Friday, 24 March 2017

स्वप्नमय जीवन

आपणा सर्वानाच स्वप्नं पहायला खुप आवडतात. त्याहून अधिक आवडतं ज्यावेळी पाहीलेली स्वप्ने साकार होतात. सर्व सामान्य माणसाचं स्वप्न म्हणजे एक स्वत:चे टुमदार घर, एक सुपत्नी (सुस्वभावी, सुगरण आणि सुंदर), एक किंवा दोन गोंडस मुलं, नवीकोरी कार आणि ते ची गलेलठ्ठ पगाराची नोकरी. एवढी माफक स्वप्नं पुर्ण करताना आयुष्य वेचावं लागतं. एकावेळी सगळं मिळतंच असं नाही. एक हातात येई पर्यंत दुसरं निसटलेलं असतं. तरी मनुष्य प्रयत्न सोडत नाही. कारण एकच... त्यानं ते सुखाचं स्वप्न पाहीलेलं असतं.


स्वप्न रंगवणे हा पण एक छंद असू शकतो. कल्पना विश्वात रमलेल्या मंडळीना त्यातून सुख मिळू शकतं. वास्तवात त्या प्रमाणं घडो वा ना घडो पण मनामधे तसं नक्की घडतं. जे घडतं ते फक्त फक्त सुखदायीच असतं. यात हरण्याची भीती नसते. वेळेचा वेग कमी-जास्त करता येतो. आर्थिक विवंचना नसते. स्पर्धा नसते. तरूण मुली स्वप्नात स्वत:साठी एक देखणा राजकुमार बघून ठेवतात. तिथं कधीच गोर गरीबाना अथवा नोकरदाराना प्रवेश नसतो. मनात खोलवर भांडवलशाही चंगळवाद रूजलाय.. दुसरं काय? निश्चितच हे सगळं समजुतदार व्यक्तीच्या दृष्टीने हास्यास्पद असेल तरीपण लहानां पासून थोरां पर्यंत प्रत्येकालाच मुंगेरीलाल बनायला नक्की आवडतं. कोणी बोलून व्यक्त करतात तर कोणी मनात मांडे खातात. पाहीलेली स्वप्ने सत्यात उतरवण्यात खरे शौर्य आहे. त्या स्वप्नांना वास्तवात परीवर्तीत करण्याची कला म्हणजे मेहनत, चातुर्य आणि आत्मविश्वास


या वरील सर्व गोष्टींपेक्षा एक गोष्ट अतिशय भीन्न तरीही विचार करायला लावणारी आहे. ती म्हणजे पडणारं स्वप्नं. कोणत्याही वयाच्या व्यक्तीना स्वप्ने पडू शकतात. लहान बाळाला स्वप्न पडलं तर ते खुदकन हसतं किंवा रडतं पण. ते बिचारं काही बोलू शकत नाही म्हणून आपणच लावलेला त्याचा अर्थ हा की ते मागील जन्माचं आठवून रडतंय अथवा हसतंय. या गोष्टीला काहीच पुरावा नाही. काही विद्वान लोक त्यांच्या स्वप्नात पाहीलेल्या काही गोष्टींना खरं मानून त्याचा शोध घेऊ लागतात. केक्युले नावाच्या जर्मन शास्त्रज्ञानं स्वप्नात पाहलेल्या आकृती वरून बेन्झीन या द्रव्याच्या रचनेचा शोध लावला. किमान माझ्यासारख्या माणसाला असली स्वप्ने पडणं अगदी स्वप्नात सुध्दा शक्य नाही. तसे स्वप्नांचे इतरही काही उपयोग आहेत. बऱ्याच देव देवतांचं त्यांच्या लाडक्या भक्ताना भेटण्याचं ठिकाण म्हणजे स्वप्न. सरळ घरी यावं, चहा पोहे खावेत, जे बोलायचं ते सविस्तर बोलावं, उपदेशाचे डोस द्यावेत आणि चालतं व्हावं. असे सोपे सर्वसामान्य विचार त्याना रूचत नसावेत. ते भक्तांच्या स्वप्नात येणं पसंत करतात. दृष्टीस पडताही त्यांच्या भेटीस दृष्टांत का म्हणतात हा एक वेगळाच मुद्दा! काही लोक त्यांच्या मृत पुर्वजाना भेटण्याची हक्काची जागा म्हणून स्वप्नांकडं बघतात. त्यांनी स्वप्नात येऊन त्यांची अतृप्त इच्छा सांगितली की मंडळी जागेपणी कामाला लागतात. वडीलानी सांगितलंय, आजोबानी सांगितलंय असं काही बरळत तेच स्वत:चे ध्येय मानून काम सुरू करतात. या सर्व गोंधळात स्वत:च्या इच्छेला तिलांजली दिली जाते. तरीपण घाबरायची गरज नाही. कारण तुमच्या इच्छा पुर्ण करायला तुमची पोरं किंवा नातवंडं आहेतच ना. मृत्यू पश्चात जा बिनधास्त त्यांच्या स्वप्नात आणि लावा त्याना कामाला


वैज्ञानिक दृष्ट्या माणसाला मिनटा पासून जास्तीत जास्त तासापर्यंत स्वप्न पडू शकतं. पण का कोणास ठाऊक आपल्याला बऱ्याचवेळा रात्रभर स्वप्न पाहील्याचा भास होतो. खरं सांगायचं तर दिवसभर कामाच्या श्रमानं बहुतांशी मला इतकी गाढ झोप लागते की सात आठ तास कसे गेले काही समजतच नाही. या कालावधीमधे स्वप्नांना प्रवेश करण्यास मुभा नसते. सकाळी उठल्यावर पुनर्जन्म झाल्याप्रमाणं टवटवीत वाटतं. तरीसुध्दा क्वचित प्रसंगी डोळे आणि पापण्या यामधे स्वप्न ठिय्या मांडून बसतात. झोप लागल्या बरोबर उडी मारून आपल्या समोर येतात. काही स्वप्ने अंधूक आणि अस्पष्ट असतात. जाग आल्यावर ती आठवत नाहीत. उगाचच त्याना आठवण्याचा आपण प्रयत्न करतो पण हट्टीपणानं ती कुठंतरी लपून बसतात. कधी कधी स्वप्नं असंबध्दपणे दिसू लागतात. परस्पर भिन्न काळामधील व्यक्तीरेखा अथवा प्रसंग एकत्र दिसू लागतात. जाग आल्यावर सुध्दा त्यांचा विचार जात नाही. असंबध्द असलं तरी त्याचा कुठंतरी संबंध लावायचा आपण प्रयत्न करीत राहतो. बऱ्याचवेळा काहीतरी उत्कंठापूर्ण स्वप्न पडू शकतं. एखादा चित्रपट पहावा तसं ते डोळ्यासमोरून सरकू लागतं. अगदी ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला जाग येते. भीतीदायक असेल तर हायसं वाटतं, सुखदायी असेल तर हळहळ वाटते, रोमांचकारी असेल तर मोठ्ठा श्वास घेतो. बऱ्याचदा घाम आलेला असतो. खोलीतील वातावरण जरी थंड असले तरी आपल्याला ते गरम भासू शकते. पाणी पिऊन परत झोपण्याचा प्रयत्न करतो. तरी ते स्वप्न आपला पिच्छा सोडत नाही. अथवा असं म्हणू की आपण त्या स्वप्नाला तसं सोडून देऊ शकत नाही. पुन्हा डोळे मिटून आपण त्याचंच स्मरण करतो. चांगलं घडणार असेल तर ते घडावं अशी वाट बघतो आणि तसं घडवून आणतो. वाईट काही घडणार असेल तर ते बदलून चांगलं घडवून आणतो. कदाचित आपण जागेच असतो पण आपण मनाला फसवत असतो. डोळे मिटून स्वप्न पाहण्याचं नाटक करूत असतो. स्वप्न पडण्याची वाट पहाता आपण कल्पनारंजन करणं अधिक सोयीचं मानतो. स्वप्नातील कथा पुर्ण झाली नाही तर मनाला चुटपूट लागते. किमान सकाळचे दोन तीन तास किंवा कधी कधी दिवसभर डोक्यातून तो विषय जात नाही.


माणसाचं मन हे विशाल समुद्रा प्रमाणं असतं. अनेक गोष्टी साठवून सामावून घेण्याची त्यामधे क्षमता असते. समुद्राप्रमाणे मनाचा थांग पण सहजा सहजी लागू शकत नाही. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं हे जसं अशक्य तसंच स्वत:च्या मनात खोलवर काय दडलंय हे समजणं सुध्दा कठीण. या अशा दडलेल्या अनेक सुप्त गोष्टी कधी कधी निद्रीस्तावस्थेत दृष्टीपटलावर उमटू शकतात. आपल्याला जरी त्याचा संदर्भ लागला नाही तरी आपल्या आयुष्यात कुठं ना कुठं तरी त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आलेला असतो. चित्रपटात दाखवतात तशा त्या सुस्पष्ट आणि रहस्यमय असायला हव्यात असेही नाही. पण असंबध्द विवीध धागे कुठंतरी पडलेले असतात ते एकमेकात गुंफून आपल्या समोर प्रकट होतात. कधी कधी रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी सुध्दा स्वप्नात दिसू शकतात. पण कुठंतरी सुप्तावस्थेत मनात खोलवर रूजलेल्या गोष्टी झोपेत उचंबळून स्वप्न रूपात येऊ शकतात. बऱ्याचदा मनात कुठंतरी दडलेली भीती ही स्वप्न स्वरूपात समोर येते. जी गोष्ट होऊ नये असं वाटत असतं ती गोष्ट स्वप्नात नक्की घडू पाहते. या स्वप्नांच्या गदारोळात आपणास एका गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. ती गोष्ट म्हणजे बिचारा दमून जाणारा मेंदू. जगाच्या दृष्टीनं जरी तुम्ही निद्रावस्थेत असला तरी मेंदू मात्र स्वप्नांची चित्रफीत दृष्टीपटलावर प्रक्षेपित करण्याचं काम थकता करीत राहतो. यामुळं सकाळी उठल्यावर जरी झोप झाली असली तरी श्रम परीहार झाल्याचे सुख लाभत नाही


अशावेळी यावर नामस्मरण हा चांगला उपाय आहे. हा केवळ धार्मिक सल्ला नसून निव्वळ मन स्थिर करून अशांती घालवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे. नामस्मरणामुळे आपले लक्ष दु:स्वप्नावरून हटते आणि भगवंताच्या नावावर केंद्रित होते. भगवंताचे  प्रसन्न रूप आणि एका लयीमधे केलेला नामोच्चार पुन्हा शांतपणे झोप येण्यास मदत करतात

No comments:

Post a Comment

Name:
Message: