Friday, 24 March 2017

गेलास उडत

अनादी काळा पासून माणसाला उडण्याचं जरा जास्तच अप्रूप! रावणाचं पुष्पक विमान असो वा मारूतीचं लंकागमन... उडत जाण्याची कल्पना माणसाला कायमच आकर्षित करत आलीय. मी पण त्याला अपवाद नाही.

लहानपणी एकदा बाबा मुंबईला विमानतळावर घेऊन गेले होते. तिथले आपोआप उघडणारे काचेचे दरवाजे, देश विदेश चे लोक, इंग्रजी फाडणारी देशी मंडळी आणि एकंदरीत महाभव्य कारभार पाहून डोळे अगदी दिपून गेले होते. प्रत्येक गोष्ट डोळ्यात साठवून घेतली होती. त्यावेळी काचेतून विमानाचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर ब्रह्म पाहिल्याचा आनंद झाला होता. अबब! एशटीच्या दसपट मोठं अन ते पण उडणारं!! कदाचित साक्षात देव पाहील्यावर पण मी एवढा खुश झालो नसतो. ते विमान आतून कसं असंल याची कल्पना करण्याचं पण धाडस त्यावेळी माझ्यात नव्हतं.

पुढं आयुष्यात विमान प्रवास हा सहज साधा आणि सर्व सामान्य होऊन जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. नोकरीला लागल्यावर काही कामानिमीत्त मुंबई ते चेन्नाई असा विमानप्रवास करण्याचा प्रसंग आला. आयुष्यात प्रथमच हे असे धाडस करावे लागणार होते. माझा बरेच दिवस असा समज होता की विमानातील हवाई सुंदरी यानाच पुर्वी स्वर्गातील अप्सरा म्हणत असावेत. त्या अप्सरा संस्कृत बोलत असत आणि आता या इंग्रजीत. दोन्ही भाषा मला तितक्याच कठिण! नाईलाजास्तव मी दोन चार वाक्यं पाठ करून घेतली. तिकीट काढले असलं तरी बोर्डींग पास सुद्धा घ्यावा लागतो याचा बोध त्यावेळी झाला. पण ते तसं का? अशी शंका मनाला लागून राहीली. रांगेतून विमानात प्रवेश करण्यासाठी मी उभारलो. शांत रांग बघण्याची मला सवय नव्हती. तरी काही उत्साही मंडळी पुढं पुढं करण्याच्या प्रयत्नात होतीच. विमानात प्रवेश केल्यावर आतला एकंदरीत सावळा गोंधळ मला खुपच गोड वाटला. मी कशीबशी माझी जागा शोधली. विमानात सीट नंबर हा अंक आणि अक्षर यानी बनवला असल्यामुळे जागा शोधणं थोडं सोपं गेलं. शिवाय मदतीला हवाई सुंदऱ्या स्मित हास्य करीत उपस्थित होत्याच! समोरच्या खुर्चीच्या मागील खिशात काय माल मसाला भरलाय याचं कुतूहल मला कायमच असतं. त्यातील गुळगुळीत कागदाचे मासिक प्रत्येक नवशिक्याला आकर्षित करतात. आपत्कालीन स्थितीत काय करावं याची माहीती देताना हे लोक आपल्याला शिक्षण कमी आणि भीती जास्त देतात असं माझं प्रामाणिक मत आहे. संपूर्ण प्रवासभर मी लहान मुलाप्रमाणे फक्त निरीक्षण करीत होतो. खिडकीची जागा मिळाल्यामुळे उंचावरून पृथ्वी कशी दिसते याचा आनंद घेत होतो. काही क्षणात शहर, रस्ते, वाहनं छोटी होऊन दिसेनाशी झाली आणि प्रचंड वेगाने इप्सित स्थळी आम्ही मार्गक्रमण करू लागलो. सगळंच कसं विस्मयकारी आणि अभूतपुर्व होतं. ढगातून विमान जाताना हात भरावरचं पण दिसणं अशक्य झालं. समोरून दुसरं विमान आलं तर...!! अचानक असा आत्मघातकी विचार मनाला शिवून गेला. आणि मी अखेर पर्यंत जीवाची धाकधूक वाढवून घेतली. अंतिम स्थळी पोचल्यावर वैमानिकाने धावपट्टीवर अलगद उतरून वेग रोखल्यावर मी इतका वेळ रोखलेला श्वास एकदाचा सोडला ... काही म्हणा सर्वच विलक्षण अनुभव होता.

तसं बघायला गेलं तर विमान प्रवास हा काही फार सुखाचा मुळीच नसतो. अनेक आव्हानाना झेलावं लागतं. समोरच्या व्यक्तिनं खुर्ची मागं घेतल्यामुळं आपण बारीक नाही याची जाणिव होऊ लागते. संथ गतीने होणाऱ्या जेवण वाटपा मुळे, ते मिळे पर्यंत जीव कासावीस होऊ लागतो. अगदी विमानात बसण्यापुर्वी जरी भरपेट जेवलं असलं तरी लांबून अन्न येताना दिसल्यावर एवढी भूक का लागते का कोणास ठाऊक! वैमानिक तर सतत सीट बेल्ट बांधण्याची सक्ती करीत असतो. जरा निवांत बसावं म्हणलं तर बाई येतातच सांगत की (मुकाट्यानं) सीट बेल्ट लावून घ्या. शेजारील निद्रीस्त व्यक्तीला ओलांडून बाहेर पडणे हे सुध्दा एक महाकठीण काम असते. असे अनेक त्रास!! तरीसुद्धा प्रत्येकाला विमान प्रवासाचे आकर्षण हे असतेच. त्या बरोबरीने अनामिक भीती पण मनात थैमान घालत असते. विमान अपघाताच्या बातम्या बऱ्याच ऐकायला मिळतात आणि शक्यतो त्यात कोणी जिवंत रहात नाही. त्या कल्पनेने तर अनेकदा पोटात गोळाच येतो.

आजच्या युगात विमान प्रवास हा अतिशय सोईचा आणि सर्व सामान्यांच्या आवाक्यातला झाला आहे. नवीन पिढीला विमानाचं मुळीच अप्रुप राहीलेलं नाही. खऱ्या अर्थानं जग छोटं करण्याचं काम या विमानानं केलं आहे. सकाळी दादरला चहा पोहे, दुपारी दुबई मधे बिर्याणी आणि संध्याकाळी पॅरीसमधे नदीच्या काठावर कर्णमधूर फ्रेंच संगीताच्या साथीनं वाईनचा आस्वाद घेणं आता सहज शक्य झाले आहे. हजारो मैल लिलया पादाक्रांत करणं या विमानानं शक्य करून दाखवलंय. चित्रपटात दिसणारं फाॅरेन आता सहज टप्प्यात आलंय. या विमान कंपन्या त्याच्यातल्या जीवघेण्या स्पर्धेमुळं कमालीची सौजन्यशीलता दाखवतात. प्रवाशानी आपल्याच कंपनीकडून प्रवास करावा या साठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. त्यांच्या कर्मचाऱ्याना चिडता प्रवाशांबरोबर बोलण्याचे खास प्रशिक्षण दिले असावे. काही (अनेक) खट्याळ प्रवासी कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रचंड हुज्जत घालण्यात धन्यता मानतात. तरीपण या कर्मचाऱ्यांचा तोल चुकूनही ढळत नाही. एसटीतल्या कंडक्टरनं धक्के मारून रस्त्यात उतरवला असता. कदाचित तो पर्याय विमानात शक्य नसल्यामुळे ते सर्व सहन करीत असावेत. विमान उडताना अथवा उतरताना सीटवर बेल्ट बांधून शांत बसणे अपेक्षित असते. तरीपण काही मंडळीना नेमकी त्याचवेळी पोट साफ करण्याची अथवा पाय मोकळे करण्याची प्रचंड इच्छा होते. हवाई सुंदरीना अशा मंडळीना जागेवर बसवून ठेवण्यासाठी वेगळा भत्ता मिळत असावा.

आंतरराष्ट्रिय प्रवासात आपल्याला बऱ्याच दिव्व्यातून जावे लागते. विमानात बसण्यापुर्वी इमिग्रेशन, सिक्युरीटी आणि उतरल्यावर पुन्हा इमिग्रेशन, कस्टम आदी सोपस्कार थकता लांबच्या लांब रांगांमधून पार पाडावे लागतात. तिथं कोणतीही घाई अथवा गोंधळ करण्यास वाव नसतो. प्रत्येक देशाचे सिक्युरीटी आणि कस्टम चे नियम वेगळे. त्या सर्व कसरती मधून सहीसलामत बाहेर पडणे हे सोपे काम नसते. अर्थात थोडा सराव झाला की या सर्व गोष्टी सहज वाटू लागतात. लांबच्या प्रवासात बराच काळ हवेत असल्यामुळे आणि त्या अडचणीतल्या खुर्चीत अडकून पडल्यामुळे अंग दुखू लागते. शरीराची जैविक दिनचर्या विस्कळीत झाल्यामुळे आजारपणाची भावना उत्पन्न होऊ शकते. शरीराची मर्यादीत हालचाल आणि सतत खाण्याचा कार्यक्रम यामुळे पचनसंस्थेचे बारा वाजतात. जर उड्डाणाच्या आणि अंतिम स्थळाच्या वेळेत तफावत असेल तर शरीर सांगतं रात्र आणि मन सांगतं दिवस अशी काहीतरी विचीत्र अवस्था होते. इप्सित स्थळी पोचल्यावर आपण नक्की दिवसाच्या कोणत्या वेळेपासून स्वत:ला ॲडजस्ट करायचं हा कठिण प्रश्न म्हणजे जेटलॅग. सर्व इकाॅनाॅमी क्लास मधून प्रवास करणाऱ्याना असे वाटते की बिजनेस क्लास वाल्यांची मजा असते. त्याना आपल्या सारखा त्रास मुळीच नाही. पण बसण्याच्या जागेतील थोडीशी मोकळीक हा विषय वगळता बाकी सर्व परीस्थिती त्याना सुद्धा तीच असते

आंतरराष्ट्रिय प्रवासाचा अजून एक स्वतंत्र उद्देश असू शकतो. तुम्ही जर स्वत: त्याऽतले असाल तर स्वत:साठी अन्यथा कोणा अन्य त्याऽच्या भक्तासाठी. ते म्हणजे कस्टम फ्री विदेशी मद्य. लोक भरभरून बाटल्या विकत घेतात आणि संपूर्ण विमानात जो तो बाटल्यांचा खण खण आवाज करीत प्रवेश करतो. विमानात पत्ते चाॅकलेटं आदी मनसोक्त वाटतात ही फक्त अफवा आहे. कदाचित अति लांब पल्ल्याच्या विमानात काही प्रमाणात करीत असतील ही! पण माझे तरी असे लाड आजतागायत कोणी पुरवले नाहीत. मद्यपीना मात्र विमान प्रवास ही एक पर्वणीच असते. खिशातून एकही दमडी वेगळी काढून देता हवी तेवढी आणि हव्या त्या प्रकारची दारू पुरवली जाते. अशा लोकांची हौस माझ्या सारख्या शुध्द माणसाच्या तिकीटातूनच भागवली जाते याचं मात्र मनात कुठंतरी दु:! असो! प्रत्येक विमानाच्या ठरलेल्या अन्न पुरवठ्याच्या वेळा मात्र तंतोतंत पाळल्या जातात. तुम्हाला भुक असो वा नसो! तुमच्या कडे नंतर द्या असा पर्याय नसतो. आज काल हवाई सुंदऱ्यांच्या बरोबरीने हवाई तरूण सुध्दा असतात. हे लोक इतका लांबचा प्रवास आणि मेहनत करून पण एवढे टवटवीत कसे राहतात याचं मला अजूनही कुतूहल आणि कौतुक वाटते

पुणेकराना खड्ड्यांवरून हिणवता येऊ नये म्हणूनच कदाचित हवेत पण प्रचंड हादरे बसू शकतात. असे हादरे बसायला लागले की मी मी म्हणणारा नास्तिक सुध्दा देवाला आठवल्याशिवाय रहात नाही. अशावेळी एक तर होणारे हादरे, त्यातून उत्पन्न झालेली भीती आणि आसपासच्या समस्त खादाड जनतेचा तोंडावाटे बाहेर येणारा आवाजी हिशोब या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मी मुकाट्यानं डोळे मिटून संगीत ऐकत खुर्चीबध्द होतो. त्या शिवाय पर्यायच नसतो म्हणा. विमानातील अजून एक मोठ्ठा त्रास म्हणजे बाळांचं आक्रस्ताळेपणानं रडणं आणि त्याच्या मातेची दुर्दशा. त्या टिचभर बॅशिनेट मधे त्याला सतत ठेवायचे आणि काढायचे या कारणानं त्याची शांत झोप होऊ शकत नाही. जरा हादरे आले की या हवाई मावश्या बिचाऱ्याच्या झोपेचा बळी देत मातेच्या हवाली करतात. मला प्रत्येक बाळ जणू ध्रुव बाळासारखे अढळ पद मागत असल्यासारखे वाटते.

विमानातून बॅगांचा प्रवास हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. प्रत्येकाने किती किलो सामान घ्यायचे हे त्या तिकीटावर स्पष्ट लिहीलेले असले तरी प्रत्येकाला हा प्रश्न कायम भेडसावत असतो. चेक इन बॅगा किती आणि केबिन बॅगा किती अशी समिकरणं मांडण्या करीता तयारीचा निम्मा वेळ द्यावा लागतो. बोर्डींग पास घेताना त्यांच्या स्वाधीन केलेल्या बॅगेच दर्शन थेट अंतिम ठिकाणी इमिग्रेशन पश्चात सामानाच्या बेल्टवर घडते. तोपर्यंत त्या बॅगेवर काय काय संस्कार केले जातात याचा आपणास गंध नसतो. दुथडी भरून वाहणाऱ्या बेल्टवरून आपली नेमकी बॅग ओळखून चपळाईने गर्दी प्रवाह तोडून काढून घेणे यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आजतागायत मला सुटलेलं कोडं म्हणजे जर कोणी मुद्दामून अथवा चुकीने दुसऱ्याची बॅग घेतली तर? आमच्या बॅगरूपी सीतेचे अशा रावणाने अपहरण करू नये यासाठी आम्ही बॅगांवर चित्र विचीत्र आकृत्या काढतो शिवाय धागे, दोरे, गंडे बांधून ठेवतो. आपली नेमकी बॅग ताब्यात आली की जत्रेत हरवलेलं लेकरू परत सापडल्याचा आनंद होतो.

कधी कधी आपल्याला डोमेस्टिक आणि इंटर नॅशनल असा कनेक्टेड प्रवास पण करावा लागतो. दोन विमानात जर पुरेसा अवधी नसेल तर चांगलीच दमछाक होते. त्यात जर सामान आपोआप ट्रान्सफर होणार नसेल तर महा वैताग! एकदा एका ठिकाणी तर डोमेस्टिक आणि इंटर नॅशनल विमानतळे स्वतंत्र असल्याने अवधी कमी असल्याने माझ्या चेहऱ्यावर सशाची काकुळता आली होती. त्याच वेळी मला ससे होलपट का म्हणतात ते कळून चुकलं

माझ्या पहाण्यात अशी बरीच मंडळी आहेत ज्यांचा संसार हा विमानात मिळणारे कंगवे, ब्रश आणि हाॅटेलात मिळणाऱ्या साबण शांपूवर चालतो. काही उत्साही मंडळींच्या डायनिंग टेबलाची शोभा विमान कंपन्याचे काटे चमचे वाढवताना नजरेस पडतात. विमानातून मिळणारी मासिकं, वर्तमानपत्र या अशा माफक गोष्टीनी तर मी कायमच माझं सामान्य ज्ञान वाढवित आलो आहे. विमानातील करमणूकीसाठी दिलेली छोटी स्क्रिन सुरवातीस जरी कुतूहल वाटत असली तरी नंतर तिचा पण तिटकारा येऊ लागतो. काही लोकाना लागोपाठ तीन चार चित्रपट पाडायची हौस असते पण माझी गाडी तासाभरातच बंद पडते. अवघडून बसून त्या छोट्या पडद्यावरची हलती चित्रं नंतर डोकेदुखीचे कारण बनू शकतात.

अशा अनेक गैरसोयींनी युक्त प्रवासाचे वेध मात्र प्रत्येकालाच असतात. विमानातून प्रवासाला जाण्याची तयारी ही जोरदार चालते. मी कितीही वेळा हा प्रवास केला असला तरी प्रत्येक वेळी विमानतळावर गेल्यावर लहानपणीच्या संदीप प्रमाणे आजही काचेतून भलेमोठे विमान निरखण्याचा मोह सुटत नाही. पुर्वीची "गेलास उडत" ही संज्ञा आता उपहास राहता एक स्टेटस सिंबल वरून जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली आहे.

No comments:

Post a Comment

Name:
Message: