आपल्या हिंदू संस्कृतीत सणांचं महत्व फार मोठं आहे. तसं प्रत्येक धर्माच्या संस्कृतीत असतंच पण हिंदू संस्कृतीत जरा जास्तच. प्रत्येक महिन्यात काहीना काही सण, पुजा, उत्सव हे असतातच. बारा महिने आनंदी, उत्साही आणि उद्योगी ठेवण्यासाठी अशा सणांची सोय पुर्वजांनी मुद्दामच करून ठेवली असावी. मी या हिंदू समाजाचा व कुटूंबाचा एक घटक असल्याने मलापण सर्व सण-वार आवडणं स्वाभाविकच. या सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी. माझ्या संगतीत या दिवाळीने बरेच हिवाळे पाहीलेत. काळा बरोबर दिवाळीला सुध्दा बदलावं लागलं. पुलंच्या भाषेतच सांगायचं तर पुर्वीची दिवाळी आता राहीली नाही.
शाळेत असताना परीक्षेच्या महायुध्दाला तोंड दिल्यावर गावाकडं पळण्याचे वेध लागलेले असायचे. आत्ता सारखं त्याकाळी तत्परतेनं निकाल लाऊन पोरांची व पालकांची कान उघाडणी करायला शाळेत बोलवित नसत. परीक्षेचा निकाल हा निवांत सुट्ट्या संपल्यावर असल्यामुळे आमच्या सुट्ट्या पण खुप मजेत जायच्या. सुट्टी आणि गावाकडं जाणं हे समिकरणच कायम ठरलेलं असायचं. बाकी अभ्यास, परीक्षा आदी चिंता सोडून गावाकडं लौकरात लौकर पोचणं अतिशय महत्वाचं असायचं. आम्हाला सुट्टीचा अभ्यास किंवा जादा क्लासेस चे टेन्शन पण नसायचे. त्या सर्व सुट्ट्यांमधे सर्वाधिक आनंदाचा काळ म्हणजे दिवाळीचा. अगदी मोजके चार दिवस दिवाळीला जाण्याची आमची प्रथा नव्हती. तब्बल पंधरा दिवस आधी आम्ही आई बरोबर गावाकडं दाखल होत असू. आमचा समस्त भावंडांचा भरगच्च कार्यक्रम ठरलेला असायचा. तीस ऐवजी साठ दिवस जरी सुट्टी दिली असती तरी ती पुरली नसती. त्या काळी मुलांचा वेळ घालवण्यासाठी आमच्या पालकाना काय करावं असा कधी प्रश्न पडायचा नाही अथवा समर कॅंप, विंटर कॅंप च्या फिया पण भराव्या लागायच्या नाहीत. सगळं कसं साधं आणि सोपं असायचं. आमची दिवाळीची तयारी म्हणजे आम्हा दोघा भावाना नवीन शर्ट चड्डी ची खरेदी! कधी कधी एका ताग्यात दोघांचे कपडे शिवले जायचे आणि आम्ही त्यावर प्रचंड खुश असायचो. त्या नंतर आमची तयारी चाले सुट्टीत लागणाऱ्या सामानाची! पत्ते, सापशिडी, बॅट बाॅल, बुध्दीबळ, चंपक, किशोर, चांदोबा मासिकं अशा सर्व फास्ट कंझ्युमेबल गुडस ची जमवा जमव करून ठेवावी लागे. त्या शिवाय फटाके, मावळे विना तर दिवाळी अशक्यच.
गावाकडं पोचल्यावर आम्ही आई ची ओळखच विसरायचो. दिवसभर कानात वारं शिरल्यागत नुसता धुडगूस चालायचा. सकाळी उठल्यापासून कॅरम, पत्ते, बुध्दीबळ, क्रिकेट असे नानाविध पर्याय असायचे. कंटाळा आला किंवा करमत नाही हे शब्द आठवायला पण उसंत नसायची. आमच्या मोठ्या दादाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या खेळांच्या मॅचेस पार पडायच्या. सर्वाना समान न्याय मिळणं जरी अपेक्षित असलं तरी काही रूसव्याना कधी कधी जादाचं फुटेज देऊन पोरांच्यातला विषय पोरांच्यातच मिटवला जात असे. बऱ्याचदा रात्री बारा एक पर्यंत खेळांचे डाव चालत असंत. पत्त्याचे हजारो प्रकारचे डाव प्रत्येकाला येत असंत. खरी मजा यायची गाण्याच्या कार्यक्रमाची. सर्व गायक मंडळीना आपापल्या कला प्रदर्शनासाठी हा उत्तम श्रोतृवर्ग मिळत असे. या होतकरू गायकां पाठोपाठ चुरस सुरू व्हायची मोठ्यांची. एकमेकाला आग्रह करून प्रत्येकजण आपापला घसा साफ करून घेत असे आणि विस्तृत दाद मिळवत असे. आमच्या घरातील सर्व मातृगणां (आई, काकू, आत्या) मधे गायन येत नाही असं कोणीच नव्हतं. त्यांच्या बरोबरीने पितृगण (बाबा, काका) सुध्दा एकापेक्षा एक सरस गाणी गायचे. कोणत्याही वाद्याची साथ नसतानाही सर्व गाणी खरंच खुप गोड वाटत असंत. शिवाय प्रत्येकाची आपापली गाण्याची खासियत होती. प्रत्येक मैफीलीत त्याने अथवा तिने ते म्हणलेच पाहीजे असा जणू अलिखीत दंडकच होता. गाण्याच्या शिकवणीला जाणाऱ्या भावंडांसाठी तर हा कौतुकाचा सोहळा असायचा. त्यांच्या घशाला आणि आमच्या कानाला बराच वेळ व्यायाम दिला जायचा. गाण्यांच्या मेजवानी मधे स्पर्धात्मक आव्हान असायचे भेंड्यांचे. थोरां पासून लहानांपर्यंत सर्वच यात तरबेज. प्रत्येक जण जुन्या नव्या गाण्यांची उजळणी बसल्या बैठकीत करीत असे. कसे तीन चार तास संपले याचा कधी कोणाला पत्ताच लागायचा नाही. तसं वेळेचे बंधन फक्त काम करणाऱ्या मातृगणांनाच होतं. बिचाऱ्या प्रचंड राबायच्या. आम्ही पोरं मात्र रिकामेच होतो.
घरामधे फराळ बनवणे हा फार मोठा प्रोजेक्ट चाले. आज्जी च्या नेतृत्वाखाली घरातील सर्व मातृगण आपापले कौशल्य पणाला लावून हरतऱ्हेचे पदार्थ बनवित असंत. घाऊक प्रमाणातील पदार्थ, मर्यादीत पदार्थ, घरच्यांसाठी पदार्थ, नवीन जावयाला देण्याचे पदार्थ, इतर वाटपाचे पदार्थ.. अशा नानाविध प्रकारात पदार्थांची विभागणी केली जायची. सर्वच बाबतीत अंतीम निर्णय आज्जीचा असायचा हे नमूद करण्याची गरज नाहीच. आज्जीचे मात्र सर्वांकडे बारीक लक्ष असायचे. घरातील प्रत्येक नातवंड आणि व्यक्ती संतुष्ट होईल याची ती खास खबरदारी घ्यायची. त्याशिवाय घरात काम करणारा इतर कर्मचारी वर्ग सुध्दा सणावाराला तृप्त झाला पाहीजे याची ती खास काळजी घेत असे. आम्हाला चिवडा, लाडू, चकली अशा घाऊक पदार्थांचा मुबलक खुराक मिळत असे. खास पदार्थांचे दर्शन केवळ दिवाळीच्या दिवशीच व्हायचे. दिवाळीच्या पुर्वी विविध फटाके आणून त्यांचे वयोमान तसेच धाडसोमाना नुसार वितरण केले जात असे. आवाजी फटाक्यांचा मान फक्त लक्ष्मीपुजनासाठी असायचा. लवंगी, डबल बार, आपटबार, केपा, नागगोळी, फुलबाजे आदी फटाक्यांची वर्णी रोजच्या रोज लावली जायची. भुईचक्रं आणि झाडं जरी लक्ष्मी पुजनासाठी खास असली तरी इतर दिवशी सुध्दा संध्याकाळच्या रोषणाईत भर पाडीत असंत. या सर्व तयारीमधे अजून एक महत्वाची तयारी म्हणजे किल्ला बनवणे. अंगणामधे दगड माती विटांचे तुकडे गोळा करून किल्ला उभा करण्याचं काम आम्ही भावंडं प्रामाणिक पणे आणि अतिशय उत्साहाने पार पाडीत असू. किल्ल्यावर मावळ्यांची बैठक सजवणे, धणे टाकून हिरवळ निर्माण करण्यात आम्हाला स्वर्ग आनंद मिळत असे. किल्ल्यावर तोफ डागण्याची सोयपण केलेली असायची जी दिवाळीचे राॅकेट उडवायला वापरली जायची.
तसं बघायला गेलं तर आम्हा पोरांसाठी दिवाळी ही गावाकडं पोचल्यापासूनच सुरू झालेली असायची, तरीपण बायकांची दिवाळी हा काहीतरी प्रकार आम्हाला खिजवण्यासाठी सांगितला जायचा. आम्हा पोराना मात्र कधीच कळलं नाही की म्हणजे यानी नक्की काय करून त्यांचा सण साजरा केला. घरादाराचा दिवाळी सण सुरू व्हायचा तो अभ्यंग स्नानानं. पहाटे चार वाजता संपुर्ण घरदार उठलेलं असायचं. परसाकडील व्यवहार पटकन आवरून आंघोळीसाठी नंबर लावण्याची सक्ती असायची. घरातील मातृगण आणि बहिणी कंबर कसून आम्हा सर्वाना हिरीरीनं तेल लावित असंत. त्यानंतर अतिऊष्ण पाण्यानं आंघोळ घातली जायची. मोती गोटा साबणानं अंग रगडून काढले जायचे. जणू काही वर्षभर आंघोळ केली नसल्या प्रमाणे मातृगण आम्हाला धुऊन साफ करीत असे. आम्हाला सुध्दा वर्ष भराची पापं धुऊन गेल्याचा आनंद होत असे. सर्व रंध्राना आॅक्सिजन पुरवठा करीत आम्ही स्नान आवारामधून बाहेर येत असू. आमच्या आंघोळी या बंदीस्त स्नानगृहात कधीच नसंत. एका मोठ्या बंबा शेजारी ऐसपैस तीन ते चार जण सहज मोकळेपणानं बागडतील अशा विस्तृत परीसरात आमच्यावर अभिषेक घातला जायचा. बंदीस्त स्नानगृहाची चैन फक्त मातृगण, भगिनी आणि घरातील मानाच्या लोकांसाठी केलेली असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर बंबाची पण जागा मोकळी केली जायची आणि थेट हौदातील पाण्याने आमचे पापक्षालन केले जायचे. आंघोळीचा सोहळा पार पाडल्यावर आम्ही नवीन शिवलेले शर्ट चड्डी घालून अंगणात फटाके उडवायला पळायचो. दरम्यान आमची मोठी ताई मस्तपैकी सडा घालून अंगण स्वच्छ करून ठेवायची. त्यावर घातलेली सुबक रांगोळी पाहून मन प्रसन्न व्हायचे. कलेतली आम्हाला फारशी अक्कल नसली तरी रांगोळीवर पाय देऊ नये इतके संस्कार आमच्यावर होते. त्यानंतर आमचा फटाके उडवण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. सर्वात आधी कोण फटाका लावतंय याची आमच्यात चढाओढ असायची. काल संध्याकाळीच बनवलेला किल्ला आज सकाळी आम्ही डोळे विस्फारून कौतुकाने पहात असू. तो ओबड धोबड किल्ला पाहून आम्हाला आमची कला भलतीच अभिमानास्पद वाटे. कदाचित शिवरायाना राजगड पाहून पण एवढे स्वत:चे कौतुक वाटले नसावे. सुर्योदया नंतर आम्हाला घरातून जोपर्यंत नाष्ट्यासाठी बोलावणं येत नाही तोपर्यंत आम्ही फटाक्यांचा समाचार घेत असू. दिवाळीतील नाष्टा हा प्रामुख्याने चिवडा लाडू चकली यांचाच बनलेला असायचा. यामधे आज खास फराळाचा पण समावेश केलेला असायचा. दह्यामधे बुडवून चकली खाण्याची मजा काही औरच होती. घरात मुबलक दूध दुभते असल्यामुळे आम्हा पोरांची चंगळ होती. फराळाच्या संगतीने दहीपोहे पण वाढले जायचे. नुसतं कोरडं खाणं नको असा आज्जीचा नियम होता. नाष्टा झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागत असे. मातृगणावर मोठी जबाबदारी असायची जेवणाची. आम्ही पोरं मात्र उडवलेल्या फटाक्याच्या कागदांच्या ढिगाकडं पळायचो. त्यातून न उडलेले फटाके शोधण्याचे काम चाले. त्यात वात कोंबून अथवा त्याचे विच्छेदन करून त्यातील दारू कागदावर गोळा करून त्यांचे भुर्रर दहन करण्यात आम्हाला प्रचंड गंमत वाटत असे. जर एखादा सापडलेला मोठा फटाका थोडक्या प्रयत्नात उडला तर न्युटनला गुरूत्वाकर्षणाच्या शोधानंतर सुध्दा जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आम्हाला होत असे. दुपारचे जेवण हे काहीतरी पक्वान्नाचे असायचे. पितृगणा बरोबर आम्हा बालगोपालांची पंगत बसायची. प्रत्येकाला तत्परतेनं वाढण्यासाठी मातृगणाची भलती धांदल उडायची. कदाचित पंगत वाढणाऱ्या माणसाला उसंत मिळावी म्हणून सर्वाना सावकाश जेवणाचा आग्रह केला जाई. आमच्या खाण्याच्या तुफान वेगाकडं बघूनच प्रत्येक घास बत्तीस वेळा चावण्याची युक्ती काढली असावी. तुप वरण भाता पासून ते दही भाता पर्यंत प्रत्येक पदार्थाची चव स्वर्गीय असायची. कितीही खळखळून चूळ भरली तरी जेवणा नंतर जीभेवर चव रेंगाळत रहायची. ऐन दिवाळीत जरी भाकरी बनत नसली तरी इतर दिवशी चुलीवरील भाकरी खाल्याशिवाय सुट्टीचे सार्थक होत नसे. गरमागरम फुगलेली भाकरी, त्यावर लोणी, पिठलं, ठेचा, वाटीत दही... असे पदार्थ आठवले की खरंच आज मोठं झाल्याचा मानसिक त्रास होतो. जेवणानंतर सर्व जेष्ठांचा वामकुक्षीचा कार्यक्रम चाले आणि आमच्या दंग्याचा त्रास नको म्हणून आम्हाला माडीवरच्या खोलीत पिटाळले जायचे. आम्ही काहीतरी पुस्तके वाचणे, पत्ते खेळणे, नाटकं बसवणे असले टाईमपास खेळ बरेच करीत असू. दुपार टळत आली की चहा वाटप व्हायचा. संध्याकाळी आम्हा सर्व मुलांचा मोर्चा शेताकडं वळे. कधी सायकल तर कधी चालत आम्ही शेतात जायचो. शेतात ऊस खाणे व धारोष्ण दूध पिणे ही आमची ठरलेली कामे. आम्हाला या धारोष्ण दूधातील जंतूंमुळं कधीच आजारपण आलं नाही. शेतात लांब पर्यंत फेरफटका मारला की दिवसभर खाल्लेलं सगळं पचून जायचं. घराकडं परते पर्यंत अंधार झालेला असायचा. गावात लाईट गेली असल्यामुळे प्रत्येक घरा घरात कंदील किंवा राॅकेलचे दिवे लटकलेले असंत. दिवाळीच्या रोषणाई पुढं इलेक्ट्रिसीटी बोर्डाची गेलेली लाईट फिकी पडत असे. लाईट नसण्याचा तसा आम्हाला त्रास कधीच वाटला नाही. दिवाळी ही खरोखरीच आनंदानं ओसंडून वहाणारी असायची हे निर्विवाद सत्य.
आताच्या दिवाळीत आनंद आणि उत्साह नसतो असं माझं मुळीच म्हणणं नाही. पुढच्या पिढीसाठी आजही आम्ही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न करतो. बदलत्या काॅस्मो वातावरणामुळं काही समिकरणं बदललीत इतकेच. आजकाल मुलाना दिवाळीची मोजकी एक दोनच दिवस सुट्टी असते. बऱ्याचशा पुर्वीच्या सुखाच्या व्याख्या बदलून नवीन प्रकार त्यांची जागा घेताहेत. सर्व भावंडांना आता दिवाळीच्या शुभेच्छा मेसेज केल्या जातात. तर कधी व्हिडीओ चाट करून शुभेच्छा प्रकट केल्या जातात. अनेकदा मी तर रजा नसल्याने रात्री उशीर पर्यंत आॅफीसातच असतो. दमून परत आल्यावर स्वप्नानं रांगोळी घालून ठेवलेल्या घरात प्रवेश करताना शिणवटा पळून जातो. लक्ष्मीपुजन आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या पाड पाडतो आणि मुलींना सोसायटीच्या आरक्षित जागेत घेऊन जाऊन फुलबाजांची रोषणाई करतो. मुलीपण त्यात खुप खुश होतात. नव्या कपड्यांचं जरी आता अप्रुप राहीलं नसलं तरी नटायला मिळतं म्हणून मुलींना हा सण खुप आवडतो. त्याना त्यांच्या फ्रेंडस कडून अनेक शुभेच्छा मिळतात आणि त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीचे वर्णन सांगायची छान संधी मिळते. दिवाळी हा सण आता साजरा करण्या बरोबरीने सांगण्याचा सुध्दा झालेला आहे.
No comments:
Post a Comment
Name:
Message: