Friday, 24 March 2017

माझा सोशल प्रवास

असं म्हणतात की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. विरंगुळा, सांस्कृतिक देवाण घेवाण, एकत्रित सत्कार्य (आणि दुष्कार्य सुद्धा), माहीतीचा प्रसार अशा नानाविध फायद्यांमुळे समाजाशी बांधून रहाणं खुप गरजेचं असतं. माझ्या सामाजिक चळवळीची मुळं जरी शाळेपासूनच रूजली असली तरी त्याचा मोठा वटवृक्ष झाला आत्ता चाळीशीत. केवढा तो लोकसंग्रह! शाळा, काॅलेजात सुरू झालेला प्रवास याहू, हाॅटमेल माध्यमातून तो अधिक विकसीत झाला आणि फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, व्हाटसॲप अशा नानाविध टप्प्यांमधून मजल दरमजल करीत आजवर येऊन ठेपला आहे. माझ्या सारखी महान धुरा सांभाळणारे कदाचित मोजकेच भेटतिल. कित्येक आले अन गेले पण मी मात्र खंबीर पणे सर्व सामाजिक स्तरांवर खंबीरपणे उभा आहे.


तर या महान प्रवासाची सुरवात माझ्या शालेय जीवनातच झाली. चार जीवश्च टग्या मित्रांच्या बरोबर टवाळक्या करीत फिरण्याचे छंद बरेच जोपासले. सायकल वर टांग मारायची आणि कोणाच्या तरी घरी जाऊन उनाडक्या करायच्या हा आमचा आवडीचा सामाजिक अभ्यास. शाळेतल्या समाजशास्त्राच्या शिक्षकांना पण आमचा उदात्त सामाजिक हेतू कधी लक्षात आला नाही. आई नं तसा मला बऱ्याच वेळा या अशा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला, तरी माझी निष्ठा मी कधी ढळू दिली नाही. "अरे चांगल्या संगतीला लाग, सुधारशील." अशा अनेक सुचना तिनं देऊन पाहील्या. पण तिला बिचारीला काय कल्पना की नक्की कोण कुणामुळं बिघडतंय! पुढं काॅलेजमधे गेल्यावर तर या महान कार्याला नवे पंख फुटले. होस्टेलवर समाज सुधारणेला बराच वाव होता. नवनवीन प्रयोग करण्याची पहाण्याची आमची धडपड होती. हृदयातली तळमळ, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचाट जिज्ञासूपणा यांच्या संगमाने समस्त मित्रपरीवारा बरोबर ज्ञानाचे आदान प्रदान केले. बऱ्याच प्रकारची साधने, उपकरणे यांचा शोध बोध होऊ लागला. ज्ञानदानासाठी माझ्या खोलीचे दरवाजे कायम सताड उघडे असायचे. कोणाचे किती फायदे करून जीवन उद्धरले याची गणनाच नव्हती. उदाहरणा दाखल सांगायचे झाले तर आम्ही GT Technology विकसीत केली. ज्या योगे सर्व मित्र परिवाराचे engineering drawings एका रात्रीत पुर्ण होत असे. वर्गातील कोणीतरी एका विद्वानाने काढलेल्या drawing चा लाभ संपुर्ण वर्गाला करून घेता येणे शक्य झाले होते. काही विक्षीप्त प्राध्यापकानी "हे glass tracing आहे!" अशी जरी अवहेलना केली तरी बहुतांशी प्रयत्न फुकट जात नसे. तर अशा प्रकारच्या नानाविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू होते. मग ते परिक्षेच्या आदल्या रात्री जागून केलेला अभ्यास असो वा assignment submissions असो. सर्व बाबतीत समाजाचा विचार प्रथम, मग स्वार्थ! या हून अधिक स्पष्टीकरण देणे हेच योग्य.


हा समाज कल्याणाचा वसा पुढं नोकरीत सुद्धा सुरू ठेवला. सुरवातीस मित्रानी मिळून एक घर भाड्याने घेतले. समाज कंटक घर मालकां पासून लपवून समाजसेवा करणे भाग पडत होते. नोकरी च्या शोधार्थ आलेल्या मित्राना रहाण्याची सोय करणे. थकलेल्या भागलेल्या मित्राना घरी बोलवून काही तात्वीक विषयावर चर्चा करणे. अशा अनेक समाज हिताच्या कृत्यांवर घर मालकाचा अंकुश होता. तरीसुद्धा मी इमाने इतबारे घेतलेला वसा आनंदाने कौशल्याने पार पाडीत होतो. गरजू मित्राना उधारी देणे आणि नोकरी लागल्यावर सव्याज वसूल करणे या कला खास विकसीत केल्या होत्या. चहा, नाश्टा, जेवण सर्वच बाबतीत सामुदायिक सोहळा असायचा. कोणी कधी बिल द्यायचे याचा यथायोग्य हिशोब ठेवलेला असायचा. कोणावरही यत्किंचीतही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जायची


या सर्वांवर कहर म्हणजे आमचे आॅनलाईन चाटग्रुपस. इंटरनेट आणि काॅम्पुटरची नुकतीच ओळख झाल्यामुळे आम्हा सर्व मित्रांच्या मनात या जादुई दुनियेबद्दल कमालीची उत्सुकता होती. जरी घरी काॅम्पुटर नसला तरी सायबर कॅफे नामक समाजसेवा केंद्राची कवाडं आमच्यासाठी सताड उघडी असत. तब्बल २०रू तासाला मोजून आम्ही याहू च्या चाटरूम्स मधे तासन तास समाज प्रबोधनाच्या कामात रममाण होत असू. या सर्व प्रयत्नात आमच्याही ज्ञानात बरीच भर पडली तो भाग वेगळाच. हाॅटमेल नामक कंपनीने तर आम्हाला ज्ञान एक मेकां बरोबर वाटून घेण्याचे सोपे मार्ग खुले केले. प्रत्येक जण आपापल्या सवडीनुसार ज्ञान ग्रहणाचा कार्यक्रम पार पाडीत असे आणि ताबडतोब तेच ज्ञान पुढील मंडळीना पाठवीत असे. मी पण हाॅटमेल आणि याहू चा प्रामाणिक पणे छान वापर करून घेतला. जसे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात तसे आमचे विवीध उद्देशाचे अनेक आयडी बनले. उद्देशांचे तपशील टाळलेले बरे


या सामाजिक चळवळीमधे मोठा खंड पडला तो म्हणजे होऊ घातलेल्या सौ च्या दर्शनानंतर. अचानक सर्व समाजापासून दूर जाण्याचे विचार घोळू लागले. समाजकार्याचा तिटकारा वाटू लागला. मित्र समोर आले तरी त्यांची चटकन ओळख लागेना. अलिप्तवाद बोकाळू लागला. या सगळ्याचा कहर झाला लग्नानंतर. समाजापासून तोडण्याच्या कुटील कारस्थाना मधे सौ ला यश मिळू लागले. माझं मित्रांकडं जाणं बंद झालं. मित्र माझ्या घराचा पत्ता विसरले. पण तिचा हा काळा डाव एक दिवस मोडीत निघणारच होता. आॅफीस मधील विवीध स्नेहमेळ्यांनी माझ्या सामाजिक चळवळीची पुन्हा सुरवात झाली. समवयीन, समान छंद जोपासणाऱ्या आणि समदु:खी मित्रांचा छान ग्रुप तयार झाला. प्रत्येक जण जरी दु: जगासमोर मांडू शकत नसला तरी मनावर ठेवलेल्या अंकुशाला झुगारून बाहेर पडण्याची इच्छा बाळगून होता. अशा कारणांमुळे साहजीकच आॅफीसचे काम वाढणे, उशीर पर्यंत मिटींग करणे ... आदी घटना ज्यायोगे समाजात अधिकाधीक वेळ व्यतीत करण्याकडे माझा कल वाढला. सौ ला पण नवरा खुप कष्ट करतोय याचे मानसिक समाधान


मोबाईलच्या दुनियेला सुरवात झाल्यावर त्याला माझ्या हातात स्थिरावायला जरा वेळ लागला. गगनाला भिडलेले फोनचे दर आणि पाताळाला भिडलेला पगार यामुळे हे असले फाजील लाड परवडायला थोडा काळ द्यावा लागला. तोपर्यंत घरात एक काॅम्पुटर आणून त्यावरून जमेल तशी आणि जमेल तेवढीच समाजसेवा करणे शक्य झाले. मोबाईल ला हातामधे पकडायला लागल्या पासून समाजाच्या अधिकाधीक जवळ जाणे शक्य होत गेले. सुरवातीस sms वरून अथवा missed call वरून संपर्क होऊ लागला. sms च्या मर्यादेत राहून माहीती करमणूकीचा प्रसार नेटाने करण्यात आला. बऱ्याच जुन्या मित्रांचे फोन गोळा करणे हा एक मोठा प्रकल्प राबवण्यात आला. सर्वात कष्टाचा प्रसंग म्हणजे फोनचा बदललेला नंबर सर्वाना कळवणे. एकदा मला एकानं sms केला "हा माझा नवीन नंबर. कृपया नोंद करून घेणे." आता या विद्वान महाशयानी आपलं नावंच नाही लिहीलं त्यात. मला मग परत मेसेज करून विचारणं भाग पडलं


Orkut नामक कंपनीने आमच्या वेदना जाणून एकत्र बांधण्याचे काम सुरू केले. इंटरनेट आणि काॅम्पुटरचा प्रसार अजूनही फारसा झाला नसल्यामुळे माझ्या Orkut च्या सादेला कमी प्रतिसाद मिळाले. खरी क्रांती सुरू झाली facebook आणि WhatsApp मुळं. प्रत्येक लिहायला वाचायला येणाऱ्या माणसाची fb वर नोंद हवीच असा समज बोकाळला. पण याचा फायदा असा की जुन्या हरवलेल्या मित्राना शोधणे सोपे होऊ लागले. त्यात अजून भर पडली स्मार्ट फोनची. संपर्काची सोय इतकी सोपी झाली की कधीपण कुणाला पण संपर्क साधता येऊ लागला


fb वर अनेक उत्साही व्यक्तीनी अनेक प्रकारचे ग्रुप तयार केले. ज्याला जे आवडेल ते घ्या. अमक्याचा फॅन ग्रुप, तमक्याचा हेट ग्रुप, अजून नोकीयाच वापरणार ग्रुप, पत्नी जाचाला वैतागलेला ग्रुप, नवऱ्याला छळू ग्रुप, सासूला पिडू ग्रुप, टुकार सिरीयलच्या प्रेमात ग्रुप.. असे नाना ग्रुप उगवले आणि भराभर असंख्य मंडळीनी सदस्यत्व स्विकारले. दहावी, बारावी, काॅलेज च्या ग्रुप ना तर गणनाच नाही. वेळ मिळेल त्यावेळी आॅफीस असो वा शेजार असो तिथं चर्चा झडू लागल्या की कोणत्या ग्रुपवर काय घडतंय आणि ते योग्य का अयोग्य. सार्वत्रीक मत प्रदर्शाना प्रचंड ऊत येऊ लागला. त्यातून नवनवीन विनोदाच्या कल्पना उदयास आल्या. देशात आणि भारतात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपण मत दिलेच पाहीजे असा जणू कायदाच अमलात आला. त्या बरोबरीने चढाओढ सुरू झाली fb च्या भिंती रंगवण्याची. स्वत:बरोबर दुसऱ्याच्या पण भिंतीवर पण पिचकारी मारण्यात येऊ लागल्या


माझ्या fb च्या बरोबरीने मी अजून एका ठिकाणी माझे अस्तित्व नोंदवले. ते म्हणजे Twitter. जर तुम्हाला या जगा बरोबर रहायचे असेल तर थोरा मोठ्या मंडळीच्या मधे उठबस असायला हवी आणि त्यासाठीच Twitter हा एक राजमार्ग आहे. या मधे सर्व महान प्रसिद्ध व्यक्ती स्वत:चे उद्गार युक्त मत मांडत असतात. नजिकच्या भविष्यात घडणाऱ्या वादळाचे संकेत देतात. दुसऱ्याने घडू घातलेल्या वादळामधे तेल ओतून त्याचे वणव्यात रूपांतर करतात. अशा या बहुगूणी Twitter वर नसणे म्हणजे एकविसाव्या शतकात राहून अश्मयुगात वावरणे. मी पण जनलज्जे खातर माझे नाव नोंदवून काही महान विद्वानांची कास पकडली आहे. त्यानी केलेल्या चिवचिवाटाला माझी चोच उघडून संमती देणे सुरू केले


या सर्व सोशल उत्क्रांतीमधे मानाचे स्थान पटकावले ते WhatsApp नामक कंपनीने. प्रत्येक व्यक्तिकडे स्मार्टफोन आणि प्रत्येक स्मार्टफोन मधे WhatsApp असे समिकरणच बनून गेले. कालांतराने अशी बातमी आली की fb ने WhatsApp विकत घेतले. मग तर काय सुवर्णसंगम. इकडचे संपर्क तिकडे, तिकडची माहीती इकडे अशा उठाठेवी चालू झाल्या. WhatsApp मधे ग्रुप निर्माण केल्यामळे कंपनीचे या समाजावर फार मोठे ऋण आहेत. असंख्य ग्रुप वर सदस्यत्व मागता बहाल करण्यात आले. कोण कधी काय ग्रुप बनवेल याचा काही नेम नाही. रोज कोणत्या ना कोणत्या ग्रुपच्या सदस्यत्वाची प्रेमळ मागणी फोनवर येऊन पडलेली दिसते. मातुल घराण्याचा ग्रुप वेगळा, पितृल घराण्याचा वेगळा, सासुरवाडीचा वेगळा, आॅफीसचा वेगळा, मुलांच्या क्लासच्या पालकांचा वेगळा, ह्यातल्या दोस्तांचा वेगळा, त्यातल्या मंडळींचा वेगळा नानाविध ग्रुप. सर्वांचे मेसेजेस वाचणे आणि त्याना उत्तर देणे हे एक मोठे कामच असते. एकच विनोद किमान दहा वेळा तरी येतो आणि तो इमाने इतबारे वाचलाही जातो. सुप्रभात आणि शुभसंध्या च्या मेसेजेसना तर सदा सर्वकाळ भरती असते. कोणीही फक्त सुप्रभात म्हणून थांबत नाही. त्या बरोबरीने जीवन विषयक महान तत्वज्ञानाची उकल पण केलेली असते. रोज दिवस रात्र मिळणाऱ्या या महाज्ञानाला समजून घेऊन आचरणात आणणं ही प्रत्येक सुजाण नागरीकाचे कर्तव्य असते. या शिवाय शतपावलीस बाहेर पडण्यापासून ते आज मी काय खमंग पदार्थ बनवलाय याची सचित्र माहीती कळवीत रहाणे अशी सांस्कृतिक परंपराच बनली आहे. खरी जबाबदारी असते ती ॲडमीनची. सोपं नसतं यशस्वी ॲडमीन होणं. सर्व सदस्याना सांभाळून घेऊन एकत्र आणणे ठेवणे ही किती अवघड बाब आहे. लोक ॲडमीन वर टिका करीत असतात, विनोद करीत असतात, टर उडवतात, काही कौतुक पण करतात. तरी कोणत्याही भावनेच्या आहारी जाता ॲडमीन हा निष्ठेने ग्रुपची सेवा करीत असतो. ज्या वेळी एखादी व्यक्ती अशा तीन-चार ग्रुप चे ॲडमन पद सांभाळतो त्यावेळी त्याला किंवा तिला या समाजात मानाचे स्थान प्राप्त होते. दहाहून अधिक ॲडमीन पदं म्हणजे मानाचा तुराच म्हणा ना!


तर माझा प्रवास असाच पुढं सरकत instagram, Google plus आदी ठिकाणी सुद्धा पोचलेला आहे. तुम्ही तुमच्या सुट्टीत काय उद्योग केलेत अथवा व्रात्य कार्ट्याच्या जन्मदिना दिवशी त्याने काय उपद् व्याप केलेत याचे रंगित चित्रण जगासमोर ताठ मानेनं दाखवण्याची ही ठिकाणं. मला या गोष्टीचा पुरेपूर अभिमान आहे की मी याही बाबतीत मुळीच मागे पडलेलो नाही. कोणाला रस असो वा नसो, शे दोनशे चित्र टाकायची आणि सर्वाना आग्रहाची विनंती करीत रहायचं. लोकानी ते पाहीले याचा पुरावा म्हणून त्यांचे अंगठे आले का ते पहात रहायचे. बस्स! इतकंच.


माणूस जरी समाज प्रिय असला तरी कोणत्या समाजावर प्रेम करायचं ते मात्र तो सोयीनं निवडत असतो. "समान शीलेशु व्यसनेषु सख्यम्।" या उक्ती प्रमाणे तो समाजात मिसळण्याचे व्यसन लावून घेतो आणि मग आपला समाज तो स्वत:च्या सोयी प्रमाणे तसेच प्रतिष्ठे प्रमाणे निवडत असतो. मी ही याला अपवाद नाही.


आज काल जर अचानक झोपेतून जाग आली तर किती वाजले हे पहाण्याआधी किती मेसेजेस आलेत याकडे चटकन लक्ष जाते. शेजारी बायको झोपलीय का उठून कामाला लागलीय हे कळण्याआधी सात समुद्रापलिकडून आलेला मित्राचा संदेश वाचला जातो. दात घासण्यापुर्वी सर्व मेसेज वाचून त्याना उत्तरे देणे अधिक महत्वाचे असते. हे मेसेजेस तर जीवनाचा इतका अविभाज्य घटक बनत आहेत की आता चालता चालता मेसेज, खाता खाता मेसेज, झोपता झोपता मेसेज, काम करताना मेसेज, सर्व विधी करताना मेसेज... एक ना हजार. अशी अष्टावधानी कला विकसीत करण्यात आली आहे. माणूस समाजाचा घटक असला तरी समाज माणसाचा (पर्यायानं माझा) इतका मोठा घटक बनेल असा कधी विचार नव्हता केला. या पुढं तंत्रज्ञान माणसाला अजून किती समाजात ओढणार आहे याची कल्पना नाही. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक सामाजिक क्रांतीला आत्मसात करण्यासाठी मी माझे कुटूंब सर्वस्वी तत्पर असू.

No comments:

Post a Comment

Name:
Message: