Friday, 24 March 2017

चाळीशीचा तरूण


वयाची चाळीशी गाठल्यावर माणसाला तारूण्य संपत आल्याची चाहूल लागते आणि समजूतदार पणाचा बुरखा ओढावा लागतो. मनात लपलेला अल्लडपणा दाबून ठेवावा लागतो. पोक्तपणाचा मुखवटा धारण करावा लागतो. जगातलं सगळं ज्ञान आल्याचा अाभास होतो आणि वृत्तीतली आक्रमकता कमी होऊ लागते. जे मिळवायचंय ते एकतर मिळवलेलं असतं किंवा टप्प्यात आलेलं असतं अन्यथा ते मुळीच मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं असतं. नाईलाजानं का होईना पण "दादा" वरून "काका" पदावर झालेली बढती स्विकारावी लागते. डोळ्यावर चष्मा विराजमान होतो. काही लोकांची उंची वाढू लागते डोक्याचे वर्तुळ केसांना बाजूला सारून वरती डोकावू लागते. किमानपक्षी डोक्यावरील केस रूपेरीवर्ण दर्शवू लागतात


काही विद्वान तत्वज्ञांनाना वरील काही विधानांवर आक्षेप असण्याची शक्यता आहे. व्हाॅटसॲप रूपी महाविद्वान तर दररोज अगदी वयाच्या ऐंशीव्या वयाला सुध्दा तुम्ही कसे तरूण राहू शकता किंवा आयुष्य जगण्याच्या चार नवीन युक्त्या कोणत्या याचं ज्ञान देत असतो. त्यामुळं म्हातारपण सोडा किमान पोक्तपणा सुध्दा दर्शवणं लोकाना मंजूर नसतं. तरीपण वस्तुस्थिती मुळीच बदलत नाही. मनातील तारूण्य कितीही जीवंत ठेवले तरी शरीरानं चाळीशीतून पुढे वाटचाल सुरू केलेली असते.


माझ्या प्रमाणेच इतर माझ्या सर्व मित्र समुदायाचा याच वाटेवरून आता प्रवास सुरू झालेला आहे. कोणाला चाळीशीच्या खुणा लवकर दिसू लागतात तर कोणाला थोडं उशीरा. पण कितीही सोंग केलं तरी चाळीशी काही चुकत नाही. हे वय काहीसं हिरण्यकशपूला मिळालेल्या वरदानाशी साधर्म्य असतं. ना तरूण ना म्हातारा, ना नवशिका ना प्रकांड पंडीत, ना कोणतं कुतूहलं ना विरक्ती, ना सुदृढ ना जरा जर्जर... अशा काहीशा अधल्या मधल्या उंबरठ्यावर आयुष्य येऊन ठेपलेलं असतं. आयुष्याची दिशा जरी ठरली असली तरी प्रवासाचा टप्पा अजून संपलेला नसतो. किती चालायचंय हे थोडं फार कळलेलं असलं तरी चालणं थांबवणं शक्य नसतं. तारूण्याच्या स्वर्गातून वृध्दत्वाच्या मुक्तीकडं जाताना ओलांडायचा हा एक उंबरठा आहे. उंबरठ्यावरून दोन्ही दिशेला दृष्टी टाकता येते. संपलेल्या तारूण्याची हळहळ असली तरी मिळवलेल्या अनुभवाची शिदोरी पुढील टप्पा पार करण्यास उपयोगी पडणार असते.


तर अशी ही चाळीशीची वाटचाल मलाच काय कोणालाही चुकलेली नाही. या माझ्या वाटेवर आडवा आलेला सर्वात मोठ्ठा आणि अक्राळ विक्राळ राक्षस म्हणजे वाढणारे वजन. तसं घाबरून जायचं काहीच काम नाही. घाबराल तर बारीक व्हाल. खरे सामर्थ्य असते धीटपणाने आलेल्या परीस्थितीस सामोरे जाणे. पोटाच्या वाढत्या घेरानं ज्यावेळी तुमच्या जुन्या पँटांचा त्याग केल्याच्या घटना वाढायला लागतात त्यावेळी समजून घ्यावं की तुम्ही यशस्वीरीत्या चाळीशीत पदार्पण करीत आहात. तुमच्या वाढत्या वजनाची समज वजा जाणीव सौ सहीत घरातील प्रत्येक व्यक्ती करून देऊ लागते. या समजशक्तीच्या अधिकार प्राप्तीसाठी वयाची अथवा नात्याची अट नसते. तुम्ही जरी निगरगट्ट पणे सद्य परीस्थितीचे कारण चाळीशीच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा काही परीणाम होत नाही. माझीपण अशीच खडतर वाटचाल आता सुरू झाली आहे. त्याचा पहिला झटका मला लौकरच देण्यात आला. माझ्या अन्न पुरवठ्या मधून तेलकट, तुपकट, गोड, भातयुक्त पदार्थांचे उच्चाटन करण्यात आले. इतिहासात कधीतरी वाचलेलं की युध्दामध्ये गड जिंकण्या साठी शिवाजी महाराजानी गडावर जाणारी अन्नाची रसद तोडून टाकली. पुर्वी एखादा दोरखंड अथवा पाईप तोडली असल्याची कल्पना मी करून घेतली होती पण त्याचा खरा अर्थ आत्ता कळला. रोज मला गाजर काकडी उसळी आदी बकरी खाद्य देण्यात येऊ लागले. मी सुध्दा प्रामाणिक पणे जाॅगींगच्या नावाखाली पहाटेची हवा खाण्यास बाहेर पडू लागलो. एकंदरीत सर्व प्रकार अनेक दिवस पार पडला तरी कोणत्याही अपेक्षित शारीरीक बदलाची चिन्हे दिसेनात. अखेरीस मीच वैतागून चाळीशी च्या नावानं नारळ फोडला आणि सर्रऽऽळ दुर्रलक्ष करून टाकले. पण आता परीस्थिती अशी आहे की मला कोणत्याही दुखण्याची तक्रार करण्यास मुभाच उरलेली नाही. अगदी मी शिंकलो तरी एकसुरात दश वर्षीय कन्ये पासून ते पंचषष्ठी वर्षीय मातोश्रीं पर्यंत माझ्या शिंकण्याचं रहस्य वजनात दडलेलं असल्याचा दावा करतात


बऱ्याच जणांच्या बाबतीत व्यवसाय अथवा करीयर हा पर्याय त्यांच्या मर्जीने झालेला नसतो. बहुतांशी तो पालकानी अथवा परीस्थितीने लादलेला असतो. आर्थिक विवंचना जरी मिटली तरी मनामधे कुठेतरी एक टोचणी लागून राहलेली असते. काही लोकाना करीत असलेल्या नोकरीचा, कामाच्या व्यापाचा, मिळणाऱ्या मोबदल्याचा किंवा बाॅसचा प्रचंड तिटकारा आलेला असतो. दुसऱ्या उत्पन्नाचे साधन मिळत नाही म्हणून हताश पणे प्राप्त परिस्थितीवर रडत दिवस कंठत असतात. साधारण १५ वर्षे एका उद्योगात किंवा नोकरीत काढल्यानंतर उर्वरीत १५-२० वर्षे त्यातच काढावीत काय? का दुसरं काहीतरी करून बघावं. या अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या लोकाना "मिड करीयर क्राइसिस" म्हणतात. नव्याची भीती वाटत असते आणि जुनं सोडवत नसतं. नव्याची ओढ वाटणं स्वाभाविक आहे. तरीपण मांडलेला डाव उधळून नव्यानं लावणं सोपं नसतं. धाडस जरूर असावं पण आत्मघातकी ठरू नये. बिना उत्पन्नाचे किती दिवस तग धरू शकतो आणि किती दिवसात नवीन उद्योगात जम बसू शकतो याचा ठोकताळा बांधता आला पाहीजे. या सर्व गोष्टींच्या बरोबरीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोधैर्य! जर मनात विश्वास ठाम असेल तर अपयश येणार नाही. मार्ग सापडत जातील. कॅलक्यूलेटेड रिस्क घेतल्याशिवाय घवघवीत यश मिळत नाही


चाळीशीमधे अजून एक नाजूक प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तो म्हणजे मुलांचे संगोपन. आपल्या चाळीशीच्या संगतीमधेच आपली मुलं टिनएजर वयात पदार्पण करतात. अल्पशा ज्ञानावर स्वत:ला खुप काही समजायला लागलंय असा त्यांचा गैरसमज होऊ लागतो. आई वडीलाना नवीन पिढीचं नवीन जगाचं काहीच ज्ञान नाही अशी त्यांची धारणा होते. कधीकाळी आपले पालक पण या वयातून गेलेत याचा विचार त्याना नसतो. मित्रत्वानं मुलाना मोठं करण्याच्या या युगात मुलं सर्वांसमोर आपल्या चुका काढू लागतात. आपलं प्रत्येक वाक्य सुधारू लागतात. आपल्या वागण्यातल्या त्रुटी उघड करू लागतात. कोणासमोर काय बोलावे याचा अजून पाचपोच नसल्यामुळे बऱ्याचवेळा आपल्याला तोंडघशी पडल्या प्रमाणे होते. अशावेळी चटकन राग अनावर होणं हे सर्वसामान्य लक्षण आहे. पण त्या रागाचा अर्थ कळण्या इतकी आकलन शक्ती मुलांकडे नसती. त्यांच्या मनात फक्त इतकंच राहतं की मला उगाचच रागवतात. मुलांच्या मधे या वयात अनेक शारीरीक मानसिक बदल होत असतात. त्यांच्याशी समजून घेऊन राहणं अतिशय महत्वाचं असतं. मुलाना मुळीच रागवू नये या मताचा मी मुळीच नाही. जिद्दी मुलाना रागवल्या शिवाय शहाणपणाचा धडा देताच येत नाही. तरीपण अधिकाधीक आपला संयम आणि रागावर नियंत्रण ठेवणे अती आवश्यक असते. प्रेमानं समजावून आणि रागानं धमकावून सांगितल्या शिवाय मुलाना शिस्त लागू शकत नाही. किती रागवावं अन किती समजवावं याचा काही नियम नाही. परीस्थितीवर, मुलाच्या प्रकृतीवर आणि तुमच्या संयमशक्तीवर हा नियम बदलतो. मुलांचा अभ्यास त्यांचे मार्क हे सर्वसाधारण परीस्थितीचं मुळ असतात. मुलाना अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टींचं आकर्षण प्रचंड असते. अशा वेळी मुलाना अभ्यासाकडं प्रवृत्त करणं अतिशय गरजेचं असतं. बाकीच्या व्यवधानाच्या अमिषानं अभ्यास होणार असेल तर तसे लाड पुरवायला पण काही हरकत नाही. विना मेहनतीचे फळ मिळवण्याची त्याना सवय लागू नये याची मात्र खबरदारी घ्यावी. धृतराष्ट्राच्या आंधळ्या प्रेमापेक्षा जिजामातेचं डोळस प्रेमच श्रेष्ठ ठरतं.


चाळीशीच्या धामधुमीत एक दृढ असलेला धागा कुठंतरी नजरेतून सुटू लागतो. जरी डोळ्या समोरच असला तरी त्याचं अस्तित्व आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की आपल्याला त्याचं भानच रहात नाही. तो धागा असतो आपल्या जीवनसाथीचा. नवरा असो पत्नी, आपापल्या जागी स्वत:च्या कुवती प्रमाणे लढाई लढत असतात. संसाराचा रथ एका चाकानं पुढं सरकणं अशक्य असतं. दोन्ही चाकानी गती देणं गरजेचं असतं. ज्या दोन जीवानी काही वर्षांपुर्वी प्रेमाची सुंदर स्वप्न बघितलेली असतात, तेच जीव एकमेकांच्या कर्तव्यांचे मोजमाप करू लागतात आणि विसर पडतो प्रेमाचा. दिवस जसा आला तसा ढकलला जातो. त्यात प्रेमाचा ओलावा संपतो. राहते फक्त वसूली. चित्रपटाला जाणे असो वा सहलीला जाणे असो. सर्व गोष्टी दाखवायला अधिक होऊन जातात. एकमेकांच्या प्रेमातून एकमेकांच्या वापराकडे स्थित्यंतर होऊ लागते. अशा या आपल्यात झालेल्या बदलाला समजून घेणे आणि वेळीच त्याला सुधारणे गरजेचे असते. जरी सर्व सुखे आत्ता पर्यंत देऊन झाली असली तरी चार प्रेमाचे शब्द बोलून हिच चाळीशी पुन्हा बहारदार करणे शक्य असते


या लेखात वर्णन केलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतीलच असे नाही पण बऱ्याचशा घडू शकतात असा माझा एक अंदाज आणि त्यावर माझ्या मनाला वाटणारे साधे सोपे भाष्य!

No comments:

Post a Comment

Name:
Message: