Friday, 24 March 2017

माझा अभ्यासू प्रवास

जन्माला येणारा प्रत्येक माणूस कशा ना कशाचा अभ्यास करतो आणि त्यातच तो प्राविण्य मिळवून आपली उपजिवीका निवडतो. या वाक्यातून मी कोणत्याही गुढ ज्ञानाची उकल केली आहे अशातला भाग नाही. पण हे आत्ता आवर्जून बोलण्याचे कारण माझा अभ्यासू प्रवास. हा अभ्यासू प्रवास जितका रोमांचक तितकाच संस्मरणीय. प्रत्येक क्षण स्मृतीत साठवून घेण्या सारखा. प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे या उक्ती प्रमाणे या माझ्या मेंदूरूपी वाळूला रगडून अभ्यासाचे तेल काढण्याचा पराक्रम आईनं करून दाखवला यात मात्र मुळीच शंका नाही.


तर माझा हा प्रवास सुरू झाला अगदी बालवाडी च्या आधी पासूनच. आई बाबांचं पहिलंच अपत्य असल्यामुळे जरा लाडातच बालपण. उगाच फॅन कसा फिरतो आणि झुकझुकगाडी आवाज कसा करते या असल्या टुकार नकलाना आवर्जून प्रेक्षक वर्ग गोळा केला जायचा. शाळेची पायरी चढल्यावर माझ्या मानगुटीवर अभ्यासाचं ओझं जे बसलं ते अजून हलायचं नाव घेत नाही. या अभ्यासाच्या ओझ्या पलीकडं एक परीक्षा नामक राक्षस बसलेला असतो. जो शाळेत वेळापत्रका प्रमाणे यायचा, आता रोजच समोर येऊन उभा असतो. या राक्षसावर विजय मिळवण्यासाठी अभ्यासाचं ओझं वहावंच लागतं. शाळेतल्या राक्षसाचं कौतुक मात्र फार मोठ्ठं. आत्ताच्या राक्षसाला रूटीन म्हणतात.


तसा अभ्यास करणं हा फार आवडीचा उद्योग कधीच नव्हता. पहिली दुसरीत असताना पाढे पाठ करणे किंवा मराठी अक्षर गिरवणे हे अतिशय कंटाळवाणे प्रकार होते. वर्गात बाकीच्या मुलांच्या बरोबर दंगा करणे, उगाच कानात वारं शिरल्यागत पळापळ करणे आणि दमून भागून आईच्या कुशीत झोपणे एवढंच मला येतं होतं. कसेबसे वीस पर्यंतचे पाढे पाठ केले असतील पण त्या पुढील एक पण पाढा जन्मात पाठ झाला नाही. वर्गात दुसरा क्रमांक काढल्यावर आईनं जरा समजवायचा प्रयत्न केला तर मीच युक्तिवाद असा केला की वर्गात माझ्यापेक्षा कित्येक मुलाना कमी मार्क पडलेत त्यांच्याकडं बघ ना


माझ्या आयुष्यात अभ्यासाचं खरं वर्चस्व सुरू झालं ते साधारण पाचवी पासून. पाचवी ला प्रथमच इंग्रजी सुरू झालं होतं. ABCD आणि निरर्थक बडबडगीतं ही संस्कृत वेद शिकावित तशी पाठ करणं सुरू झालं. घरातल्या प्रत्येक थोरा मोठ्यांची ही जणू नैतिक जबाबदारीच बनली होती की मला अभ्यासाला बसवायचं. जो येईल तो आपला मला एकच प्रश्न "कसा काय चाललाय अभ्यास? जमतंय का इंग्रजी?" आता कप्पाळ! मी काय सांगणार. जणू या मंडळींचा शेक्सपिअर बालमित्रच! मला काहीतरी पाठ करायचं म्हणलं ना की प्रचंड कंटाळा यायचा.. अजूनही येतो. पुढं या प्रवासात आईनं माझ्यावर बरेच प्रयोग करून पाहीले.. कोणत्याच प्रयोगाला म्हणावं तसं मी यश येऊ देत नव्हतो. शाळेत दिलेल्या अभ्यासा व्यतिरीक्त घरी वेगळा अभ्यास करणे, धड्या खालचे प्रश्न सोडवणे, जादाची गणितं सोडवण्याची व्यर्थ धडपड करणे, पहाटे उठून अभ्यास करणे, वेगवेगळ्या खाजगी शिकवण्याना जाणे... एक ना अनेक. मी मात्र कुरूक्षेत्रावरील पार्था प्रमाणे वीरश्री पणाला लाऊन एकटा सर्व कौरवरूपी प्रयोगां बरोबर लढा देत होतो. आईनं मला काहीतरी बनवण्याचा विडाच उचलला होता. तिच्या डोळ्या समोर भविष्यात येणाऱ्या शिक्षणाला अवाजवी महत्वाचे चित्र उभे राहीले होते. आपल्या पोरानं या महा कठीण जगात फेकले जाऊ नये एवढीच तिची तळमळ होती. त्यासाठी तिच्याकडून शर्थीचे प्रयत्न चालू होते. मला मात्र कंटाळा पाचवीलाच फक्त नाही तर बालवाडी पासून शिक्षण पुर्ण होई पर्यंत पुजलेला


आठवी पासून संस्कृत नावाचा विषय नवीन हत्यारांसहीत अक्राळ विक्राळ चेहरा करून पुढं येऊन उभा राहीला. मला असं उगाचच सांगण्यात आलं की संस्कृत हा गणिता सारखा असतो. त्यात सुद्धा पैकी च्या पैकी मार्क पडू शकतात. आजतागायत मला संस्कृत आणि गणित यामधे काहीच साधर्म्य दिसलेले नाही. नाही म्हणायला एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्ही विषयात मला कधीच पैकी च्या पैकी मार्क पडले नाहीत. "देव: देवौ" मला चुकून सुद्धा पाठ झालं नाही. "अहम आवाम वयम प्रथमा" या पुढं गाडी कधी गेलीच नाही. सर्वात भीतीदायक प्रसंग म्हणजे संस्कृत सुभाषितं पाठ करणे. आईनं माझ्या कडून सुभाषितं इतकी पाठ करून घेतली होती की एकवेळ स्वत:चं नाव विसरेन पण सुभाषितं विसरणार नाहीत


माझ्या अभ्यासाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला मी दहावी ला गेल्यावर. अभ्यासाच्या चर्चा उपदेश याना जणू उत आला होता. उगाचच माझ्या आधी दहावी बऱ्या गुणानी उत्तीर्ण झालेल्या मुलां समोर मार्गदर्शन मिळवण्यासाठी बसवण्यात येत होते. शाळेत, घरी, दारी मला नुसता अभ्यास दाखवण्यात आला. संत तुकारामाना पण विठ्ठलानं एवढं दर्शन दिलं नसेल तितका अभ्यासरूपी विठ्ठल माझ्यासमोर कंबरेवर हात ठेऊन सतत उभा असायचा. आमच्या घराजवळच एका निवृत्त शिक्षकानी दहावीच्या मुलाना ज्ञान दान करावे या उद्देशाने एक उपक्रम चालू केला. सुरवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला पण हळू हळू विद्यार्थांची संख्या कमी होत गेली. मी मात्र प्रामाणिक पणे दर रविवारी त्यांच्या समोर जाऊन बसलेला असे. त्यांच्या या उच्च कोटीच्या कष्टामुळे माझ्या ज्ञानात खरच काही भर पडली का हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो पण माझे रविवारचे टिव्हीवरील करमणूकीचे कार्यक्रम बुडले याचे शल्य मात्र अजूनही टोचते. माझ्या या अशा या प्रामाणिक पणामुळे मी त्या गुरूवर्याच्या मर्जीत उतरलो अशातला भाग मुळीच नाही, उलट पक्षी मी आजच्या तरूण पिढीचं प्रातिनीधीत्व करीत असल्या प्रमाणे "हे तरूण कसे वाया चाललेत" अशी उगाचच बोलणी खावी लागत. समाजात बोकाळलेल्या सर्व नैतिक अनैतिक घटनांचा खरा सुत्रधार आयता ताब्यात मिळाल्याप्रमाणे माझी रोज कान उघाडणी होत असे. रोजच्या शाळे व्यतिरीक्त खाजगी शिकवणीचा प्रकार सुद्धा चालत असे. रोजची सकाळ त्या शिक्षकमुर्तीच्या दर्शनात पार पडत असे. त्यांचे अतिशुद्ध मराठी बोलणं आमच्या कुतूहलाचा नकलेचा विषय बनला होता. प्रत्येक परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर तयारीचे वेळापत्रक बनवणे हा एका आवडीचा कार्यक्रम होता. प्रत्येक विषयातील धड्यांप्रमाणे दिवसागणिक उजळणी चे समीकरण मांडणे यात छान वेळ जात असे. पण ते वेळापत्रक पाळून त्या प्रमाणे उजळणी संपवणे मला शक्य होत नसे. अखेरीस मी त्यावर पण एक तोडगा काढला. दर रविवारी संध्याकाळी आधीचे वेळापत्रक फाडून टाकून नवीन वेळापत्रक बनवणे अशी तरतूद त्या वेळा पत्रकातच करून ठेवली


डोळ्यासमोर पुस्तक धरून बसणं म्हणजे अभ्यास हा इतकाच माझा समज होता. मी खरंच वाचतोय का नाही हे कळण्यासाठी आई हळूच पान क्रमांक बघून जायची. माझ्या नजरेतून ते सुटणं अशक्य होतं. आईची पाठ वळताक्षणी मी एकदम १०-१२ पानं उलटून पुन्हा टवाळकी करायला रिकामा. एकदा मी असाच अभ्यास करीत बसलेला असताना माझे लक्ष खिडकीतून बाहेर बाल्कनीत पसरलेल्या पापडांकडे गेले. त्यावर एक मोठाली माशी सारखी येऊन बसत होती. कितीही हटकलं तरी ती जात नव्हती. मग मलापण जरा कुतूहल निर्माण झाले. त्या बसलेल्या माशीचे बारकाईने निरीक्षण करू लागलो. पुढील पाय उचलून तोंड पुसणे, पंखांची उघडझाप, अन्नावर अलगद बसणं, अतिसावध, चंचल स्वभाव आणि चपळ हालचाल. हे सगळं मला भलतंच आवडलं. तोंडावर येऊन ठेपलेल्या परीक्षेचं भान पण राहीलं नाही. पुस्तक मागं पडलेलं होतं आणि मी खिडकीतून बाहेर एकटक लावून बसलो होतो. माझा एक चुलत भाऊ घरी होता. तो वयानं बराच मोठा असल्यामुळं त्याची सुद्धा माझ्याकडून अभ्यास करवून घेणं ही नैतिक जबाबदारी बनली होती. त्यानं चलाखिनं माझं मागं पडलेलं पुस्तक उचलंल आणि हळूच निघून गेला. आईला या घटनेचा वृत्तांत कळल्यावर माझी फजिती निश्चीत होती. पण का कुणास ठाऊक अचानक मला माझ्या पाठीमागं हालचाल जाणवली. मी ताबडतोब वळून पाहीलं तर माझं पुस्तक आईच्या दिशेने प्रवास करत होतं. मी त्या माशीच्या चपळाईनं उडालो. त्यानं आतल्या बाजूला लपवलेलं पुस्तक मी शिताफीनं उचललं आणि पुन्हा बाहेर येऊन अभ्यासाचे सोंग करीत बसलो. आई तावातावानं बाहेर आली पण माझा अभ्यासातला मग्न अवतार पाहून पाघळली. उलट मला वाटीतून खाऊ देऊन कामाला लागली


जर कधी भावा बरोबर अभ्यासाला बसलं तर मजा वेगळीच. एकमेकाला हसवणे ( रडवणं सुद्धा), वस्तू लपवणे, उशांची फेकाफेक करणे अशा विवीध कलांना बराच वाव मिळत असे. बऱ्याचवेळा आई स्वयंपाक घरात काम करत असताना समोर पाटावर बसवून अभ्यास करवून घ्यायची. अशा वेळी नाईलाजास्तव मला खरंच अभ्यास पण करावा लागे. खरी मजा यायची पहाटे उठून अभ्यास करताना. मी अनेक वेळा विरोध करून सुद्धा माझ्या झोपेची आहुती चढवून चार वाजता मला उठवले जायचे. मला अशा माणसाला भेटायचय ज्यानं आईच्या मनात असं भरवून ठेवलं की पहाटे उठल्यावर छान अभ्यास होतो. शक्य झालं तर त्याला पुढील दहा वर्षे पहाटे चार वाजता उठण्याच्या शिक्षेचं फर्मान काढायचय. घरात मी आणि माझा भाऊ दोघेच उर्ध्व अवस्थेत बाकी संपुर्ण घर गाढ झोपेत. चरफडत बसून मनात आलेला कडवटपणा त्या पुस्तकांवर काढत रहाणं सोपं काम नव्हतं. गोड झोपेला मुकल्यावरच मला कळलं की पहाटेच्या झोपेला साखरझोप का म्हणतात. बऱ्याचदा चारचं उठणं मी नेटानं टाळून तसाच झोपून रहायचो. पाच वाजेपर्यंत आई आणि बाबा यांच्या आलटून पालटून केलेल्या प्रयत्नाना मी जर निकरानं परतवून लावलं तर रागानं "काय वाट्टेल ते कर जा" अशी झोपेसाठी मोकळीक पण मिळत असे. पण मला जर सात नंतर जाग आली तर संपुर्ण घरादारा कडून दोन तीन दरोडे घातलेल्या दरोडेखोराला जो आदर पोलीसानी द्यावा तशी मला वागणूक मिळत असे. अगदी पेपरवाला सुद्धा माझ्याकडे कुत्सित नजरेनं बघतोय असा भास होत असे. पहाटे उठून अभ्यास करणे हा एक मोठा चिंतेचा तसाच चिंतनाचा विषय बनला होता. चिंतेचा या साठी की मी निद्रादेवीचा महान भक्त होतो म्हणून आणि चिंतनाचा होण्याची पण एक कथा आहे. पहाटेच्या थंडीमधे मस्त पांघरूण ओढून झोपावं अशी मला कायम इच्छा व्हायची पण हा अभ्यास मला या सुखापासून दूर करू पहात होता. मग झोपेच्या नवनवीन कला मी विकसीत केल्या होत्या. बसून झोप, उभं राहून झोप, चालत झोप, वाचत झोप... एकदा मला डोळे मिटून बसलेला पाहून आईनं जाब विचारला. मी क्षणाचाही विलंब लावता सांगितलं "मनन करतोय." या युक्तिवादामुळं माझे चिंतनाचे सर्व दरवाजे कायमचे बंद झाले आणि माझे आध्यात्म्याकडं जाणारे मार्ग संपुष्टात आले.


बारावी च्या परीक्षेचा अभ्यास आईच्या अवाक्या बाहेरचा होता. नक्की काय अभ्यास करायचा आणि कसा करायचा याचं सगळंच समिकरण अवघड बनलेलं होतं. लावलेल्या बऱ्याच खाजगी शिकवण्यांच्यावर सगळी मदार होती. आमचे एक प्रोफेसर कायम म्हणायचे हे एक वर्ष खाली मान घालून अभ्यास केलात ना तर आयुष्यभर ताठ मानेनं जगू शकाल. त्यांचं मी फार ऐकलं अशातला जरी भाग नसला तरी त्यांच्या त्या बोलण्यात फारसं तथ्य ही नव्हतं ते आता कळून चुकलंय. आमचा पाच सहा मित्रांचा ग्रुप एका शिकवणीवरून दुसऱ्या शिकवणीला फेऱ्या मारीत असे. काही फाजील हुशार मित्रांच्या प्रगतीचा आलेख माझ्या अभ्यास साधनेमधे व्यत्यय आणू नये याची मी पुरेपूर खबरदारी घेत होतो. बारावीच्या अभ्यासा बरोबर अजून एका अभ्यासाला मी स्वत:हून आमंत्रण दिलं होतं. ते म्हणजे आय आय टी ची प्रवेश परीक्षा. त्यासाठी एक पोस्टल शिकवणीपण लावली होती. अभ्यासाचे प्रचंड सामान घरी येऊन पडत असे. त्याचं मी नक्की काय करायचं हा प्रश्न मला भेडसावत होता. त्या शिकवणीवर बाबानी केलेला खर्च सारखा टोचत होता. शेवटी निर्धार करून बाबाना सांगून टाकलं की याचा अभ्यास करत बसलो तर बारावीच्या परीक्षेवर परिणाम होईल. मला जरा बारावीवरच लक्ष केंद्रित करू दे. माझा हा सुज्ञ विचार स्विकारण्या शिवाय त्यांच्याकडं पण पर्याय नव्हता.


पुढं इंजिनीयरींग ला गेल्यावर तर उगाचच जग जिंकल्याचा आनंद झाला. या सगळ्या गोंधळात अभ्यास इथं पण करावा लागतो याची जाणिव पहिल्या सहामाहीचे मार्कस पाहील्यावर झाली. तिथं अभ्यास म्हणजे फक्त असाईनमेंटस आणि सबमिशन्स एवढाच समज झाला होता. प्रत्येकवेळी कोणातरी विद्वान मुलाला पकडायचं आणि वेळेत सर्व सबमिशन्स पुर्ण करायची अशी शरीराला सवय लागली. परिक्षेच्या आधी तीन चार आठवडे अभ्यासाची सुट्टी असायची. या सुट्टीत माझा कधीच अभ्यास झाला नाही. खरा अभ्यास व्हायचा तो परिक्षेच्या आदल्या रात्री. संपुर्ण जगातील ज्ञानाची उकल एका रात्रीत करून दाखवण्याचे अवघड कार्य प्रत्येक परीक्षेला करीत असू.


नोकरीला लागल्यावर अभ्यासाचं खरं महत्व कळलं. इथल्या परीक्षेला अभ्यासाच्या बरोबरीने आत्मविश्वासाची जोड असणं खुप जरूरीचं असतं. आई नं पटवून दिलेलं अभ्यासाचं महत्व आता पुढच्या पिढीला समजावून सांगण्याचे प्रयत्न करतो आहे. आई बाबानी घेतलेल्या कष्टाचं फळ मात्र पुढच्या पिढीला छान उपभोगायला मिळतंय हे मात्र सत्य.

No comments:

Post a Comment

Name:
Message: