आवडतं म्हणून आई पण अजूनच प्रेमानं करून खायला घालायची. बासुंदी हा माझा भयंकर प्रिय पदार्थ. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता हा पदार्थ केला जायचा. मस्त दोन चार वाट्या हाणल्या की अंतरात्मा तृप्त. सणावाराला श्रीखंडाचा बेत असायचा. श्रीखंड बनवणे हाच एक मोठा प्रकार असायचा. आई दोन दिवस आधी पासून तयारीला लागायची. दही लाऊन त्याचा चक्का बनवणे मोठी कामगिरी असायची. नंतर चक्का पिसणे हे काम आम्हा भावंडांचं असायचं. त्या श्रीखंडाची चव आता बाजारातून तयार आणलेल्या श्रीखंडाला नाही. दसरा असो वा श्रावण शुक्रवार, गणपती असो वा आईचे व्रत... सर्व सणांना खाण्याची रेलचेल. देवाच्या नावावर पोटदेवाची पुजा मस्त घडत असे. दिवाळी हा सण तर फक्त खाण्यासाठीच साजरा केला जातो असं माझं बरीच वर्षे मत होतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत केवढे ते खाण्याचे विवीध पदार्थ! उपवास हा प्रकार हिंदू धर्मात फक्त खाण्यात बदल याच संकल्पनेवर निर्माण केला आहे. वाह! पदार्थांची यादी भली मोठी! शाबुदाण्याची खिचडी, थालीपिठ, दही शाबुदाणा, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, वरीचा भात किंवा भगर, शाबुवडे, पापड, सांडगे, विवीध लाडू, केळी, फळं... अरे काय यादी संपतच नाही. मी तर उपवासाचे पॅटीस, उपवासाची मिसळ पण खाल्लीय. हे सर्व पदार्थ अतिशय चविष्ट आणि केवळ आपल्या जीभेला बदल म्हणून मिळावेत याच साठी उपवासाची निर्मीती झाली असावी. मला तर सिनेमागृहात खाण्यासाठी लाह्या आणि शीत पेय सुद्धा प्रचंड आवडते. चाॅकलेट आणि आईसक्रिम यांचा शोध लावून माणसानं मानवजातीवर अतिशय उपकार केले आहेत असे माझे मत आहे. रस्त्यावर मिळणारे गारेगार, म्हातारीचा कापूस, जलजीरा, मक्याची भेळ, दाबेली, चौपाटीवर मिळणारा बर्फाचा रंगीत गोळा, भेळ, सर्व प्रकारचे चाट, पॅटीस, कचोरी, सामोसा, मुंबईचा वडापाव, उकडलेले कणीस, भाजलेले कणीस, पुण्यातली मस्तानी, दिल्लीचे गोलगप्पे, बंगळूरची इडली... अशी असंख्य नावं आहेत जी खास आपणासाठीच अस्तित्वात आली आहेत असं मला वाटतं. लग्नापुर्वी होऊ घातलेल्या सौ बरोबर बाहेर गेल्यावर दोघात एक आईसक्रीम वगैरेचा फाजीलपणा करत होतो. पण लग्न झाल्यावर मी लगेच माझी अट प्रकट केली. व्यवस्थित दोन स्वतंत्र आईसक्रीम घेण्यात येतील. उगाच प्रेम करून पोट भरत नाही. त्यावर सौ नं पण ताबतोब मान्यता दिली. "तसंही माझ्यासाठी तुम्ही काही शिल्लकच ठेवत नव्हता." तर असा मी खाद्यप्रेमी माणूस. हिंदू संस्कृतीत खाद्यपदार्थ या विषयावर एखादा वेद अथवा महाग्रंथ लिहीला आहे का याचा शोध घेतला पाहीजे. शोधलं तर नक्की सापडेल. शोध हा रिकाम्या पोटी घेऊ नये ही विनंती.
घरातल्या सर्व पदार्थांबरोबर बाहेर जाऊन खाण्यात सुद्धा प्रचंड मजा आहे. मग ती गाड्यावरची भेळ अथवा पाणीपुरी वा चटकदार कोल्हापुरी मिसळ असो. कोल्हापुरात मिळणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक मिसळीच्या चवी मी चाखून पाहील्यात. काही मिसळी तर इतक्या झणझणीत असतात की माणूस दोन वेळा उभा रहातो. एकदा खाताना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी. कटवडा, डोसा, पावभाजी, पिठलं-खरडा-भाकरी, थालीपीठ, अप्पे असे नानाविध पदार्थ चवीनं खाल्लेत. काही हाॅटेल वाल्यांकडं ठराविक पदार्थ अफलातून मिळतात. तुम्हाला फक्त कुठं काय चांगलं मिळतं हे माहीती हवं. मला आठवतंय मी जेव्हा सर्वात पहिल्यांदा पुण्याच्या जंगली महाराज रोडवर फिरलो होतो, त्यावेळी तेथील खाण्याची प्रचंड उठाठेव पाहून मन भारावून गेले होते. त्यावेळी लगेचच मनात एक प्रण केला होता "या परिसरात अथवा जवळपासच एखादे घर विकत घेईन." तो प्रण लौकरच मी सोडून दिला कारण नंतर हे लक्षात आलं की संपुर्ण आयुष्यभर जरी उपाशी राहलो तरी या परिसरात घर घेणं परवडणार नाही. या सुज्ञ विचारांती भरपेट जेवण करून घेतले. तर माझा हा प्रवास मराठमोळ्या पदार्थातून बाहेर पडून पंजाबी, राजस्थानी, बंगाली, गुजराथी, दक्षिणी पदार्थ सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे खाल्ले आहेत. पंजाबी रोटी असो वा नान, राजस्थानी दाल बाटी, बंगाली रसगुल्ले किंवा रसमलाई, उत्तर प्रदेश ची रबडी, केरळचे रस्सम किंवा इडीअप्पम, गुजराथी खमण ढोकला किंवा फाफडा... सर्व मंडळीना योग्य न्याय दिला आहे. प्रत्येक पदार्थाची चव ही भिन्न पण तितकीच हवीहवीशी वाटणारी. खाण्याच्या बाबतीत मला कधीच प्रांतीय वाद सुचला नाही. मी तर खाण्याच्या या आवडीतून सर्व धर्मभाव पण दाखवला आहे. मुस्लीम खीर असो वा ख्रिश्चन केक, पेस्ट्रीज असोत, पंजाबी लंगर असो वा सत्यनारायणाचा प्रसाद असो. सर्व खाण्यामधे ब्रह्म शोधून त्यांचा पुर्ण मान ठेवलाय.
तर असा हा प्रवास केवळ भारताच्या सीमेपुरता मर्यादीत न रहाता तो अनेक देशां पर्यंत पोचलेला आहे. शाकाहारी असल्यामुळे ९०% पदार्थ यादीतून वगळले गेले असले तरी १०% पदार्थानी माझ्या जीभेचे बरेच चोचले पुरवले आहेत. मला चायनीज, थाय, इटालीयन, काॅंटीनेटल, मेक्सिकन, अमेरिकन .. आदी सर्व प्रकारचे कुझिन्स आवडतात.. फक्त ते शाकाहारी असले म्हणजे झालं. भारतात मिळणाऱ्या चायनीज खाण्याचा आणि चायनीज लोकांच्या खाद्य पद्धतीचा काहीही संबंध नाही हा शोध मला माझ्या चायनीज मित्राकडूनच लागला.
मी एकदा बेल्जिअमला गेलो असताना तेथील माझ्या सहकाऱ्यानं मला जेवणाचे निमंत्रण दिले. तो मला घेऊन संध्याकाळी बाहेर पडला. मी त्याला माझ्या शाकाहारी व्यसनाची पुर्वकल्पना देऊन ठेवली होती. त्यानं विस्मयकारी चेहऱ्यानं बराच शोध घेऊन एका अंधाऱ्या पण शांत अशा छोट्याशा रेस्टांरंट मधे तो घेऊन गेला. त्यानं तिथल्या महिलेला बराच वेळ काहीतरी अगम्य हातवारे करून समजावलं. ती महिलापण माझ्याकडं परग्रहावरील प्राणी पहावा असं पाहून ऐकत होती. मी आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता सराईता प्रमाणे स्मित हास्य करीत बसलो होतो. बऱ्याच प्रतिक्षे नंतर माझ्यासमोर एक मोठा बाऊल आणि त्याच्यासमोर एक मोठा बाऊल ठेवण्यात आला. माझ्या समोर वाढून ठेवलेल्या प्रकाराकडं बघून मी पुरता गोंधळलोच. मला बराच झाडपाला घालण्यात आला होता. तो पाला पाणी सदृश द्रव्यात तरंगत होता. आईनं लहान पणा पासून असं का शिकवलं होतं की "पालेभाज्या खाल्या पाहिजेत, त्या आरोग्यास चांगल्या असतात" ते मला त्यावेळी तिथं उपयोगी पडलं. तो मात्र दात टोकरायच्या कांडीनं त्याच्या बाऊल मधे टोचायचा आणि गपकन तोंडात ढकलायचा. कुतूहला पोटी मी त्याच्या बाऊल चे बारकाईने निरीक्षण केले तर हबकलोच. अहो त्यात किलोभर शिंपले होते. ते कदाचित शिजवून आणले होते. हा गृहस्थ त्या शिंपल्यातल्या मृत जीवाला काडी टोचून उचलायचा आणि तोंडात टाकायचा. ते दृश्य बघून मला कसंसच झालं. मी मनातल्या मनात मृत जीवाना श्रद्धांजली वाहीली आणि गप्प बसलो. मला मात्र मी शेळी झाल्याचा भास होऊ लागला होता आणि "बेंऽऽ" अशी आरोळी ठोकावी असं वाटू लागलं होतं.
बीजींगला मी आठवड्याभराच्या कामासाठी गेलो होतो. तिथला माझा सहकारी भयंकर उत्साहाने रोज नव्या रेस्टाॅरंटमधे घेऊन जात होता. माझ्या समोर शाकाहारी या प्रकाराखाली अगम्य पदार्थ आणून ठेवण्यात येत होते. त्यातला एकही पदार्थ माझ्या परिचयाचा व चवीचा नव्हता. याहून मोठी कसोटी होती ती त्याना दोन काड्यांमधे पकडून तोंडापर्यंत पोचवण्याची. तो माझा सहकारी पटापट उचलून खात होता आणि मला मात्र एसीत घाम फुटला होता. मला काही काळापुरता करकोचा कोल्ह्याच्या गोष्टीतला तो करकोचा वाटू लागला होता आणि "कशी जिरवली" या भावनेनं माझ्याकडं बघतोय असं वाटू लागलं होतं. एखादा पदार्थ आवडला म्हणून आधाशासारखं खाऊ नये यासाठीच ते काड्यांचा वापर करीत असावेत असंही मला त्यावेळी वाटलं. मी कसाबसा काहीतरी उचलून आणि दहा वेळा खाली सांडत तोंडात ढकलत होतो. माझी ती कसरत पाहून त्यालाच दया आली. त्यानं खास माझ्यासाठी चमच्याची सोय करून घेतली. जेवणानंतर पोटावर हात फिरवत तो ढेकर देत म्हणायचा आज खुप जेवलो. मी मात्र उपाशीच. शेवटी न राहवून अखेरच्या दिवशी त्याला म्हणलं "बाबा रे! आज मी तुला एका भारतीय उपहार गृहा मधे खायला घालतो." त्यावर तो खजिल होऊन मला गप गुमान एका नेपाळी हाॅटेलात घेऊन गेला. त्यानंतर मात्र मी कानाला खडा लावला, उगाच काही प्रयोग करण्यापेक्षा सरळ आधीच जाहीर करून टाकायचं. त्यामुळं जपान, कोरिया मधील सहकाऱ्यानी माझ्या आगमना पुर्वीच जवळपासच्या भारतीय उपहार गृहाचा शोध घेऊन ठेवलेला असायचा.
मी जर्मनी मधे रॅप (wrap) खाल्ला होता. त्याला थोडं स्पायसी बनव म्हणल्यावर त्या बहाद्दरानं मिरचीची पुडच त्यात भरून दिली होती. ते खाऊन माझी काय अवस्था झाली हे काही वेगळं सांगायला नको. मला मेक्सिकन पदार्थात कसेडिया, बरितो, फजिटा या सर्वांची मस्त दोस्ती आहे. मला मेडीटेरियन सुद्धा खुप आवडतं. हमस, फलाफल, शवरमा, पिटा ब्रेड यांचा मी अनेक वेळा समाचार घेतला आहे.
जरी काही विचीत्र अनुभव गाठीशी असले तरी मी थाय टाॅम याम सुप, चायनीज गोड पदार्थ, चायनीज छद्मी मांसाहारी (mocked) बरेच आवडीनं खाल्ले आहेत. थायलंड मधे वेगवेगळ्या भाज्या शिजवून चिकट भाताबरोबर खाण्यात बरीच मजा येते. मला नासी लेमाक हा मलेशियन भाताचा प्रकार सुद्धा खुप आवडतो. थायलंड मधे मॅंगो राईस हा पदार्थ मी कौतुकानं खाल्ला होता. मला सिंगापूर मलेशिया या देशात मिळणाऱ्या फळांबद्दल तर भलताच आदर आहे. आपल्या भारतात मिळणाऱ्या फळांच्या तुलनेत या देशांवर निसर्गाने वरदहस्तच ठेवला आहे. लोगन, लिची, मॅंगोस्टीन, स्टार फ्रुट, ड्रॅगन फ्रुट, सीडलेस कलिंगड, गोल्डमेलन, पेअर, किवी अशा नानाविध फळांचा मी आस्वाद घेतलाय आणि मला ती सर्व अतिशय आवडतात. सर्व फळांमधे विचीत्र पण खास म्हणजे ड्युरीयन. इथली लोकं तर ड्युरीयन पार्टी करतात. आपल्या मराठी माणसाला कसा हापूस आंबा हा फक्त खाण्यासाठी नसून तो किमतीच्या चर्चेचा, समारंभाचा व समृद्धीचा वाटतो तसा या ड्युरीयन बद्दल या लोकांचा समज आहे. ही मंडळी ड्युरीयन चा विषय निघाला की कमालीचा उत्साह दाखवतात. या फळाचा वास अतिशय उग्र! टॅक्सी, बस मधे हे फळ घेऊन जाण्यास बंदी आहे. चव याची थोडीशी कडवट आणि पाणचट. तरीपण या लोकाना हे फळ भयंकर आवडते. कदाचित हळू हळू त्याची चव जीभेवर रूळणं गरजेचं असावं मगच त्याची मजा कळेल. या फळांच्या बरोबरीने मला पिस्ते, काजू, बेदाणे, अक्रोड, बदाम असे श्रीमंती पदार्थ पण आवडतात. खिशाला व तब्येतीला फारसे परवडत नाहीत म्हणून कमी खातो इतकेच.
जरी मी मांसाहार केला नसला तरी तो खुप जवळून पाहीला आहे. आॅफीस मधील माझ्या सोबत असणारी प्रत्येक व्यक्ती ही मांसाहारीच असते. मला तर एकानं मी शाकाहारी आहे म्हणल्यावर ताबडतोब विचारलं की तुला सर्व कार्बोहायड्रेटस मिळतात पण मग तू प्रोटीन्स कुठून मिळवतोस? या अशा वैज्ञानिक प्रश्नानं माझ्या खाद्य प्रवासाला खुलं आव्हान दिलं होतं. मी बराच शोध घेतल्यावर कळलं की उसळी या भरपूर प्रोटिन्स देतात. मग मी उगाचच उसळी बनवण्याचा आग्रह बायकोला करू लागलो. जीवंत खेकडा, मासा अथवा जलचर शोधून त्याचाच पदार्थ बनवून देणारी उपहार गृहं बरीच आहेत. गिऱ्हाईकानं फक्त जीवंत प्राण्याकडं बोट दाखवायचं. चायनीज पद्धतीमधे सर्व पदार्थ टेबलावर मध्यभागी मांडून ठेवतात. तो भाग हवा तसा गोल फिरू शकतो. ज्याला जो पदार्थ हवा असेल त्यानं गोल फिरवून स्वत: कडं ओढून घ्यायचं. प्रत्येकाला पेल्यात अविरत "ग्रीन टी" या नावाखाली एक कोमट पेय दिले जाते. त्यांच्या मते ते पचनास मदत करते. आता याना काय कल्पना की मी काय काय खाऊन पचवलंय! गंमत म्हणजे ज्या माशानं जीवाची आहुती दिलेली असते तो मस्तपैकी एका थाळीत सजवून आणलेला असतो. तो एक डोळा सताड उघडा ठेऊन निर्वीकार भावनेने सर्वांकडे बघत असतो. सर्व मंडळी त्याच्यावर तुटून पडतात आणि हळू हळू त्याचा फक्त सांगाडाच शिल्लक रहातो. तरी डोळा तसाच. खेकडा खाण्यासाठी खास अडकित्ता दिला जातो. त्याच्या शरीराचे तुकडे फोडून त्याला स्वमुखात ढकलंल जातं. आम्ही लहान असताना शेंगा खाऊन फोलं केली म्हणून रागवून घेतलं होतं ना तसं या सर्वाना रागवावंस वाटतं. आम्ही टिळक नसल्यामुळं गुमान रागवून पण घेतलं होतं शिवाय साफ पण केलं होतं. ही सर्व मंडळी काय काय खातील कशाचा नेम नाही. कुत्रा, साप, डुक्कर, हरीण, गाय, म्हैस, माकड, बेडूक, सरडा, चतु:ष्पाद, द्विपाद, निष्पाद... म्हणाल तो प्राणी यांच्या मुखात विराजमान झालाय. इतकं सगळं खाऊन पण ही मंडळी एवढी बारीक कशी काय हा सुद्धा प्रश्न मला पडला होता.
पिझा, बर्गर, पास्ता, लसाणिया आदी पाश्चिमात्य पदार्थ सुद्धा मी चवीने चाखल्यात. नानाविध प्रकारचे पिझे खाल्लेत. अनेक प्रकारच्या टाॅपिंग्ज ने सजवलेला पिझा मला प्रचंड आवडतो. आॅलीव, अननस, टोमॅटो, मशरूम, वांगी काढून टाकून खाणाऱ्या लोकानी त्या पदार्थावर अन्याय केला आहे असं माझं मत आहे. पास्ता सुद्धा सर्व प्रकारचे मला आवडतात. क्रिम युक्त, टोमॅटो युक्त, आॅलीव तेलातील असे प्रकार चवीना चांगला न्याय देतात. मला सबवे मधील सॅंडवीच पण कमालीचं आवडते. त्यांचा तो कुरकूरीत ब्रेड, त्यात घातलेल्या सर्व भाज्या आणि खमंग साॅसेस मला खुपच आवडतात.
पोटाचा प्रश्न सुटल्यावर वयोमान परत्वे पोट सुटण्याचा प्रश्न ज्वलंत होऊ लागला. डब्यातील चवीष्ट पदार्थांची जागा काकडी गाजर यांनी घेतली. आता सर्व खाद्य छंदावर बंधनं येऊ लागलीत. दुसऱ्यांच्या डब्याकडं चोरून बघण्यातच आता समाधान मानावे लागते. चुकून कोणी दानशूर पणा दाखवला तर त्या व्यक्ती बद्दल आदर दुणावतो. असो. तरीपण या क्षेत्रातलं ज्ञान अजून असंच वाढत राहील अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment
Name:
Message: