[टिप: लेखाची रंजकता वाढवण्यासाठी काही गोष्टी फुगवून व रंगवून सांगितल्या आहेत. मला हिंदी व मराठी संगीताची निश्चितच आवड आहे... जरी त्यातली फारशी जाण नसली तरी! कृपया जाणकार वाचकांनी नोंद घ्यावी.
साहित्य सङ्गीत कला विहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
हा श्लोक मी पण शिकलोय.]
असं म्हणतात की गायकाच्या घरचं कुत्रं सुद्धा सुरातच भुंकतं. पण कदाचित हा नियम माणसाना लागू नसावा किंवा निवडक माणसाना नसावा. असं म्हणण्याचं कारण एकच... दस्तुरखुद्द मी. लहानपणा पासून माझं संगीत क्षेत्राशी जरा विशेष सख्य! जरी मला संगीताचे बाळकडू पाजले गेले तरी ते कडू ते कडूच राहीले. आजतागायत त्याचं रूपांतर गोडीत होऊ शकलं नाही.
लहान पणा पासुनच माझं तसं सुरांशी वावगं. जन्माला आल्यावर पण कदाचित मी न रडता नर्सला करड्या आवाजात सांगितलं असेल की "मला थंडी वाजतीय, काहीतरी पांघरूण घाला." माझ्या भावाला वर्ष भराचा असल्या पासून गाण्याची इतकी आवड की रोज गाणं ऐकूनच झोपायचा. पण माझ्या बाबतीत झोपेचा कधीच त्रास झाला नाही. निद्रा देवी सतत प्रसन्न. मस्त पोट भरलं असेल तर मला छान झोप लागते. गाणी ऐकत झोपणाऱ्यांचं कुतूहल व आदर वाटतो. मला झोपेतला तो एक फक्त व्यत्यय वाटतो. घरामधे आई, बाबा आणि भाऊ तिघेही गोड गळ्याचे. बऱ्याच घरगुती छोट्या मोठ्या कार्यक्रमात गाणं म्हणायचे. बाबांचं एक ठरलेलं गाणं होतं "अशी पाखरे येती". मला बाबा म्हणतात म्हणून फक्त छान वाटायचं पण ते गाणं कधी ओठावर आलंच नाही. माझ्या आईचं एक असं स्वप्न होतं की आपल्या दोन्ही मुलानी संगीत क्षेत्रात खुप शिकावं. दोघांचे छान कार्यक्रम व्हावेत. पण तसलं काही होणं संभव नव्हतं. नाही म्हणायला भावानं बऱ्यापैकी गायनामधे गती दाखवली पण शिक्षणामुळं त्याचंही जरा दुर्लक्षच झालं. एकंदरीत माझ्या गळ्यातील सुरांकडं बघता आईनं मला गाणं शिकवायचा नाद सोडून दिला. तरी मला संगीत क्षेत्रापासून दूर जाणं तिला मंजूर नव्हतं. किमान तू तबला तरी शिक असा हेका तिनं धरला. मग माझ्यासाठी तबल्याचे गुरू शोधणे सुरू झाले. तिच्या अथक प्रयत्नांती मला पाच वर्षाचा असताना एका गुरूकडे रोज तासभरासाठी पाठवण्यात आले. मला मुळातच असल्या विषयात रस नसल्यामुळे गुरूनी दिलेल्या ज्ञानाला मेदूत शिरून आणि ते बोटात उतरायला अनंत अडचणी येत होत्या. महिनाभराच्या अथक परिश्रमा नंतर माझ्या गुरूना असा बोध झाला की उगाच व्यर्थ वेळ घालवणं योग्य नाही. मग त्यानी आई ला बोलवून नमस्कार करून माझ्या प्रगती बद्दल दिलगीरी व्यक्त केली. अजून लहान आहे असं काहीतरी सांगून त्यानी स्वत:ची सुटका करून घेतली. या अशा गुरूंच्या सहकार्याने मलाही सुखद धक्का बसला. लौकरच मला कळलं की माझी अशी सहज सुटका होणं शक्य नव्हतं. साधारण १०-१२ वर्षाचा असताना पुन्हा एकदा मला तबल्याच्या एका नव्या गुरू समोर पाचारण करण्यात आले. धाधिंधीधा चे बोल माझ्या कानी कपाळी जोर जोरात मारण्यात आले. माझ्या बरोबर माझा भाऊ रागदारी गायनाचे शिक्षण घेत होता. त्याच्या पुण्याई वर माझी संगीत क्षेत्रातून हकालपट्टी होणे अशक्य झाले होते. माझ्या हरतऱ्हेच्या प्रयत्ना नंतरही गुरू बदलायला तयार नव्हते. मला झाकीर हुसेन बनवण्याचा विडाच उचलला होता त्यानी. मी पण बाजीप्रभु देशपांडे प्रमाणे खिंड लढवित होतो. घरात आई आणि बाहेर तब्बलजी गुरू!! असा हा खेळ जवळ जवळ वर्षभर चालला. अखेरीस देवच पुन्हा माझ्या मदतीस धावून आला. बाबांची बदली परगावी झाल्यामुळं आम्ही सर्वानी ते गाव चं सोडलं आणि गुरूना मी साष्टांग नमस्कार घालून तेथून पोबारा केला.
मला तशी नाटकात कामं करण्याची भलतीच हौस होती. शाळेच्या नाटकात कायम भाग घ्यायचो. कोणत्याही अध्यापकाला माझ्यात लपलेला नटसम्राट मात्र दिसला नाही. सर्वसामान्य भुमिका करूनच मी स्वत:चे समाधान करून घेत असे. शाळेतील संगीत शिक्षकानी मात्र माझ्यातील संगीत कलेला चांगले ओळखले होते. कोणत्याही गायन वादन कार्यक्रमापासून मला ते दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. एकदा आमच्या शाळेचा आकाशवाणी केंद्रावर समुह गायनाचा कार्यक्रम होता. माझ्या मित्रमंडळीं पैकी बरेच जण त्या कंपू मधे होते. अचानक शाळेत त्या सर्वांचा भाव भलताच वधारला होता. मला त्यावेळी प्रथमच माझ्या गायनकलेचा मानसिक त्रास झाला. गायनाच्या कंपू बरोबर आमचे विज्ञानाचे शिक्षक पण जाणार आहेत अशी बातमी मला लागली. तसा मी त्यांचा जरा खास मर्जीतला विद्यार्थी होतो. त्या गोष्टीचा फायदा उठवून मी पण कंपूमधे ऐनवेळी प्रवेश मिळवला. केंद्रावर अचानक मला पाहून संगीताचे शिक्षक जरा गडबडलेच. पण अधिकाऱ्यांसमोर त्याना काही बोलता येईना. नंतर त्यानी संधी साधून मला हळूच बाजूला घेतला आणि चांगलाच दम भरला. तोंडातून आवाज काढायचा नाही असं बजावून सांगीतलं. आकाशवाणीच्या इतिहासात मी एकमेव असा गायक असेन ज्यानं न गाताच गायकांच्या यादीत स्थान पटकावले.
असा हा संगीतमय प्रवास जोरदार सुरू होता. घरापासून दारापर्यंत माझ्यावर संगीताचा भडीमार होत होता. जेष्ठांमधे भीमसेन जोशी ते अनुप जलोटा, भावंडांमधे लता, आशा ते कविता आणि रफी ते किशोर सर्व गायकांची सतत उठबस होती. प्रत्येक गायकाला आमचा पत्ता पाठ होता. एकदा माझे काका मला जितेंद्र अभिषेकी च्या कार्यक्रमाला घेऊन गेले. बराच वेळ पंडीत सूर पकडण्यात दंग होते. त्यावेळी सूर हा जणू व्रात्य कार्ट्या प्रमाणे सारखा लांब पळतोय आणि त्याला सतत पकडून आणावे लागते काय अशी मी शंका व्यक्त केली. पंडीतजींचे हातवारे पण तसंच दर्शवित होते. एकंदरीत माझ्या ज्ञान व विनोद बुध्दी ला पाहून काका मला पुन्हा कधीच कोणत्याही कार्यक्रमाला घेऊन गेले नाहीत. आज्जी मला किर्तनं, भजनं आणि भारूडं ऐकायला देवळात घेऊन जायची. तिथला निम्म्याहून अधिक श्रोतृवर्ग घरात राहलेली झोप पूर्ण करायला येत असे तर उर्वरीत मावशा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीत लक्ष केंद्रीत करीत असत. प्रामाणिक पणे किर्तन सादर करणारे बुवा अथवा भजनी मंडळाच्या आज्ज्या घशाचा व्यायाम छान करीत असंत. आमच्या घरातला टेप रेकाॅर्डर बिन थकता गाणी पाठ करीत असे. मला तर जाम विश्वास आहे की कॅसेट न घालताच जर त्याला धोपटला तर तो मुकाट्याने अनुप जलोटा, श्रीधर फडके, भीमसेन जोशी आळवू लागेल. सुट्टीत भावंडांच्या रात्र रात्र भर गाण्याच्या भेंड्या चालायच्या. मोठी मंडळी एका पाठोपाठ एक गाणी म्हणून घसे साफ करून घ्यायची. या सर्व सुरांच्या अतिवर्षावात सुद्धा मी कोरडा ते कोरडाच. आजतागायत मला भेंड्या खेळताना एकही गाणं सुचलेलं नाही. भेंडी चढली की मी आनंदाने ती स्विकारत असे. अहो साधं कधी आंघोळ करताना पण गुणगुणलो नाही मी. नशिबानं माझ्या आंघोळीच्या बाथरूमच्या कड्या घट्ट असल्यामुळं मला गाणं म्हणून स्वत:चा अनाहुता पासून बचाव करावा अशी वेळच आली नाही. मला कधीही गाणं पाठ झालं नाही. कडवं सोडा साधं ध्रुवपद कधी लक्षात राहीलं नाही. मग त्याची चाल वगैरे आठवणीत ठेवणं तर फारच दूर. गायनाच्या पुर्वी गायक पेटीवाल्याला जे "काळी ४" असं काहीतरी सांगतो ते म्हणजे उगाचच प्रेक्षकांसमोर भाव मारण्यासाठी किंवा दुसरं काहीतरी सांकेतिक भाषेत सांगत असावा असं मला वाटायचं. तब्बलजी जे हातोड्यानं ठोकून आणि वाजवून तबला पहातो ना ते सुद्धा शुद्ध नाटक वाटतं. मला तर ध्वनीमधे काहीच फरक जाणवत नाही. सतारीच्या सर्व तारांमधून एकाच प्रकारचे सूर सतत काढीत रहाणे म्हणजे सतारवादन झाले असे माझे प्रामाणिक मत आहे. मला जर कोणी आवडतं गाणं कोणतं असं विचारलं तर बुचकळ्यात पडायला होतं. आवडता गायक कोण याचं उत्तर मात्र पाठ करून ठेवलंय. त्यावर कोणी "का" म्हणून विचारलं तर मात्र मी लगेच माघार घेतो. संगीत विषयावर जर कधी चर्चा रंगल्या तर तिथं माझी उपस्थिती मलाच टोचायला लागते. सर्वजण मला एकदम मोठे तत्ववेत्ते वाटू लागतात. गाणी ऐकताना जे लोक मान हलवतात ते झोप येऊ नये म्हणून स्वत:ला जागं ठेवतात असा माझा बरेच दिवस समज होता. सर्वात मोठा विनोदाचा भाग म्हणजे गायकाचा चेहरा. शिक्षकांचा पट्टीनं मार खाल्ला की असा चेहरा करतात एवढाच माझा अनुभव होता. आणि तिथं मला पट्टीचा गायक असं एखाद्याला का म्हणतात याचा शोध लागला.
लग्ना नंतर सुद्धा माझ्या पाठीमागचा संगीतमय ससेमिरा संपला नाही. नेमकी बायको पण गाठ पडावी ती संगीतप्रेमीच! तिला कित्येक हिंदी गाणी अख्खी तोंडपाठ! मला म्हणजे अजूनच मेल्या प्रमाणं झालं! महम्मद रफी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, लता मंगेशकर जणू यांच्या घरी पाणी भरायला होते. चुकून माझ्याकडून एखादा गाण्यातला शब्द चुकला तर मला चार दिवस जेवण मिळायचे नाही अशी भीती वाटते. म्हणून मी गाणं म्हणायच्या अथवा गुणगुणायच्या पण फंदात पडत नाही. बऱ्याच जुन्या सुरेल (?) गाण्यांचं तिनं छानसं कलेक्शन केलंय. मी मुळीच विरोध करू न देता कायम प्रोत्साहनच दिलंय. फक्त अट इतकीच... या सुरांचा आस्वाद माझ्या अपरोक्ष घ्यावा. उगाच मला असल्या व्यसनाला लावण्याचा प्रयत्न करू नये. मोठी पंचाईत होते ती म्हणजे सासुरवाडी ला गेल्यावर. सासुबाईंच्या देखरेखी खाली मैफील रंगते. आलेले बरेच पै पाहुणे सरसावून घशाला त्रास देतात... आणि माझ्या कान व झोपेला. उत्साही मंडळी मला पण गाणं म्हणण्याचा आग्रह करतात. मी मात्र एकटा खिंड लढवत "नाही नाही" म्हणत असतो. माझ्या बाजुने एखादं वाक्य बोलेल म्हणून मी केविलवाण्या नजरेनं सौ कडं बघितलं तर ती चक्क दुर्लक्ष करून टाकते. "तुमचं तुम्ही बघा" असा तिचा पवित्रा असतो. या सर्व दु:खात भर म्हणून माझी मुलगी सुद्धा बऱ्याच वेळा गाण्याच्या भेंड्या खेळताना माझ्याकडं नाक मुरडून आईला जाऊन मदत मागते.
एक दिवस कोणीतरी माझ्या सारखा समदु:खी भेटेल अशी आशा आहे. (भोसलेंची नव्हे.) संगीताशिवाय पण माणूस जगू शकतो हे जगाला कळून चुकेल अशी देवाकडं गद्द्यात प्रार्थना करतो. माझ्या बाबतीत "सूर छेडणे" म्हणण्यापेक्षा "छेड काढणे" अधिक समर्पक होऊ शकेल.
No comments:
Post a Comment
Name:
Message: